शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Updated :नवी दिल्ली , मंगळवार, 27 मे 2014 (14:51 IST)

सीएम झाले पीएम!

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले आहे. नरेंद्र मोदी यंनी देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून सोमवारी शपथ घेतली. यावेळी काहीही झाले तरी केंद्रात सत्ता आणायची आणि मोदींना पंतप्रधान करायचे हे भाजपचे स्वप्न सत्यात उतरले आहे. यावरून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची पक्षाने केलेली निवड किती योग्य होती याची कल्पना येते. पक्षाच्या या विजयामागील नेमकी कारणे कोणती, मोदींमुळे पक्षाला फायदा झाला की मोदींच्या नेतृत्वाखाली पक्ष म्हणूनच भाजपची वाटचाल यशदायी ठरली याविषयीच्या चर्चा रंगत राहणार आहेत. परंतु ‘विकासपुरुष’ अशी मोदींची प्रतिमा आताच्या देदीप्यमान यशासाठी कारणीभूत ठरली हे मात्र नक्की. ‘चाय’पे सुरू झालेली चर्चा आता थेट पंतप्रधानपदापर्यंत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आणि कामगिरीचा वेध औचित्यपूर्ण आहे.नरेंद्र मोदी हे वडनगर गावचे. गुळाची मोठी बाजारपेठ असलेल्या या गावात मोदी यांचे वडील दामोदरभाई चहाचे दुकान चालवत. नरेंद्र त्यांना मदत करत. काही वेळा रेल्वे स्थानकावर चहा द्यायला जात. तिथे सैनिकांना चहा देण्याची संधी मिळे तेव्हा त्यांना विशेष आनंद होई. गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रचारक जीवनव्रती होऊन गेले होते. त्यातील काशीनाथराव बागवडे यांनी नरेंद्रजींना शाखेत आणले. तिथल्या वातावरणात ते रमले. आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे असा संस्कार मनावर झाला आणि ते त्यांचे ध्येय बनले. याच काळात त्यांना वाचनाची आवड लागली. 1950 मध्ये जन्मलेल्या मोदी यांना आपल्या जन्माच्या काळात आणि त्याच्या आसपास देशात घडत असलेल्या घटनांची चांगलीच माहिती होती. फारसे वय नव्हते पण सतत वाचनाची आवड असल्यामुळे वयाच्या मानाने ही माहिती अधिक होती. दरम्यान 1971 मध्ये अनंतराव काळे यांच्या प्रेरणेने मोदी संघाचे प्रचारक म्हणून घराबाहेर पडले.
 
पुढील 16 वर्षे मोदी यांनी संघाचा प्रचारक म्हणून कार्य केले. 1987 मध्ये त्यांना संघाने भारतीय जनता पक्षाचे काम करण्याचा आदेश दिला. ते राज्याच्या अनेक भागात फिरले आणि जनतेची अवस्था जवळून पाहिली. हा सारा काळ भारताच्या, विशेषत: गुजरातच्या इतिहासात मोठय़ा परिवर्तनाचा होता. याच काळात इंदिरा गांधी यांचा उदय, बांगलादेश युद्ध, इंदिराजींची लोकप्रियता शिगेला पोहोचणे आणि नंतर कमी होणे, त्यातून गुजरातेत निर्माण झालेले नवनिर्माण आंदोलन या सार्‍या घटना मोदी प्रेक्षक म्हणून पहात होते. आणीबाणीत त्यांना अटक झाली नाही पण त्यांनी गुप्तपत्रके काढून इंदिरा शासनाची खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. संघाचे आणखी एक प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रेरणेने मोदींनी अहमदाबादजवळच्या गोधावी गावी एक शाळा काढली. मोदींनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात दाखवलेल्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याची झलक या शाळेत दिसते. येथेच मोदी यांनी लक्ष्मण विद्यापीठ स्थापन केले. मोदींना जनसामान्यांच्या समस्यांची जाण आहे. त्यामागे त्यांचा तळागाळातील संपर्क आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या हातात सत्ता असण्याच्या काळात मोदींनी न्याययात्रा काढली होती.

सरकार दुष्काळग्रस्तांसाठी मदतीच्या अनेक योजना जाहीर करते पण त्यांचे पुढे काय होते याचा काही पत्ताच लागत नाही. तो लागावा म्हणून मोदींनी राज्यात चार न्याययात्रा काढल्या. या यात्रांमधील कार्यकत्र्यांनी 115 तालुक्यातील 15 हजार खेडय़ांना भेट दिली आणि शासनाच्या योजना लाभार्थीपर्यंत कशा पोहोचत नाहीत याचा अहवाल तयार करून सरकारला सादर केला.

भाजपमध्ये प्रदेश संघटनमंत्री म्हणून पद हाती येताच मोदींनी दोन उत्तम कामे केली. 1989 मध्ये त्यांनी तेव्हाचे भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली लोकशक्ती रथयात्रा काढली. या काळात गुजरातच्या लोकांना नरेंद्रभाईंचा परिचय झाला. 1975 च्या जूनमध्ये तिथे बाबूभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली जनता सरकार सत्तेवर आले होते. या सरकारमध्ये केशुभाई मंत्री होते. 1980 मध्ये गुजरातेतली जनता क्रांती संपुष्टात आली आणि इंदिरा लाटेत काँग्रेसचे सरकार आले. पण 1980 पासून 1995 पर्यंत काँग्रेस पक्षाने तिथे राजकारणाचे सगळे प्रकार केले. पुढे नरेंद्र मोदी यांच्या यात्रांना जनतेचा पा¨ठबा मिळाला आणि 1995 मध्ये गुजरातेत केशुभाईंचे भाजपचे सरकार सत्तेत आले. या पाश्र्वभूमीवर 1995 ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजपला 180 पैकी 121 जागा मिळाल्या. केशुभाई मुख्यमंत्री झाले पण ही किमया मोदींचे ग्राउंड वर्क आणि काँग्रेसविषयीची चीड यामुळेच घडली होती.

