शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. आमने-सामने
Written By अभिनय कुलकर्णी|
Last Modified: नांदेड दि.९ सप्टेंबर (हिं.स)- , गुरूवार, 10 सप्टेंबर 2009 (11:34 IST)

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात डॉ किन्हाळकर?

भोकर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणार असल्याने हा मतदारसंघ येत्या निवडणुकीत लक्षवेधी मतदारसंघ ठरणार आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार मिळणे कठीण असे वाटत असतानाच सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढण्यासाठी माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर हे चाचपणी करत आहेत. तसे झाल्यास या लढतीत थोडी जान येईल आणि किन्हाळकर यांना दीर्घकालीन उद्देशासाठी ते फायदेशीरही ठरेल असे दिसते आहे.

पुनर्रचनेत मुदखेड गायब
मतदारसंघ पुर्नरचनेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पुर्वीचा मुदखेड मतदारसंघ गायब झाला असून नांदेड व लोहा तालुक्यातील गावे वगळून भोकर तालुका जोडून अर्धापूर, मुदखेड व भोकर असा तीन तालुक्यांचा मिळून नवा भोकर विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदार संघातून निवडूक लढविण्याची डरकाळी फोडणारे राष्ट्रवादीचे आमदार बापुसाहेब गोरठेकर यांनी गंगाधर कुंटूरकरांसारखी आपली गत होऊ नये म्हणुन भोकरमधून गाशा गुंडाळून नायगावमध्ये पलायन केले आहे . नायगाव मधून लढण्याची त्यांनी जय्यत तयारीही चालविली आहे. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात भोकर मतदार संघातून तगडा उमेदवार कोणी शिल्लकच राहिला नाही. होते ते छोटे-मोठे पुढारी अशोकरावांच्या चरणी लीन झाले आहेत.
भोकरची जागा सेना-भाजप युतीत सेनेला सुटली असून गेल्या निवडणूकीत ही जागा युतीने शेतकरी संघटनेला सोडली होती. तेव्हा अशोकरावांच्या विरोधात फायरब्रिगेड म्हणून परिचित असलेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्या शोभा वाघमारे यांनी निवडणूक लढवून अनामत जप्त करुन घेतली होती. त्या आता समाजवादी मानसिकतेतून बाहेर निघून भगवा झेंडा हातात धरुन शिवसेनेचा नारा कुठून बुलंद करतात हे मात्र गुलदस्त्यात आहे.

कुंटुरकरांनी टोपी फिरविली
गेल्या विधानसभा निवडणूकीत मुदखेड मतदारसंघातून अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात त्यांचे ऐककाळचे सहकारी माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार अशी अटकळ बांधण्यात आली होती. त्यामुळे या मतदारसंघात पैशांचा महापूर वाहिला होता व जिल्हाभर या निवडणूकीची चर्चा होती. परंतु, निकालानंतर हवेत असलेल्या गंगाधरराव कुंटूरकरांचे तारे जमिनीवर आले. या गाजलेल्या निवडणूकीत अशोकराव चव्हाण ७० हजारांचे मताधिक्य घेवून निवडून आले तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कुंटूरकर यांना फक्त ३० हजार मतांवरच समाधान मानावे लागले होते. यावेळी तर अशोकराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांची ताकद पुर्वीपेक्षा दहापट वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून राजकीय आत्महत्या कोण करावी असा प्रश्न विरोधी पुढार्‍यांना पडला आहे. गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी गंगाधरराव कुंटूरकर यांनी बदलती राजकीय हवा बघून लोकसभा निवडणूकीत आपली टोपी फिरवली. राष्ट्रवादीत असले तरीही ते पक्षाच्या कार्यक्रमाऐवजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अधिक दिसत आहेत.

किन्हाळकरांचे गणित
मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवेल असा प्रश्र्न उपस्थित होत असतांना शरद पवारांचे एकेकाळचे विश्वासू मानले जाणारे माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी भोकरमधून निवडणूक लढविण्याचा मनोदय व्यक्त केला असून त्यामागे डॉ.किन्हाळकरांची राजकीय चाल आहे. चव्हाण घराण्याला विरोध करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेते मंडळी जवळपास संपुष्टात आल्यामुळे आपण अशोकरावांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवून पराभूत झालो तरी राज्याच्या राजकारणात आपले नांव होईल व चव्हाण घराण्याला विरोध करणारा कोणी तरी आहे असा संदेश गेल्याने शरद पवार पुन्हा आपल्याला जवळ करुन आपले राजकीय पुनर्वसन करतील असे या मागचे डॉ.किन्हाळकरांचे राजकीय गणित आहे.