शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017 (11:51 IST)

कवितांचा दरवळणारा शब्दसुगंध म्हणजे ‘परिमळ’ काव्यसंग्रह

कवयित्री सौ. मनिषा पिंटू वराळे ह्या आरोग्य उपकेंद्र धरणगुत्ती, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र येथे अर्धवेळ परिचर म्हणून कार्यरत असलेल्या कवयित्री सौ. मनिषा पिंटू वराळे यांचा द्वितीय मराठी कवितासंग्रह म्हणजेच ‘परिमळ’ या संग्रहातील रचनांमध्ये कवयित्री अत्यंधिक संवेदनशील मनाने व्यक्त होतात. ‘परिमळ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्रातील नामांकित ‘कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर’ यांनी केलेले आहे. ‘परिमळ’ या संग्रहात एकूण ४३ कविता जीवनाचे विविध पैलू उलगडणा-या अशा आहेत. 
 
‘परिमळ’ कवितासंग्रहास प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य (जेष्ठ लेखक-समीक्षक-संपादक) यांची विस्तृत, सुंदर कवितासंग्रहातील कवितांवर प्रकाश टाकणारी अप्रतिम प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात... ‘माणसाच्या मेंदूपेक्षा कविता लिहिणा-यांचे हृदय अधिक संवेदनशील असते हे कुणीही मान्य करावं असा हा कवितासंग्रह.’
 
यातून ‘परिमळ’ मधील कविता ह्रदयाला भिडणा-या अशा आहेत, हे प्रत्येक कवितेतून जाणवतं. मनोगतात कवयित्री सौ.मनिषा पिंटू वराळे म्हणतात, 'परिमळ' म्हणजे सुगंध पसरणे आणि जसं अगरबत्तीच्या सुवासाने मन प्रसन्न होतं आणि एक समाधान चेह-यावर पसरतं, अगदी तशीच प्रसन्नता कवितांच्या माध्यमांतून त्यांना वाचकांच्या मनात निर्माण करायची आहे.
 
‘जागतिक महिला दिन’ या कवितेत कवयित्री अतिशय भावूक होवून म्हणतात,
 
हे कसलं गं माते तुझ जगणं,
एखाद्याच दिवशी थोर तुला मानणं.
इतरवेळी मात्र तुला डावलणं,
हे कसलं जागतिक महिला दिन साजरा करणं.
 
(जागतिक महिला दिन...पृ.क्र. १६)
उद्धवस्थ मनाच्या कोप-यात,
एक आशा पणती बनून तेवत होती.
उद्याच्या आशेवर राहून,
नकळत देह जाळत होती.
 
(माणुसकीची आण...पृ.क्र.२८)
 
कोवळी फुले, कोवळी पाने, 
कोवळ्या या जीवाला,
का खुडता हो बाबा तुम्ही?
तुमच्याच लेकराला.
 
(गर्भकन्येची हाक...पृ.क्र.३७)
 
‘सेव्ह गर्ल’ सामाजिक संदेश देणारी मनस्पर्शी रचना.
 
दोनच असतात जगामध्ये अनमोल,
आई-बापांविन नाही कशाचेच मोल.
बाप असतो रक्षणकर्ता, विचार त्याचा खोल,
आई भरवी चिमणचारा, डोळं तिचं ओलं.
 
(आठवण...पृ.क्र. ४४)
आई-बाप यांच महात्म्य, वात्सल्य दर्शविणारी सुंदर रचना ‘परिमळ’ कवितासंग्रहात आहेत. सर्वच कविता अतिशय सुंदर असून, सामाजिक संदेश देणा-या, हरवत चाललेल्या माणुसकीवर भाष्य करणा-या, स्रीची वेदना दर्शविणा-या, पालकांच मन उलगडणा-या, आई वडीलांचे महात्म्य दर्शविणा-या, बाबांच मन हळुवार उलगडणा-या अशा सर्वच विषयांला हात घालणा-या, ह्रदयस्पर्शी रचना आहेत. ग्रामीण सहज,सरळ भाषा, अर्थगर्भता ‘परिमळ’ कवितासंग्रहाचे विशेष वैशिष्ट्य आहे. या संग्रहातील कविता वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील यात शंका नाही. कवयित्री सौ. मनिषा पिंटू वराळे यांना त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी खूप-खूप शुभेच्छा !