शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणुकांचा संपूर्ण इतिहास
Written By
Last Updated : शनिवार, 10 मे 2014 (17:54 IST)

पाचवी लोकसभा निवडणूक : इंदिरा गांधींचा गरिबी हटाव नारा गाजला

1971 च्या लोकसभा निवडणुकीत 55.27 टक्के मतदान झाले होते. 15 कोटी लोकांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर ‘गुंगी गुडिया’ म्हणून ज्यांनी अनादर केला होता, त्या विरोधकांना या निवडणुकीत उत्तर मिळाले. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत 352 जागांवर विजय प्राप्त केला. मतांमध्येही तीन टक्क्यांनी वाढ झाली. काँग्रेसला 43.68 टक्के मते मिळाली. एकूण 441 उमेदवारांना त्यांनी रिंगणात उतरविले होते. या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन वेगळा पक्ष स्थापन करण्यात आला होता. या पक्षाने 238 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 16 निवडून आले. जनसंघाला या निवडणुकीत धक्का बसला. त्यांना 22 जागांवर विजय मिळविता आला. यापूर्वीच निवडणुकीत त्यांना 32 जागा मिळाल्या होत्या. एकूण 157 उमेदवार त्यांनी निवडणुकीत उभे केले होते. त्यापैकी 45 जणांची अनामत रक्क्म जप्त झाली. सोशालिस्ट आणि स्वतंत्र पार्टीची कामगिरी खूपच खराब झाली. प्रजा समाजवादी पार्टी, सोशालिस्ट पार्टी आणि स्वतंत्र पार्टी या तिघांना मिळून फक्त 13 जागा मिळाल्या. कम्युनिस्टांच्या जागा मात्र या  निवडणुकीत वाढल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने 25 जागा जिंकल्या, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने आपल्या 23 जागा राखण्यात यश मिळविले. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या दोन राज्यात प्रादेशिक पक्षांनी जोरदार मुसंडी मारली. आंध्रात तेलंगणा प्रजा समितीला दहा जागांवर विजय मिळाला, तर तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या खात्यात 23 जागा गेल्या. या निवडणुकीत 14 अपक्ष उमेदवारदेखील निवडून आले. इंदिरा गांधी त्यांच्या  करिश्मामुळे विराधी पक्षातील दिग्गज नेत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. इंदिरा गांधींच्या विरोधात बंडखोरी करून नव्या पक्षाची स्थापना केलेल्या अनेकांनाही पराभूत व्हावे लागले. मोरारजी देसाई वगळता बंडखोर काँग्रेसमधील सर्व नेते पराभूत झाले. आंध्र प्रदेशातील अनंतपूर मदारसंघातून नीलम   संजीव रेड्डी यांचा काँग्रेसचे ए. आर. पोन्नाटी यांनी पराभव केला. बिहारमधील बाढ मतदारसंघातून बंडखोर काँग्रेसच्या तारकेश्वरी सिन्हा यांचा काँग्रेसचे धर्मवीर सिंह यांनी पराभव केला. अशोक मेहता, यमलाल बजाज, सुचेता कृपलानी आणि अतुल्य घोष हे सर्वजण काँग्रेस पक्षात बंडखोरी करून निवडणूक लढविले होते. त्यांना पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्रातील भंडारा मतदारसंघातील काँग्रेसच्या ज्वालाप्रसाद दुबे यांनी बंडखोर काँग्रेसचे अशोक मेहता यांचा पराभव केला, तर वर्धा येथून यमनालाल बजाज यांना गणपत कदम यांनी पराभूत केले. सुचेता कृपलानी फैजाबादमधून, तर अतुल्य घोष आसनसोलमधून हरले. या निवडणुकीत काही दिग्गज सोशालिस्ट नेत्यांनाही अपयश आले. बिहारमधील मुंगेर मतदारसंघातून मधु लिमये यांचा पराभव काँग्रेसच्या देवनंदन प्रसाद यादव यांनी केला. रवी रॉयचा पराभव काँग्रेसच जे. बी. पटनाक यांच्याकडून झाला. उडिसा येथील संभलपूरमधून किशन पटनाकदेखील पराभूत झाले. राजस्थानातील बाडमेर मतदासंघात जनसंघाचे भैरवसिंह शेखावत पराभूत झाले. भाकपचे नेते ए. बी. वर्धन हेदेखील 1971 ची निवडणूक हरले होते. महाराष्ट्रातील नागपूर मतदारसंघातून फॉरवर्ड ब्लॉकचे जे. बी. भोटे यांनी त्यांचा पराभव केला होता. भाकपच्या रेणू चक्रवर्ती आणि अरुणा असमअली यांनादेखील पराभवाचे तोंड पाहावे लागले.

