शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

स्नानाचे महत्त्व

स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये. जितके महत्त्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्त्व हे स्नानाला आहे. 
अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे.
 
ब्राह्ममुहूर्ताची अंघोळ म्हणजे 4 ते 6
मनुष्याची अंघोळ म्हणजे 6 ते 8
राक्षसांची अंघोळ म्हणजे 8 ते 10
प्रेत भुतांची अंघोळ म्हणजे 10 ते 12
त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड
ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ:
ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते. मनात नकारात्मक विचार येत नाही. आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि मनुष्याला एक उत्साह येतो. नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ती वाढते.

6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते:
ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्या सारखा वागतो. म्हणजे राग द्वेष कमी होतो.सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो. पण ब्रह्ममहुर्ताच्या अंघोळी इतका उत्साह मिळत नाही. फक्त मनुष्य सर्व बाबतीत समप्रमाणात असतो. सकाळी स्त्रोत्र वाचन झाल्यामुळे अर्धेपट त्याला दैवी शक्ती मिळते. 
 
राक्षसांची अंघोळ 8 ते 10:
ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो. मत्सर लोभ जास्त मनुष्यात येतो. दैविक शक्ती फार कमी मिळते. शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जडतात. अशक्तपणा BP मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो. कामात उत्साह नसतो. आळशीपणा काम करताना सतत येतो त्यामुळे मनुष्य सारखा चिडचिडा होतो. 
 
प्रेतभूतांची अंघोळ 10 ते 12: 
ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ती ही खूप आळशी होते. काम करायचा कंटाळा येणे, सतत झोपून राहणे, खूप खाणे. त्यामुळे अतिआम्लता, कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात. मनुष्य आळशी झाल्यामुळे त्याला कोणतेच काम करण्यात उत्साह वाटत नाही. तो मनुष्य इतका रागीट होतो की राग आला की त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही. 
 
तुम्ही कितीही झोपा काम करा पण सकाळची पूजा ही सकाळीच झाली पाहिजे. तरच त्याची शक्ती मिळेल. म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान देवपूजा केल्यावर थोड्यावेळ झोपले तर काही हरकत नाही पण स्नान देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे. तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाहीतर मग आजारांना आमंत्रण. कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते. म्हणून स्नान देवपूजा ह्या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे.