शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणुकांचा संपूर्ण इतिहास
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मे 2014 (15:35 IST)

चौथी निवडणूक : भारतीय राजकारणातील नवा अध्याय

1967 मध्ये झालेल्या चौथ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीने भारतीय राजकारणात एका नव्या अध्यालाला सुरुवात झाली. 1962 ते 67 च्या दरम्यान राजकारणात जे घडले त्याचे परिणाम देशाच्या राजकारणावर दीर्घकाळ उमटत राहिले. देशाला पहिल्यांदा दोन मोठय़ा युध्दांना तोंड द्यावे लागले. पहिले चीनबरोबर आणि दुसरे पाकिस्तानशी. 1962 च्या निवडणुकीनंतर काही महिन्यांनंतर ऑक्टोबरमध्ये भारत-चीन युध्द झाले. पंडित नेहरू यांचे हिंदी-चिनी भाई-भाई हे स्वप्न या युध्दात धुळीस मिळाले. हा धक्का सहन न झाल्याने पंडित नेहरूंचे दीड वर्षांच्या आतच निधन झाले. 1964 मध्ये नेहरूंच्या मृत्यूनंतर गुलजारीलाल नंदा काळजीवाहू पंतप्रधान बनले. काही दिवसानंतर नेहरूंचे उत्तराधिकारी म्हणून देशाची सूत्रे लालबहादूर शास्त्री यांचकडे सोपविण्यात आली.

1965 मध्‍ये भारत-पाकिस्तान युध्द झाले. सोविएत संघाच्या हस्तक्षेपामुळे युध्दविराम आणि ताश्कंद समझोता झाला. ताश्कंदमध्येच लालबहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू झाला आणि 1966 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. देश चालवण्यात इंदिरा गांधी नवख्या होत्या. 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काही मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्यात आल्या. 1963 मध्ये समाजवादी पक्षाचे डॉ. राममनोहर लोहिया फरुकाबादमधून विजयी होऊन पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले. स्वतंत्र पार्टीचे मिनू मसानी गुजरातमधील राजकोटमधून विजयी झाले. 1964 मध्ये समाजवादी नेते मधु लिमयेदेखील बिहारमधील मुंगेर मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकले. म्हणजेच इंदिरा गांधी यांना घेरण्यासाठी लोकसभेत अनेक दिग्गज पोहोचले. याचदरम्यान देशाच्या राजकारणात आणखी एक घटना घडली. वैचारिक मतभेदामुळे 1964 मध्ये भारतीय कमुनिस्ट पार्टीचे विभाजन झाले. भाकपापासून वेगळे होत ए. के. गोपालन, इ. एम. एस. नंबुद्रीपाद, बी. टी. रणदिवे आदी नेत्यांनी मार्क्सवादी कम्युमुनिस्ट पक्षाची स्थापना केली. या पाश्वभूमीवर 1967 ची सार्वत्रिक निवडणूक झाली.

संक्रमणावस्थेतून जाणार्‍या काँग्रेस आणि इंदिरा गांधींसाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. या निवडणुकीत लोकसभेच्या एकूण 494 जागांमध्ये वाढ होऊन त्या 520 करण्यात आल्या. 15 कोटी 27 लाख लोकांनी मतदान केले होते. याचा अर्थ मतदानाची टक्केवारी 61 इतकी होती. निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक होते. काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. त्यांना स्पष्ट बहुमत तर मिळाले, परंतु मागच्या निवडणुकीच्या तुलनेत लोकसभेतील संख्याबळ खूपच कमी झाले. यापूर्वीच तीन निवडणुकीत काँग्रेसला तीन चतुर्थाश जागा मिळाल्या होत्या. परंतु यावेळी मात्र त्यांच्या खात्यात फक्त 283 जागा आल्या. याचा अर्थ बहुमतापेक्षा फक्त 22 जागा त्यांना जास्त मिळाल्या. एरवी दोन-तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत असे. परंतु या निवडणुकीत 7 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. गुजरात, राजस्थान आणि ओरिसा या राज्यात स्वतंत्र पार्टीने त्यांना धक्का दिला. तर उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि दिल्लीत जनसंघाची सरशी झाली. बंगाल आणि केरळात कम्युनिस्टांकडून कडवे आव्हान मिळाले. या निवडणुकीत नव्याने स्थापन झालेली स्वतंत्र पार्टी काँग्रेसनंतर दुसर्‍या स्थानावर राहिली. त्यांनी 178 जागा लढवून 44 जागा पटकाविल्या. जनसंघाने 249 जागा लढवून त्यांच्या झोळीत 35 जागांचे दान पडले. भाकपला 23 आणि माकपला 19 जागांवर विजय  मिळाला. या दोन्ही पक्षात विभाजन झाले नसते तर जागांची संख्या आणखी वाढू शकली असती. अशीच स्थिती समाजवाद्यांचीही झाली. प्रजा सोशालिस्ट पार्टीला 23 जागा मिळाल्या, तर डॉ. लोहिया यांच्या सुंयुकत सोशालिस्ट पार्टीलादेखील तितक्याच जागांवर समाधान मानावे लागले. तमिळनाडूत द्रमुकने 25 जागांवर विजय मिळविला. या चौथ्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी 148 उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यापैकी 43 उमेदवार निवडून लोकसभेत पोहोचले. 58 जणांची अनामत रक्कम जप्त झाली. 866 अपक्ष उमेदवारांपैकी 35 उमेदवार निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले. एकूण या निवडणुकीत 2 हजार 369 उमेदवारांनी नशीब अजमावले होते. त्यापैकी 1 हजार 203 जणांची अनामत रक्कम जप्त झाली.