या निवडणुकीत ‘गरिबी हटाव’चा नारा खूप प्रभावी ठरला. देशाच्या राजकारणात इंदिरा गांधी यांचा दबदबा कायम राहिला. पंडित नेहरू यांच्यानंतर कोण या प्रश्नाला 1971 च्या निवडणुकीतून उत्तर मिळाले. अटलबिहारी वाजपेयींसारख्या विरोधी पक्षातील नेत्याने इंदिरा गांधींचा ‘दुर्गा अवतार’ अशा शब्दात गौरव केला होता. 1977 मध्ये इंदिरा गांधींचा करिश्मा संपुष्टात आला.

1971 च्या निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा एकदा रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या. त्यांनी प्रसिध्द समजवादी नेते राजनाराण यांचा दणदणीत पराभव केला. दुर्दैवाने या निवडणुकीतील विजय पुढे इंदिरा गांधी यांच्या राजकीय पतनास कारणीभूत ठरला. राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या निवडीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. इंदिरा गांधी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपोग केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. न्यायालयाने हे आरोप योग्य ठरवून इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द केली. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदीही घातली होती. इंदिरा गांधी यांनी अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडला. त्यांनी देशात आणीबाणी लावण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला.

पाचच्या लोकसभा निवडणुकीत जे दिग्गज निवडून आले त्यापैकी दोघे पुढे राष्ट्रपती बनले तर चौघाजणांना पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळावी लागली. बारपेटा (आसाम) येथून फक्रुद्दीन अली अहमद, भोपाळ (मध्यप्रदेश) मतदारसंघातून डॉ. शंकरदयाळ शर्मा निवडून आले होते. तिसर्‍यांदा देशाच्या पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडून आल्या. बंडखोर काँग्रेसचे दिग्गज मोरारजी देसाई गुजरातमधील सूरत मतदारसंघातून लागोपाठ चौथ्यांदा निवडून आले. पुढे 1977च्या ऐतिहासिक सत्तापरिवर्तनानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. काँग्रेसमधून बाहेर पडून 1989 मध्ये पंतप्रधान झालेले विश्वनाथ प्रतापसिंह या व्ही. पी. सिंग या निवडणुकीत फुलपूर (उत्तर प्रदेश) मतदारसंघातून निवडून पहिल्यांदा लोकसभेवर गेले. जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यावेळी ग्वाल्हेर (मध्यप्रदेश)ची जागा जिंकून लोकसभेवर पोहोचले. पुढे 1988 आणि 2004 मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर कार्यवाहक पंतप्रधान म्हणून राहिलेले गुलजारीलाल नंदा कैथल (हरियाणा) मतदारसंघातून विजयी झाले.

पाचव्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले पुढे विविध राज्यांत मुख्यमंत्री बनले. हेमवतीनंदन बहुगुणा, प्रकाशचंद शेठी, जगन्नाथ मिश्र, भागवत आझाद, तरुण गोगोई, जानकीवल्लभ पटनायक, एस. एम. कृष्णा, सिध्दार्थशंकर रॉय, वीरभद्रसिंह यांचा त्यात समावेश होता. विजयाराजे सिंधीया मध्यप्रदेशातील भिंड मतदारसंघातून तर त्यांचे चिरंजीव माधवराव सिंधीया गुना मतदारसंघातून जनसंघाच्या तिकीटावर विजयी झाले.

पश्चिम बंगालमधून ज्योर्तिमय बसू (डायमंड हर्बर), इंद्रजीत गुप्त (अलीपूर), सोमनाथ चटर्जी (बर्धमान), महाराष्ट्रातून मधु दंडवते (राजापूर) हे पहिल्यांदा  लोकसभेवर निवडून गेले. महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले. प्रिरंजनदास मुन्सी (कोलकाता दक्षिण), बाबू जगजीवनराम (बिहार-सासाराम) हे दोघे सलग पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते.

- प्रशांत जोशी