गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणुकांचा संपूर्ण इतिहास
Written By वेबदुनिया|

आजपर्यंतच्या पंतप्रधानांचे तपशील

आजपर्यंतच्या पंतप्रधानांचे तपशील

WD
15 ऑगस्ट 1947 पासून आतापर्यंत झालेले एकूण 13 पंतप्रधानांविषयी माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सर्व पंतप्रधान भारताला कसे मिळाले आणि त्यांचा कार्यकाल केव्हा पासून केव्हापर्यंत राहीला? जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.

प्रथम पंतप्रधान जवाहरलाला नेहरू
कार्यकाळ : ऑगस्ट १५, इ.स. १९४७ - मे २७, इ.स. १९६४
जन्म : नोव्हेंबर १४, इ.स. १८८९, अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू : मे २७, इ.स. १९६४, नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी : कमला नेहरू
अपत्ये : इंदिरा गांधी
व्यवसाय : बॅरिस्टर

वैयक्तिक आयुष्य :
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी करण्यात आला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शीनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.

राजकीय आयुष्य :
नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रूची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसुकच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.

१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर कॉंग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.

सप्टेंबर १९२३ मध्ये पं. नेहरू अखिल भारतीय कॉंग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठीहल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय कॉंग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य गेच ध्येय्य निश्चित केले गेले. १९३० ते १९३५ दरम्यान मीठाचा आणि अन्य सत्याग्रहांमुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोरा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

लालबहादूर शास्त्री

WD
जीवन परिच

वाराणसी येथे १९०४ साली २ ऑक्टोबर रोजी एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणशीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले.

वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची किनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले.

नेहरू, शास्त्रीना कॉंग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविदवल्लभ पंतांचे सेक्रटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना कॉग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजिनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी कॉंग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले.पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

WD
गुलझारीलाल नंद
दोन वेळा देशाचे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1964मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर त्यांना कार्यवाहक पंतप्रधान बनवण्यात आले आणि 1966मध्ये लालबहादुर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांना देशाचे कार्यवाहक पंतप्रधान नेमण्यात आले. यांचे कार्यकाल दोन्ही वेळेस त्या वेळेपर्यंतच मर्यादित राहिले जोपर्यंत काँग्रेसने आपल्या नवीन नेत्याची निवड केली नाही.

इंदिरा गांध


WD
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या लढाईवेळी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या.

इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या कॉंग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणीमंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. शास्त्रीजींचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज यानी पाठिंबा देऊन ३५५ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या.

१४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्ल्यू स्टार या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या. १९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेतून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली.

इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

१९७१ चे भारत पाक युद्घ
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता. तर पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली.

मोरारजी देसा


WD
देसाई मोरारजी रणछोडजी : (२९ फेब्रुवारी १८९६). भारताचे चौथे पंतप्रधान (२६ मार्च १९७७ पासून). सुरत जिल्ह्यातील भदेली गावी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्यांचे वडील रणछोडजी हे प्राथमिक शिक्षक, तर आई मणिबेन (वाजिबेन) ही निरक्षर होती. मोरारजींचे प्राथमिक शिक्षण बलसाड येथे झाले. ते १५ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले (१९११). त्याच वर्षी गजराबेन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वडिलांच्या पश्चात कुटुंबाची सर्वच जबाबदारी ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांच्यावर पडली. १९१२ मध्ये मोरारजी मॅट्रिक व पुढे १९१७ मध्ये मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून बी.ए. झाले. १९१८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. मोरारजींना एक मुलगा व एक मुलगी आहे.

उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा देऊन (१९३०) ते गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाले. त्याबद्दल त्यांना पुढे तीन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ते गुजरात काँग्रेस कमिटीचे चिटणीस झाले (१९३१-३७). मुंबई प्रांताचे महसूल, सहकार, कृषी आणि जंगल खात्यांचे ते मंत्री होते (१९३७-३९). ‘छोडो भारत’ आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना १९४५ पर्यंत पुन्हा तुरुंगात जावे लागले. मुंबई प्रांतात गृह व महसूल मंत्री म्हणून त्यांनी १९४६-५२ या काळात काम केले व पुढे ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले (१९५२-५६). या काळात त्यांनी प्रथमच जमीनमहसुलाबाबत काही सुधारणा केल्या व मुंबई प्रांताची प्रशासनव्यवस्था अत्यंत कार्यक्षम केली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात व्यापार व उद्योगमंत्री म्हणून प्रवेश केला (१९५६-५८). या वेळी त्यांनी भारताला कर्ज मिळवून देण्यासाठी विविध देशांना भेटी दिल्या. १९५८ नंतर ते अर्थमंत्री असताना त्यांनी परराष्ट्रमदतीसाठी फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका, जपान वगैरे देशांचा दौरा केला आणि राष्ट्रकुल परिषद (१९५९), जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय चलन निधी परिषद (१९६०) यांना ते उपस्थित राहिले. कामराज योजनेनुसार त्यांनी राजीनामा दिला.

