गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

लागबागच्या राजाची स्थापना, इतिहास व विसर्जन

लालबागच्या राजची स्थापना 

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउढसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री'ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली.  

 
WD

लालबागच्या राजाचा इतिहा


लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती-करीता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.

त्याकाळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. इ.स. १९४६ साली `श्री' ची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखविण्यात आली. इ.स. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात `श्री' ची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. इ.स. १९४८ मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आली.

 
WD

इ.स. १९४७ सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा साहजिकच बदलण्यात आली. आता मंडळाने राष्ट्रउभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरविले. मंडळाच्या शिलकी निधीतून कस्तूरबा फंड, इ.स. १९४८ साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इ.स. १९५९ साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला. तसेच श्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले.

इ.स. १९५८ साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी `गीता उपदेश' आणि `कालियामर्दन' हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत.

इ.स. १९५८ सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. इ.स. १९४८ ते इ.स. १९६८ या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्रौ पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक. या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तिंचा आदर सत्कार करण्यात येतो. ही प्रथा आजतागायात चालू आहे.
 
WD

विसर्जन 

लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचते.