शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. आमने-सामने
Written By वेबदुनिया|

मनसेचा 'योग्य' बंदोबस्त केला आहे- सुभाष देसाई

सुजाण जनता सरकारला पुन्हा संधी देणे शक्य नाही. गेल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत सत्तारूढ आघाडी सरकार कुचकामी, प्रभावहीन व अपयशी ठरले आहे. या सरकारने केलेले सगळे दावे फोल ठरले असून यापुढे मात्र जनता काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला संधी द्यायची चूक करणार नाही, असा दावा शिवसेनेचे सरचिटणीस, ज्येष्ठ नेते व आमदार सुभाष देसाई यांनी 'हिंदुस्थान समाचार'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. मनसेचा 'योग्य' बंदोबस्त आम्ही केला आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आघाडी सरकारने जनतेच्या कुठल्याही समस्या गांभिर्याने हाताळल्या नाहीत, राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, राज्याच्या तिजोरीवर सातत्याने वाढत असलेला कर्जाचा बोजा, विदयार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशाचा घोळ, वीजटंचाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा सर्व बाबींना हाताळण्यात आघाडी सरकार अपेशी ठरले. दिलेली आश्वासने आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील योग्य समतोल राखण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. सद्यस्थिती पाहताना युतीचे सरकार हे खर्‍या अर्थाने लोककल्याणकारी ठरले, असे विश्लेषण देसाई यांनी केले. यंदा शिवसेना शंभर जागा तर भाजपा किमान ६० जागा जिंकत सत्तारूढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेला बसलेल्या फटक्याविषयी बोलताना त्यांनी म्हटले, लोकसभा निवडणूक हा स्वतंत्र विषय होता,कारण त्या निवडणूकीत असलेले मुद्दे हे देशातील समस्यांशी संबंधित होते. पराभवाचे स्पष्टीकरण करताना, त्यावेळी जगभरात रोरावत असलेली आर्थिक मंदी हा विषय निवडणूकीत देखील शीर्षस्थ होता. डॉ. मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, प्रणब मुखर्जी इ. काँग्रेसकडे असलेल्या अर्थतज्ञांच्या टीमच्या सहाय्याने देश या मंदीवर मात करू शकतो असे जनतेला पटविण्यात संपुआ घटक पक्ष यशस्वी ठरले. याच्या उलट भाजपा व त्याचे मित्रपक्ष जनतेच्या मनात हा विश्वास उत्पन्न करण्यात अयशस्वी ठरल्यामुळेच जनतेने आम्हाला नाकारले असे देसाई यांनी सांगितले.

राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराचे मूल्यमापन केले असता, या सरकारने बहुवस्तू विनियोग केंद्रे उभारली. पण अत्यावश्यक विनियोगाच्या वस्तू मात्र दुर्लक्षीत झाल्या. परिणमी रिलायन्स, टाटा, बिर्ला सारख्या कंपन्यांचे उखळ पांढरे झाले मात्र सामान्य जनतेला महागाईला सामारे जावे लागले असेही त्यांनी सांगितले.

येत्या निवडणुकीत मनसे फॅक्टर कितपत त्रासदायक ठरेल या प्रश्नाला उत्तर देताना, मनसेशी लढण्यास आम्ही तयार आहोत असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचा ४० वर्षांचा राजकीय अनुभव लक्षात घेता मनसेचा योग्य तो बंदोबस्त आम्ही केलाच आहे, चिंता करण्याचे कारण नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तरूणाई शिवसेनेपासून दूर जाते आहे काय असे विचारले असता, गेल्या वर्षभरात सेनेने आपली आक्रमक आंदोलने केल्यामुळे तरूण शिवसेनेकडे अधिक आकर्षित झाले आहेत असा दावाही त्यांनी केला. आक्रमक आंदोलने करतानाच प्रश्नांची तड लावण्यात देखील शिवसेना यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षातंर्गत बंडखोरीसंबंधी विचारले असता, बाळासाहेबांची पक्षसंघटनेवर असणारी जरब वयोमानानुसार कमी झाली. अशावेळी एकजुटीने उभे राहिले पाहीजे ही गोष्ट न कळलेल्यांनीच संकुचित स्वार्थासाठी बंडखोरी केल्याचे सांगत, नेतृत्वबदल होत असताना सर्वच पक्षांना हा त्रास सहन करावा लागतो असे त्यांनी सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा एकदा जोमाने उभी राहिली आहे. सेनेची सध्याची ओळख ही आक्रमक परंतु, जनतेसाठी परिश्रम घेणारा पक्ष अशी असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मराठी माणूस केंद्रबिंदू मानून सुरू झालेल्या शिवसेनेचा हिंदुत्वाकडे झालेला प्रवास याविषयी विश्र्लेषण करताना देसाई म्हणाले, ''हिंदूहिताची व्यापक भूमिका आणि मराठी बाणा जागविणे यात परस्परविरोध नाही. हिंदुत्वाची जाणीव आणि त्याबद्दलचा अभिमान लोकांच्या मनात सदैव आहे. सुप्तावस्थेत असल्याने तो सतत प्रत्ययास येत नाही हे खरे. विशिष्ट परिस्थितीमध्ये हा अभिमान वेळोवेळी व्यक्त होतो. निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक वेळी ते ऐरणीवर येलच असे नाही. मात्र हिंदुत्व हीच या देशाची अस्मिता आहे आणि हिंदुसमाज देशाचा अपमान कधीही सहन करणार नाही.