बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By वेबदुनिया|

तस्मै श्री गुरवे नम:

गुरु ब्रह्मा गुरु र्विष्णू गुरुर्देवो महेश्वर :
गुरु: साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नम:

हा श्लोक आपण रोज प्रात:स्मरणात म्हणतो. त्यात किती खोल अर्थ दडला आहे? निष्ठावान भक्ताला परमेश्वराची म्हणजेच शाश्वत आनंदाची प्राप्ती होते, ती केवळ गुरुमुळेच. त्यामुळे कितीही मोठा माणूस असला तरी त्याला मिळणारे ज्ञान, आत्मज्ञान या सर्वांच्या प्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता असतेच. म्हणतात ना,
गुरुविण कोण दाखवील वाट।
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट।।

आयुष्यात अत्यंत यशस्वी व मोठ्या असणार्‍या प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून, पुढे जात मोठ्या झाल्या. अगदी एकलव्याचेच उदाहरण घ्या. गुरुने त्याला नाकारले तरी त्याने सरावाच्या वेळी आपल्या गुरुंचा पुतळा उभा करून धनुर्विद्येचा अभ्यास केला. या मागचा भावार्थ असा, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक परिश्रम तर हवेच पण त्याला श्रद्धेची, विश्वासाची जोडही हवी.

हा विश्वास, श्रद्धा आपल्याला गुरुत दिसते. त्याच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते. ही प्रेरणा देणारी व्यक्ती आपला गुरुच आहे. ती व्यक्ती इतर बाबतीत सामान्य का असेना, पण ज्या एका गोष्टीत ती असामान्य आहे त्यासाठी ती आपल्याला गुरुस्थानीच असते. म्हणूनच गुरु दत्तात्रयांनी 24 गुरु केले असे म्हणतात. त्यांनी त्यांच्या प्रत्येक गुरुकडून चांगल्या गोष्टी उचलल्या आणि स्वत:ला सिद्धपद प्राप्तीसाठी तयार केले.

अगदी देवरूप कृष्णही त्याच्या अवतारात गुरु सांदिपनींना शरण केला आणि गुरुगृही राहून आपले अध्ययन इतर मुलांप्रमाणे गुरुसेवा करून पूर्ण केले. जगण्याचा आदर्श असणारा राम गुरु वसिष्ठांच्या अनुग्रहाखालीच एकनिष्ठा, कर्तव्य इत्यादी गुण शिकला. कर्तव्यापोटी आपल्या प्रेमळ पत्नीचाही त्याग करणारा रामराया, सर्व उपभोगांमधूनही योगी असणारा भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वराज्याची जरीपटका महाराष्ट्राच्या सह्याद्रीवर फडकावणारा राजा शिवाजी ही अन् अशी अनेक उदाहरणे सांगता येतील, की ज्यांनी आपल्या गुरुंवरील निष्ठेपायी अद्वितीय कार्य केले. ते त्या काळाचे धनी बनले.

ऋषी अरुणीची कथा तर सर्वश्रुत आहेच. गुरुच्या सांगण्यावरून तो तुटलेला बांध अडवण्यासाठी रात्रभर पाण्यात आडवा राहिला. त्यावरून त्याची गुरुवरची अटळ श्रद्धा तर दिसून येते. गुरुच्या प्रत्येक वाक्यात लपलेला अर्थ समजून त्याप्रमाणे स्वत:ची अध्यात्मिक प्रगती साधणारी अजून एक जोडी आपल्या माहितीची आहे. ती म्हणजे समर्थ रामदास आणि डाळगप्पू अर्थात कल्याणस्वामी यांची.

समर्थांच्या पायाचे गळू चोखण्यापासून त्यांनी सर्वप्रकारे गुरूसेवा केली. गडावरून खाली पाणी आणण्यासाठी जात असताना, समर्थांचे 'कल्याणा छाटी उडाली,' हे शब्द ऐकताक्षणी कोणताही विचार न करता खाली उडी मारणारे कल्याणस्वामी विरळाच. असे‍ शिष्य मिळणेही दुर्लभच.

पूर्वी संगीत क्षेत्रातही गुरुगृही राहून, गुरुची कामे करून शिक्षण घेतले जात असे. पहाटे गुरुंनी रियाजाला उठवल्यावर रियाज करणारे शिष्य असत. कधी पंधरा-पंधरा दिवस काहीही न शिकवणारे गुरुही शिष्यांच्या सहनशीलतेची परीक्षा पहात. त्यातून शिष्यांना संयम, सहनशीलता या बाबी शिकण्यास मिळत.

म्हणजेच पारमार्थिक, ऐहिक, लौकिक, धार्मिक अशा कोणत्याही प्रकारच्या उन्नतीसाठी गुरुच शिष्याला तयार करत. मदत करत. गुरूमुळेच आपण माणूस म्हणून अधिकाधिक चांगले घडत जातो. गुरु वयाने ज्येष्ठ असावा असा काही नियम नाही. काही काही गोष्टी आपण आपल्या मुलांकडूनही शिकतो. अनेकदा आपण ज्ञानाने, अनुभवाने समृद्ध होतो. त्यावेळी अनुभव हाही एक गुरुच असतो.

शाळेत आपल्याला शिकवणारा शिक्षक मैदानावील लढतीसाठी आपल्याकडून कसून सराव करुन घेणारा प्रशिक्षक विविध परिक्षांच्या सरावांनी आपणाला व्यावहारिक पातळीवर गरजेचे असणारे गुण मिळवून देणारा क्लाससंचालक, एखाद्या कलेच्या प्राप्तीसाठी, उन्नतीसाठी, स्पर्धेसाठी मदत, मार्गदर्शन करणारा कलामार्गदर्शक, समन्वयक, अध्यापक हे अन् असे कितीतरी गुरु आपल्या अवतीभोवती वावरत असतात.

सर्वांत मोठी गुरु तर आई. ती आपल्याला जन्मापासूनच आपल्या संस्काराचे बाळकडू पाजते. म्हणूनच एक आदर्श माणूस, नागरिक, व्यक्ती म्हणून आपली जडणघडण होण्यात तिची मदत होते. मग या सगळ्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेचे निमित्तच का? इतर दिवशीही आपल्या मनात कृतज्ञता असतेच ना?

पण आपले आयुष्य समृद्ध करणार्‍या व्यक्तीविषयी विशिष्ट दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्यात मजा आहे. आपल्या वाढदिवशी आपल्याला साधा एक फोन, शुभेच्छा आशीर्वाद मनातून हवाहवासा वाटतोच ना! आपल्या आवडत्या व्यक्तीच्या वाढदिवशी खास बेत रचले जातात. त्याला सगळ्यात आधी शुभेच्छा देण्यासाठी आपण उत्सुक असतो. ''तू आम्हाला आवडतेस/आवडतोस'' ''आमचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत'' हे अन् असे अनेक शब्द मनाला प्रचंड उभारी, विश्वास देऊन जातात.

म्हणूनच शब्द हे सुद्धा आपले गुरुच. आपल्या मनातील विचारांना मूर्तरूप देण्यासाठी आपल्याला मदत करणारे इतरांचा आशीर्वाद, पाठिंबा इत्यादी भावना आपल्यापर्यंत पोहोचवून आपणास पुढच्या बाटेवर जाण्यास प्रोत्साहित करणारे गुरुच.