मार्च १९६६-६७ या काळात त्यांनी प्रशासकीय सुधारणा आयोगाची धुरा सांभाळली. मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकपाल व लोक-आयुक्त यांची स्थापना करावी, अशी महत्त्वाची शिफारस मोरारजींनी याच काळात केली होती. १९६७ मध्ये ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री व उपपंतप्रधान म्हणून आले. त्यांनी जपान, इंग्लंड, कॅनडा वगैरे देशांचे सदिच्छा दौरे केले. पण १९६९ च्या काँग्रेस पक्षातील दुहीनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते संघटना काँग्रेसचे लोकसभेतील नेते झाले. ते १९६२, ६७ व ७१ मध्ये लोकसभेवर निवडून आले होतेच. गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू, नवजीवन ट्रस्टचे अध्यक्ष, हिंदी प्रचार सभेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य, अखिल भारतीय दारूबंदी परिषदेचे सदस्य, गांधी स्मारक निधी, गांधी शांतता प्रतिष्ठान व कस्तुरबा ट्रस्ट यांचे विश्वस्त इ. नात्यांनी अनेक विधायक, सांस्कृतिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आला. संघटना काँग्रेसचे ते एक निष्ठावान कार्यकर्ते व नेते होते.
२५ जून १९७५ रोजी सबंध देशात आणीबाणी जाहीर करण्यात येऊन त्याच मध्यरात्री मोरारजींना अटक करण्यात आली. पुढे १८ जानेवारी १९७७ रोजी लोकसभेच्या निवडणुका घेण्यासंबंधीची घोषणा जाहीर झाल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर संघटना काँग्रेस, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल व समाजवादी पक्ष या चार पक्षांचे विलिनीकरण होऊन ‘जनता पक्षा’ ची स्थापना झाली (२३ जानेवारी १९७७). या पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. मार्च १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला बहुमत मिळून ह्या पक्षाचे केंद्र सरकार स्थापन झाले आणि मोरारजींची पंतप्रधान म्हणून निवड झाली.

चौधरी चरण सिं


WD
पंतप्रधान कार्यकाळ : जुलै २८ १९७९ - १४ जानेवारी १९८०
जन्म : डिसेंबर २३, इ.स. १९०२, नुरपूर, ब्रिटिश भारत
मृत्यू : मे २९, इ.स. १९८७, नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोक दल
पत्नी : गायत्री देवी
अपत्ये : अजित सिंग


चौधरी चरणसिंग हे पाचवे पंतप्रधान इतिहासाच्या काळकुपीत गडप झाले आहेत. ज्यांना आठवतात, त्यांच्या मनात जनता पक्ष फोडणारे, पंतप्रधान होण्यासाठी हटून बसणारे, अशीच प्रतिमा असणार. पण गांधीविचारांनी भारलेला, उच्चशिक्षित, वकिली सोडून तुरुंगात जाणारा, नेहरूंचा विरोधक, शेती हा भारताचे प्राण मानणारा, प्रखर राष्ट्रवादी, भ्रष्टाचाराची मनस्वी चीड असणारा, कठोर प्रशासक, मंडल आयोगाचा समर्थक... असा बहुश: अज्ञात नेता '.

त्यांच्या अखेरच्या काळात एसईझेड आले. त्यालाही त्यांनी विरोध केला. शेतजमिनीत कारखाने निघताना नेते उखळ पांढरे करून घेतात, याची त्यांना चीड होती. पिकाऊ जमिनी न घेण्याचा विवेक पाळला असता तर आजचे संघर्ष टळले असते. पहिल्या तीन पंचवाषिर्क योजनांमध्ये शेती विकासाला पुरेसे स्थान नव्हते. त्यावर चरणसिंग टीका करत. कम्यून शेती किंवा खासगी कंपन्यांची शेती हे ही त्यांना नको होते. लाखो शेतकरी जमिनीचे मालक असणे, यात त्यांना लोकशाहीची निजखूण दिसे.

पुढे जनता पक्षात परस्परविरोधी विचारांचे लोक एकत्र का नांदले, असा प्रश्न अनेकांना पडतो. चरणसिंग यांचा भारतीय लोकदल जनता पक्षात प्रमुख. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात 'सॉफ्ट हिंदुत्वा'चा अंत:प्रवाह होता.

दलितेतर मध्यम व कनिष्ठ जाती ही त्यांची मतपेढी. एकीकडे उच्चवर्ग व दुसरीकडे घटनेने सवलती मिळणारे दलित. दोन्हींत कनिष्ठ जातींची कोंडी झाली. त्या कोंडीला चरणसिंग यांनी आवाज दिला. म्हणूनच ते मंडल आयोगाचे समर्थक होते. हा वारसा पुढे व्ही. पी. सिंग यांनी चालवला. महेंदसिंग टिकैत हे त्यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांचे नेते झाले. मुलायमसिंग व पुत्र अजितसिंग त्यांचे राजकीय वारस बनले. मात्र, एकालाही त्यांची उंची गाठता आली नाही. जनता सरकारची 'त्रिमूर्ती' मोरारजी देसाई, चरणसिंग व जगजीवनराम. देसाई उच्चवर्णी, चरणसिंग दलितेतर मागास तर जगजीवनराम दलितांचे प्रतिनिधी. या तिघांत व्यक्तिगत तणाव होताच. पण ते त्यांच्या वर्गांच्या धगधगत्या आकांक्षांचे प्रतीक होते. त्या रस्सीखेचीत सरकारची मोट टिकणे कठीण होते.

राजीव गांधी


WD
इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे· इ.स. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)

राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. याबाबत दिल्लीत एका समारोहात राजीवगांधी काढलेले उद्गार पुढील प्रमाणे. “Some riots took place in the country following the murder of Indiraji. We know the people were very angry and for a few days it seemed that India had been shaken. But, when a mighty tree falls, it is only natural that the earth around it does shake a little.” जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे. या व्यक्तव्यावरून राजीव गांधीवर प्रचंड टीका झाली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.

राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.
इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

राजीव गांधी त्यानंतरही कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत. राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विश्वनाथ प्रतासिंग

WD
विश्व नाथ प्रताप : सामाजिक कार्यकर्ते व राजनीतिज्ञ. त्यांचा जन्म भूतपूर्व राजघराण्यात अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील राजे बहादूर रामगोपाल हे अलाहाबाद जिल्ह्यातील एका लहान संस्थानचे अधिपती होते. वयाच्या पाचव्या वर्षी मंडाच्या संस्थानाधिपतींनी ( ते सिंग यांचे चुलते होते ) त्यांना दत्तक घेतले आणि योग्य ते शिक्षण दिले. त्यांचे दत्तक-पिता १९४१ मध्ये वारले आणि व्ही. पी. सिंग मंडाचे अकराव्या वर्षीच राजे झाले. संस्थान विलीन होईपर्यंत ते महाराजा होते (१९४८). त्यांनी उच्च शिक्षण पुणे व अलाहाबाद विद्यापीठांत घेऊन बी.ए., बी.एस्‌सी. व एल्एल्.बी. पदव्या संपादन केल्या. विद्यार्थिदशेत ते वाराणसीतील उदयप्रताप महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते (१९४७-४८).

त्यांचा विवाह सीताकुमारी या शाही घराण्यातील युवतीशी झाला (१९५५). त्यांना दोन अपत्ये आहेत. विनोबा भावेंच्या भूदान आंदोलनात त्यांनी सहभाग घेऊन आपल्या अखत्यारीतील पसाना हा ग्रामीण परिसर भूदान चळवळीस दान केला (१९५७). त्यानंतर ते सक्रिय राजकारणाकडे वळले. ते १९६० मध्ये काँग्रेस पक्षात प्रविष्ट झाले. सुरुवातीस त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील उपचिटणीस, चिटणीस अशी पदे देण्यात आली. पुढे ते काँग्रेसतर्फे विधिमंडळावर ( उत्तर प्रदेश ) निवडून आले (१९६९-७१). तसेच ते अलाहाबाद विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद होते (१९६९-७१). त्यांच्याकडे १९७०-७१ मध्ये काँग्रेसचे प्रतोदपद देण्यात आले. पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात ते उपवाणिज्य मंत्री, नंतर त्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. या दरम्यान त्यांची राज्येसभेवर नियुक्ती करण्यात आली (१९७१-७४). त्यानंतर त्यांची लोकसभेवर निवड झाली. मध्यंतरी त्यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून श्रीमती इंदिरा गांधींनी निवड केली ( जून १९८०-८२). त्यांनी काही काळ उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले (१९८४). त्यांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली आणि पुन्हा ते लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ (१९८४-८६) आणि संरक्षण (१९८६-८७) ही खाती कार्यक्षम रीत्या सांभाळली. तथापि पंतप्रधानांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर ‘तुमचे शासन अत्यंत भ्रष्टाचारी आहे’, असा आरोप केला. परिणामतः त्यांना काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा आदेश देण्यात आला (१९८७).

