गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. ख्रिश्चन
  4. »
  5. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

प्रेम, आनंदाचे पर्व 'ख्रिसमस'

PTI
'ख्रिसमस' हा उत्सव 2000 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने मानवी रूपात जन्म घेतल्याने साजरा केला जातो. भारतात 2.3 टक्केच ख्रिश्चन नागरिक आहेत. त्यांची एकूण संख्या 3 कोटींपेक्षाही कमी आहे. ख्रिश्चन समुदाय भारतातील काही प्रांतामध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकातही अस्तित्वात होते. येशूच्या बारा अनुयायांपैकी एक असलेले संत थॉमस हे पहिल्यांदा भारताच्या दक्षिण भागात आले. पण तेथेच त्यांची हत्या करण्यात आली. थॉमस यांनी दक्षिण भारतात अनेक चर्चची स्थापना केली. त्यांची समाधी चेन्नईजवळच्या मयलापूर शहरात आहे. आजही जगभरातील ख्रिश्चन बांधव त्याच्या दर्शनासाठी तेथे येत असतात.

इतर समाजबांधवांच्या तुलनेत ख्रिश्चनांमध्ये उत्सव कमी आहेत. त्यातही दोन मुख्य सण आहेत. त्यात पहिला म्हणजे 'ख्रिसमस' (येशू ख्रिस्ताचा जन्मदिन) व दुसरा म्हणजे 'ईस्टर'. इस्टर हा येशूने केलेल्या पुनरूत्थानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. ख्रिसमस प्रेमाचा संदेश देणारा उत्सव आहे. संत योहाना यांनी लिहिले आहे, की 'परमेश्वराने जगावर निस्सिम प्रेम केले आणि या प्रेमापोटी आपली एकुलता एक पुत्र जगासाठी दिला. प्रत्येक मानवाला त्याच्यामुळे विश्वासाचा एक आधार मिळाला.' येशू ख्रिस्ताचा मानवी अवतार प्रेमाचे प्रतीक आहे.

WD
मानवाच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाचे बलिदान दिले आहे. परमेश्वराच्या निस्सीम प्रेमाचे हे दर्शन आहे. बायबल या पवित्र ग्रंथात लिहिले आहे, की परमेश्वर हाच प्रेममय आहे. परमेश्वर प्रेम करताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. थोडक्यात परमेश्वराचे प्रेम हे जगाच्या पाठीवरील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी आहे. येशून क्रूसवर स्वत:ला लटकावून प्राण त्यागले आणि अपार प्रेम प्रकट केले आहे.' येशूच्या या बलिदानाने प्रभावित होऊन लोकांनी भोगवादी आयुष्याचा त्याग करून येशूचे शिष्यत्व पत्करले.

प्रेमाचा संदेश सार्‍या जगाला देताना त्यांना प्राण गमवावा लागला आहे. येशूच्या या प्रेममयी स्वभावाचे वर्णन करताना संत पॅट्रिक यांनी लिहिले आहे, की 'प्रेम हे धैर्य देते. कृपाळू आहे. प्रेम मोठेपणाचा आव आणत नाही. कुणाला दुखवत नाही किंवा कुणाला खेळवतही नाही. सगळ्यावर असलेले परमेश्वराचे प्रेम कधीच कमी होत नाही.'

सर्व धर्माच्या बांधवांनी परमेश्वराच्या प्रेमावर केवळ विश्वास न ठेवता तो आचरणातही आणला पाहिजे. सगळ्यांनी प्रेमभाव व आपुलकीने वागले तरच पूर्वग्रह, संघर्ष व दहशतवाद या जगातून समाप्त होईल. कुठलाही धर्म असो तो परस्परांमध्ये प्रेम निर्माण करू शकत नसेल तर तो धर्मच नाही, असेही संत पॅट्रिक यांनी लिहिले आहे. 'ख्रिसमस' म्हणजे मानव जातीच्या उद्धार व कल्याणासाठी परमेश्वराने केलेले प्रयत्न दर्शवणारा महोत्सव आहे.

बायबलमध्ये सांगितले आहे, की रक्त वाहिल्याशिवाय कुठलाच उद्धार होत नाही. आपण सर्व पापी आहोत. येशूने आपला प्राण देऊन आपल्या सगळ्यांचा उध्दार केला आहे. उद्धार हे परमेश्वराने मानवाला दिलेले 'गिफ्ट' आहे. संसारिक जीवनातून संन्यास घेणे आवश्यक आहे. परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मरणे गरजेचे नाही, तर भूलोकात राहून परमेश्वराने सांगितलेल्या मार्गाने कार्य करणे, हाच परमार्थ आहे. 'ख्रिसमस' च्या माध्यमातून हा संदेश समजण्यासाठी परमेश्वराने मानवाला प्रेरणा दिल्या आहेत.