देशातील नऊ राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले. काँग्रेसपासून वेगळे झालेल्या चौधरी, चरणसिंगांनी उत्तर प्रदेशात भारतीय क्रांतिदल स्थापन केले. तर ओरिसात बिजू पटनायक यांनी बंडखोरी करून उत्कल काँग्रेसची स्थापना केली होती. पश्चिम बंगालमध्ये अजय मुखर्जी यांनी बांगला काँग्रेस हा नवा पक्ष निर्माण केला. समाजवादी आणि जनसंघ मिळून बिहारमध्ये बिगर काँग्रेस गटाचे नेतृत्व काँग्रेसमधून बाहेर पडलेले महामाया प्रसाद यांच्याकडे दिले होते.

1967 ची निवडणूक जिंकून अनेक दिग्गज लोकसभेत पोहोचले होते. त्यामध्ये इंदिरा गांधी, जॉर्ज फर्नाडिस, रवी रॉय, नीलम संजीव रेड्डी यांचा समावेश होता. इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडून आल्या. या मतदारसंघातून पूर्वी त्यांचे पती फिरोज गांधी निवडून येत असत. प्रखर समाजवादी नेते राममनोहर लोहिया पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक लढवून विजयी झाले. जनसंघाचे नेते बदलराज मधोक दक्षिण दिल्लीतून लोकसभेवर पोहोचले. जॉर्ज फर्नाडिस सोशालिस्ट पार्टीच्या तिकीटावर दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे दिग्गज एस. के. पाटील यांना पराभूत करून निवडून आले. बिहारच्या मधेपुरा मतदारसंघातून सोशालिस्ट पार्टीचे बी. पी. मंडल विजयी झाले. नंतर ते बहुचर्चित मंडल आयोगाचे अध्यक्ष झाले. आंध्रातील हिंदुपूर जागेवरून काँग्रेसचे नीलम संजीव रेड्डी निवडून आले. पुढे ते देशाचे राष्ट्रपती बनले. लालबहादूर शास्त्री यांच्या अलाहाबाद मतदारसंघातून त्यांचे पुत्र हरीकृष्ण शास्त्री विजयी झाले. बलामपूरमधून पुन्हा एकदा जनसंघाच्या तिकीटावर अटलबिहारी वाजपेयी निवडून आले. मध्यप्रदेशातील गुना मतदारसंघातून विजयाराजे सिंधीया निवडून आल्या. यावेळी त्यांनी काँग्रेसचा तग करून स्वतंत्र पार्टीकडून निवडणूक लढविली होती. व्ही. के. आर. व्ही. राव, मोरारजी देसाई, श्रीपाद अमृत डांगे, ए. के गोपालन, इंद्रजीत गुप्त, के. सी. पंत, विद्याचरण शुक्ला आणि भागवत झा आझाद पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले. महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण निवडून आले. याच निवडणुकीत समाजवादी नेते एस. एम. जोशी आणि काँग्रेसचे नेते सी. डी. देशमुख हे देखील विजयी होऊन लोकसभेवर पोहोचले.

या निवडणुकीत समाजवादी नेते किसन पटनाईक पराभूत झाले. 1962 च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांना पराभूत करणार्‍या सुभद्रा जोशी यावेळी अपयशी ठरल्या. डुमरीयागंज मतदारसंघातून नेहरूंच्या मंत्रिमंडळातील केसवदेव मालवी हे निवडणूक हरले. छोटे लोहिया या नावाने प्रसिध्द असलेले जनेश्वर मिश्र देखील या निवडणुकीत फुलपूरमधून पराभूत झाले. ही जागा पंडित नेहरूंची होती. 1964मध्ये त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नेहरूंच्या भगिनी विजालक्ष्मी पंडित यांनी विजय प्राप्त केला होता. 1967 च्या निवडणुकीत विजालक्ष्मी यांनीच या मतदारसंघातून जनेश्वर मिश्र यांचा पराभव केला. भाकपच्या तिकीटावर लागोपाठ तीनवेळा लोकसभेवर जाणार्‍या रेणू चक्रवर्ती यांच्या नशिबी मात्र चौथ्यावेळी पराभव आला.

या निवडणुकीनंतर दोन वर्षानी म्हणजे 1969 मध्ये मोठी फूट पडली. 1967 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे परिणाम या फुटीला कारण ठरले. मोरारजीभाई देसाई, के. कामराज, एस. निजलिंगप्पा, अतुल्य घोष, सदोबा पाटील, नीलम संजीव रेड्डी यासारख्या दिग्गज काँग्रेस जनांनी बंडाचा झेंडा फडकाविला आणि केवळ दोन वर्षातच इंदिरा गांधींचे सरकार अल्पमतात आले.  
-    प्रशांत जोशी