त्यांनी जनमोर्चा या नवीन पक्षाची स्थापना केली. पुढे त्याचे विसर्जन जनता दलात करुन ते जनता दलातील एक प्रभावी नेते झाले. त्यानंतर समाजवादी जनता दल असे संयुक्त पक्षाचे नामकरण करण्यात आले (१९८८-९०). या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळविले; पण स्वबळावर शासन स्थापण्याइतपत त्यांच्याकडे संख्याबळ नव्हते. म्हणून भा.ज.प. व कम्युनिस्ट पक्ष यांच्या सहकार्याने नॅशनल फ्रंट (राष्ट्रीय आघाडी) स्थापण्यात आली. तिचे निमंत्रक (कन्व्हेनर ) व्ही. पी. सिंग होते. या आघाडीने त्यांना नेतृत्व दिले आणि व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले (१९८९). त्यांनी अनेक सामाजिक सुधारणांच्या योजना मांडल्या. त्यांपैकी मंडल आयोगाने १९८० मध्ये इतर मागासवर्गीय समाजासाठी आरक्षण सुचविलेल्या २७ टक्क्यांचा समावेश होता. याविषयी काही नेत्यांनी व्ही. पी. सिंग यांची बाजू घेतली; पण काँग्रेससह अनेक पक्षांनी या विधेयकाला संसदेत विरोध केला. उत्तर भारतात विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश येथे अनेक विद्यार्थी नाराज झाले. शिवाय भा. ज. प. अध्यक्ष अडवानी यांना रथयात्रेच्या निमित्ताने अटक करण्यात आली होती. त्यामुळे भा.ज.प. ने व्ही. पी. सिंगांचा पाठिंबा काढून घेतला. मंझिलसे जादा सफर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्घ आहे (२००६). प्रदीर्घ आजाराने दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

चंद्रशेखर

WD
यांचा जन्म इब्रा हिमपट्टी (जि. बलिया, उत्तर प्रदेश) या खेड्यात मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. विद्यार्थिदशेत त्यांनी फी वाढीविरुद्घ आंदोलन छेडले. याच काळात त्यांचा दुजादेवी या युवतीशी विवाह झाला. त्यांना दोन मुलगे आहेत. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम्.ए. ही पदवी मिळवली (१९५०). त्यांना पीएच्. डी. करावयाची होती; पण आचार्य नरेंद्र देवांच्या समाजवादी चळवळीकडे ते आकृष्ट झाले. १९५५ मध्ये ते सक्रि य राजकारणात आले. प्रजासमाजवादी पक्षाचे पुढे ते सरचिटणीस झाले आणि त्यांची राज्यसभेवर निवड झाली (१९६२). त्यांनी डायनॅमिक्स ऑफ सोशल चेंज (१९६४) हे भारतीय अर्थशास्त्रावर पुस्तक लिहिले आणि यंग इंडियन या साप्ताहिकाचे संपादनही काही वर्षे केले.

