अनिल कपूरचा 'गांधी माय फादर'
महात्मा गांधी या अलौकिक व्यक्तिमत्त्वावर रिचर्ड अॅटनबरो यांनी गांधी हा ऑस्करविजेता चित्रपट बनविल्यानंतरही या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू अनेकांना भावत आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या चित्रपट, नाटकातून गांधींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. आता अशा चित्रपटापासून कायम दूर राहिलेल्या अनिल कपूरने गांधीजींचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला आहे. अनिलने नुकतीच या चित्रपटाच्या प्रसिद्धीची सुरवात दिल्लीपासून केली आहे. मुंबईला फाटा देऊन दिल्ली निवडण्याचे कारण हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे, असे त्याचे म्हणणे आहे. दिल्ली ही राजधानी असल्याने तेथे तिला जास्त प्रतिसाद मिळेल. शिवाय परदेशातही त्याविषयी प्रसिद्धी होईल. अनिलला चांगला चित्रपट बनविण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. आपला मित्र फिरोज खानला त्याने ही इच्छा सांगितली. फिरोजने लगेच गांधी माय फादरची कथा ऐकवली. ती ऐकताच यावर चित्रपट बनवायचे अनिलने ठरविले. त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्याने फिरोजवर सोपवली. शंभर दिवसात चित्रपट तयारही झाला. हा चित्रपट अर्थात गांधीजी आणि त्यांचे पुत्र हरीलाल यांच्यातील नात्यावर आधारीत आहे. (मराठीत यावर गांधी विरुद्ध गांधी हे अजित दळवी यांचे नाटक येऊन गेले.) यात गांधीजींविरोधात काही प्रसंग, वाक्ये असल्याचे बोलले जाते. मात्र, अनिलने त्याचा ठाम शब्दांत इन्कार केला आहे. गांधींचे देशाबरोबरच आपल्या कुटुंबावरही तितकेच प्रेम होते. त्यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी लोकांना माहितीही कमी आहे. हा चित्रपट हरीलालच्या नजरेतून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
अक्षय खन्नाने हरीलाल साकारला आहे. अक्षयनेही जीव तोडून ही भूमिका केल्याचे अनिलचे म्हणणे आहे. त्याच्याशिवाय अन्य कुणीही ही भूमिका एवढी चांगली करू शकले नसते, असाही त्याचा दावा आहे. अक्षय आणि अनिल ही जोडी तालपासून जमली होती. आता अनिलच्या आगामी शॉर्टकट या चित्रपटातही अक्षय आहे. गांधी माय फादर तयार होऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र, लगे रहो मुन्नाभाई हे या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याच्या विलंबाचे कारण आहे. कारण मुन्नाभाईमध्येही गांधीजी होते. त्यामुळे या दोन चित्रपटात एक वर्षाचे अंतर असावे अशी अनिलची इच्छा होती. म्हणूनच चित्रपट विलंबाने प्रदर्शित करण्याचा निर्णय त्याने घेतला. आता ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.