1995 मध्ये मोदींनी प्रशिक्षणाचा आगळावेगळा उपक्रम राबवला. राज्यात 28 हजार मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात पाच कार्यकर्ते म्हटले तरी किमान दीड लाख कार्यकत्र्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल हे त्यांच्या लक्षात आले. अशा परिस्थितीत त्यांनी 10 हजार कार्यकत्र्यांना प्रशिक्षण दिले. या दरम्यान, मुरलीमनोहर जोशी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या एकता यात्रेचे सारथ्य करण्याची संधी नरेंद्र मोदींना लाभली. त्याआधी लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेचेही नियोजन मोदींनी केले होते. या कामांमधून ते जनतेला माहीत झाले आणि त्यांना जनता काय आहे हे जाणता आले. 1995 मध्ये मोदींना भाजपच्या केंद्रीय कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांच्याकडे पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. या निमित्ताने त्यांना उत्तर भारताच्या राजकारणाचा फील मिळाला. मात्र त्यांच्या पश्चात गुजरातेत भाजपची लोकप्रियता कायम असूनही पक्षात दुफळी निर्माण झाली. त्यामुळे वाघेला बाहेर पडले. सरकार बरखास्त झाले आणि 1997 मध्ये मध्यावधी निवडणुका होऊन पुन्हा केशुभाई मुख्यमंत्री झाले. तिकडे दिल्लीत मोदी यांना पक्षाचे महासचिव करण्यात आले होते. राज्यात केशुभाई अपयशी ठरायला लागले होते. अशा परिस्थितीत 2001 मध्ये मोदींना अटलबिहारी वाजपेयी यांनी पाचारण केले आणि पुन्हा गुजरातेत जावे लागेल असे सांगितले. यानंतर त्यांना गुजरातचे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची संधी मिळाली.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी उद्योगांच्या विकासासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्याशिवाय देशातील तसेच परदेशातील अनेक मोठे उद्योजक आपला प्रकल्प गुजरातेत सुरू करण्याबद्दल उत्सुक असल्याचेही पाहायला मिळते. मोदी औद्योगिक विकासासाठी मोठय़ा तळमळीने प्रयत्न करत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा उद्योगसमूहाचा सिंगूरचा प्रकल्प रद्द होत आहे हे लक्षात येताच नरेंद्र मोदी यांनी टाटांशी चोवीस तासाच्या आत संपर्क साधला आणि टाटांनी हिरवा कंदील दाखवताच केवळ आठवडाभरात सानंद येथे 200 एकर जागा उपलब्धही करून दिली. मोदींनी दाखवलेली ही तत्परता काळाची खरी गरज आहे आणि ती मोदींनी अचूक ओळखली आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेऊन अचूक आणि प्रभावी पावले टाकणारा नेता अशी मोदींची प्रतिमा निर्माण झाली आहे. साहजिक त्यांचे पंतप्रधान होणे हा देशातील उद्योग क्षेत्रासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या पाश्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील करिश्मा लोक अनुभवत आहेत. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुका मोदींभोवतीच खेळल्या जाणार हे उघड होते आणि झालेही तसेच. त्याचबरोबर या विकासपुरुषाला पंतप्रधानपद मिळण्याची जनतेशी इच्छाही आता फलद्रूप झाली.
स्वतंत्र कार्यभार व राज्यमंत्री - 
जनरल व्हि. के. सिंह - परराष्ट्र राज्यमंत्री
इंद्रजीत राव सिंह - नियोजन व संरक्षण राज्यमंत्री
संतोषकुमार गंगवार - संसदीय कामकाज, जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान राज्यमंत्री
श्रीपाद नाईक - सांस्कृतिक व पर्यटन
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम व नॅचरल गॅस
सरबानंदा सोनोवाल - युवक कल्याण व क्रीडा
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री 
जितेंद्र सिंह - विज्ञान व तंत्रज्ञान 
निर्मला सीतारामन : वाणिज्य व उद्योग मंत्री 
जी. एम. सिद्धेश्वरा - नागरी उड्डयन राज्यमंत्री
मनोज सिन्हा - रेल्वे राज्यमंत्री
निहालचंद - रासायनिक व खते राज्यमंत्री
उपेंद्र खुशवाह - ग्रामीण विकास व पंचायत राज राज्यमंत्री
राधाकृष्ण पी. - अवजड उद्योग राज्यमंत्री
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
कृष्णन पाल - दळणवळण राज्यमंत्री
डॉ. संजीव कुमार बलयान - कृषी राज्यमंत्री
मनसुखभाई वासवा - अदिवासी विकास राज्यमंत्री
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण, अन्न राज्यमंत्री
विष्णुदेव साई - खाण, रोजगार व कामगार राज्यमंत्री
सुदर्शन भगत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री