गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2015 (08:30 IST)

नवचैतन्याची प्रेरणा

सरत्या वर्षाला निरोप देऊन चैत्र शुद्ध प्रतिपदा येते नव्या नव्हाळीच्या पालवत्या क्षणांना बरोबर घेऊन, सर्वागांनी नव्याची नवलाई घेऊन. नववर्षाचा पहिला दिवस म्हणून चैत्र प्रतिपदा साजरी केली जाते ती गुढीपाडवा या नावाने! म्हणून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीनेही या दिवसाला महत्त्वाचे स्थान आहे. नवचैतन्याला प्रेरक ठरणार्‍या, मरगळलेल्या, अनुत्साहित मनांना जागवणार्‍या या सणाविषयी..
 
यावर्षी निसर्ग काहीसा बदललाय. अवकाळी पावसानं ऐन फाल्गुनातही थंडी कायम ठेवली आहे. त्यामुळे होळीनंतर उत्तरोत्तर उन्हाचा तडाखा थोडा थोडा वाढू लागला आहे. त्यामुळे लाहीलाही करणारा उन्हाळा अजून दूरच आहे का, असा प्रश्न पडत आहे. असं असलं तरी या वातावरणाचा भारतीयांच्या उत्सवी प्रेमावर परिणाम झालेला नाही. त्यात चैत्राची चाहूल लागणं म्हणजे तर आनंदाला उधाण येणं. त्यामुळे चैत्राचं स्वागत मोठय़ा थाटामाटात होतं. चैत्रात नव्या नव्हाळीनं जणू निसर्ग सजलेला असतो. खरं तर या काळात झाडं आपला हिरवा रंग हरवून बसलेली असतात. अंगांगावरची पानं गाळून शुष्क झालेली, पण एक जादुई रंगीन नखरा त्यांना बहाल झालेला! काटेसावर पाहा कशी आपला लालबुंद पंचपाकळी फुलांचा डोलारा सावरतेय! पळसाचंही तेच. अंगावरचं अखेरचं पान झडूनही त्याचं माथं नुसतं लालभडक फुललंय! पांगारा आपल्या लालचुटूक चोचीसारख्या ओठांनी जणू लडिवाळपणे ओठ 
 
मुरडतोय! आपल्या पंख्यासारख्या फांद्यांनी शांतवणारा गुलमोहर! तोही आता तारुण्याच्या जोशात! एकेक पान गळून पडलंय; पण शेंदरी, लाल फुलांच्या झुबक्यांनी नुसता डवरलाय! पिवळाधम्म अमलताश, सोनमोहरांनी लगडलेला बहावा, आपल्या सुवर्णरंगी फुलांचा दिमाख मिरवतोय नुसता! सोन्याची रासच अंगोपांगी मढवून बसलाय. नाजूक, गुलाबी पाकळ्यांचा कॅशिया आपलं खानदानी सौंदर्य जपतोय! हवेत धुंद मोगर्‍याचा सुगंध दरवळतोय. वडा-पिंपळाच्या वठलेल्या झाडालासुद्धा तांबूस, कोवळी पालवी फुटलेय! सार्‍या आसमंताला वसंताची चाहूल लागली आहे! 
 
वसंतपंचमी साजरी झाली ती माघातच! पण ‘चैत्र’ आला म्हणताच, दारासमोर ‘चैत्रांगण’ सजायच्या आधीच निसर्गातलं ‘चैत्रांगण’ सजू लागतं. हवेतली उष्णता दिवसेंदिवस वाढतेय; पण मग हा सृजनोत्सव कसा? जमिनीत खोल मुरलेलं पाणी पिऊन झाडांवर उगवलेली ही कौतुकाची कोवळीक आणि लसलसत्या लालम्लाल आणि पिवळ्याधम्म हळदी-कुंकवी रंगाची उधळण! भुईच्या कुशीतून वर यायला, तांबूस कोवळ्या पालवीलाही अशी उबेची गरज असते. म्हणून हे निसर्गातलं सृजनरुपी टवटवीत ‘चैत्रांगण’ ऐन कडाक्याच्या उन्हात नेत्रांना सुखावणारं आणि पानगळीच्या दिवसांबरोबरच फुलांचं रसरसून फुलणं, मन आकर्षित करणारं, ग्रीष्माचा दाह सुसह्य व्हायलाच का रंगोत्सव आणि नवजात पालवीची कोवळीक!
 
धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीनेही या दिवसाला महत्त्वपूर्ण स्थान! नवचैतन्याला प्रेरक ठरणारा हा सण! शालिवाहनाने मातीच्या सैन्यावर पाणी शिंपडून त्यात प्राण भरला. अशी लाक्षणिक कथा आहे. तसा मरगळलेल्या, अनुत्साहित मनांना जागवण्याचा हा दिवस! विझलेलं काही फुलवण्याचा हा दिवस! प्रभू श्रीरामचंद्राने वालीच्या जुलमातून दक्षिणेकडील लोकांना मुक्त केले. तो आनंद साजरा केला गेला तो याच दिवशी, घराघरांवर गुढय़ा-तोरणं उभारुन! आजही घरोघरी गुढय़ा उभारुन हा सण साजरा केला जातो. पारंपरिक गुढी उभारणं म्हणजे तरी काय? कडूनिंबाची वा आंब्याची हिरवीकंच डहाळी, तिच्या निमुळत्या टोकावर भरजरी-रेशमी वस्त्राची सळसळ आणि त्यावर चांदीच्या कलशाची चमचमती झळाळी! दिमाखात उभारलेल्या या गुढीला मोहक, नयनरम्य 
 
फुलांची माळ! या सार्‍याचे माधुर्य वाढवणारा साखरेच्या गाठय़ांचा हार! नव्या वर्षातील आनंदाची ग्वाही देणारी, भारतीयांच्या घराघरात श्रद्धेनं फडकणारी गुढी! गुढीचं रुपडं एखाद्या कुंची घातलेल्या राजस, लोभसवाण्या बाळासारखं दिसतं. गुढी शक्य असेल तेवढी उंच उभारायची! निळ्याभोर आकाशाच्या पाश्र्वभूमीवर घराघरातून उभारलेल्या या गुढय़ा म्हणजे वसंततूच्या आगमनाची मानवनिर्मित रंगीत सुरुवात! 
 
गुढय़ा म्हणजे नव्या वर्षाची, नव्या संकल्पांचीही सुरुवातच! गुढीसाठी वापरलेली आंब्याची किंवा कडूलिंबाची डहाळी म्हणजे जीवनधाराच! मांगल्याचं, हिरवाईचं, सृजनाचं ते प्रतीक! गुढीचं चांदीचं पात्र म्हणजे जीवनरस साठवून तो ग्रहण करण्याचं साधन! गुढीसाठी वापरलेलं रेशमी वस्त्र म्हणजे आपलं संरक्षण, आपली संस्कृती! गुढीवर लटकवलेली साखरेच्या गाठय़ांची माळ म्हणजे जीवनातल्या गोडीचं प्रतीक! गुढी उभारायची ती प्रात:काली! उतरवायची ती सूर्यास्तावेळी! 
 
गुढीपाडव्याच्या दिवशी कडूलिंबाचे फार महत्त्वाचे स्थान! दुधात कडूलिंबाची पाने कुस्करुन देवाला नैवेद्य दाखवायचा आणि प्रसाद म्हणून तो घ्यायचा! आयुर्वेदातलं कडूलिंबाचं महत्त्व जाणून केलेली ही योजना! आरोग्यदायी कडूलिंब वर्षारंभीच पोटात गेला तर रोगपरिहार होऊन जीवन झळाळून उठते. कडूलिंबाच्या पानांबरोबर हिंग, जिरे, मीठ, ओलं खोबरं वाटून तो गोळा खाण्याचीही प्रथा आहे. गुढीपाडव्याच्या गोड दिवशी कडू चवीचा कडूलिंब खाण्याचा हेतू एकच. वर्षारंभाची सुरुवात आरोग्यदायी! या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी घरातील कुटुंबीय एकत्र बसून मिष्टान्नाचा आस्वाद घेतात. कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्तवेळ पाहताना पंचांगकत्र्यांनी सांगितलेले साडेतीन मुहूर्त विचारात घेतले जातात. त्या दिवशी संपूर्ण वेळ शुभघटिकाच असते. 
 
नववर्षाच्या शुभारंभी येणारा पाडवा या साडेतीन मुहूर्तापैकी एक. या दिवशी व्यापारी, दुकानदार, कारखानदार, विक्रेते त्यांच्या कार्याचा शुभांरभ करतात. इमारतीची पायाभरणी, उद्घाटन, गृहप्रवेश अशी अनेक शुभकार्ये या मुहूर्तावर पार पडतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शुभमुहूर्तावर केलेले नवे संकल्प पूर्णत्वास जातात. 
 
आज गरज आहे काळाच्या गरजेनुसार नवनवे संकल्प करण्याची. निसर्गातील सृजनोत्सवांच्या आणि रंगोत्सवाच्या शुभवेळेची सम साधून आपणही नवनव्या संकल्पांच्या गुढय़ा उभारुया आणि नववर्षाला डोळसपणे सामोरं जाऊ या.