चंद्रशेखर सदानंद सिंगचंद्रशेखर सदानंद सिंगअशोक मेहतांमुळे ते काँग्रेसमध्ये गेले (१९६५). श्रीमती इंदिरा गांधींसाठी त्यांनी प्रचार केला व ‘सिंडिकेट’ चौकडीविरुद्घ पक्षांतर्गत बंड पुकारले. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संजीव रेड्डींचा पराभव करुन गिरींना निवडण्यात त्यांनी श्रीमती इंदिरा गांधींना सहकार्य केले. ‘तरुण तुर्क’ म्हणून त्यांची महती वाढली; ‘गरिबी हटाव’ ही त्यांचीच अभिनव कल्पना होय, मात्र श्रीमती इंदिरा गांधींच्या व्यक्तिकेंद्रित निर्णयाविरुद्घ यंग इंडियन या साप्ताहिकातून त्यांनी घणाघाती टीका केली आणि जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीस त्यांनी पुढे १९७५ मध्ये पाठिंबा दिला. देशात आणीबाणी जाहीर झाली आणि चंद्रशेखरांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांना स्थानबद्घ करण्यात आले. तुरुंगात त्यांनी मेरी जेल डायरी हे पुस्तक लिहून तत्कालीन अनुभव कथन केले (१९७६). आणीबाणीनंतर चंद्रशेखर जनता पक्षात सामील झाले (१९७७). त्यांना जनता पक्षाचे अध्यक्षपद देण्यात आले. हे पद त्यांनी दीर्घकाल उपभोगले (१९७७ - ८७). १९७९ मध्ये त्यांनी भारतभर दौरा केला. चंद्रशेखर हे बलिया मतदारसंघातून सलग १९७७ ते १९८४ आणि १९८९ नंतर २००१ पर्यंत लोकसभेत खासदार होते.

त्यांनी कन्याकुमारीपासून राजघाटपर्यंत सु. ४,२६० किमी.ची प्रदीर्घ पदयात्रा काढून जनतेशी थेट संपर्क साधला होता (१९८२). भारताने अणुबाँब बनविण्याच्या कल्पनेस त्यांचा व्यक्तिगत विरोध होता. त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात १९८५-८६ मध्ये मतभेद झाले आणि जनता दल या नवीन पक्षाची स्थापना झाली (१९८८). पुढे सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेसचा पराभव झाला (१९८९) आणि जनता दल, भाजप व डावे गट यांच्या पाठिंब्याने केंद्रात व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सरकार सत्तारुढ झाले; पण जनता दलात व्ही. पी. सिंग यांच्या धोरणांसंबंधी, विशेषतः मंडल आयोग, राखीव जागा आणि रामजन्मभूमी - बाबरी मशीद या प्रश्नांवरुन, मतभेद निर्माण झाले. रामजन्मभूमीच्या संदर्भात अडवानींनी रथयात्रा काढली. त्यांना २२ ऑक्टोबर १९९० रोजी अटक होताच भाजपने शासनाचा पाठिंबा काढून घेतला. परिणामतः चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतील ५८ खासदारांनी पक्षातून बाहेर पडून समाजवादी जनता दलाची स्थापना केली आणि काँगेस (इंदिरा ), अण्णा द्र. मु. क. व अपक्ष यांच्या पाठिंब्याने चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता हस्तगत केली (१९९०).१६ नोव्हेंबर १९९० मध्ये लोकसभेत चंद्रशेखरांनी आपल्या सरकारवर विश्वास संत करुन घेतला आणि ते भारताचे आठवे पंतप्रधान झाले.

पामुलपर्ती वेंकट नरसिंहरा


WD
हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.

राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अश्या तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांचे मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या.

राजकारणात प्रवेश

त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

पंतप्रधानपद

राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणुक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.

नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरूद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली.
तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले.
जुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला.

अटलबिहारी वाजपेयी

WD
हे माजी भारतीय पंतप्रधान आणि हिंदी कवी आहेत. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. त्यानी नुकतीच सक्रीय राजकरणातून निवृत्ती घेतली आहे. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भुषविली आहेत.

राजकीय प्रवासाची सुरूवात
राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते लवकरच श्याम प्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकिर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला. त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.

भारतीय जनसंघ
भारतीय जनसंघ विपक्षातला प्रबळ घटक असूनही राष्ट्रीय काँग्रेसला सत्तेवरून दूर सारू शकला नाही. दरम्यान नव्याने स्थापन झालेला काँग्रेस (आय) (Congress(I)) पक्ष सत्तेवर आला. तद्नंतर १९७५ साली इंदिरा गांधी यानी देशात आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या विविध पक्ष आणि घटकांसोबत हातमिळवणी केली. याच दरम्यान त्यांना विरोधाबद्दल तुरूंगवास भोगावा लागला. १९७७ मधे इंदिरा गांधी यानी राजीनामा दिला. यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनसंघाने अनेक सामाजिक आणि प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची निर्मिती केली. जनता पार्टीला निवडणुकांत बहुमत प्राप्त होऊन मोरारजी देसाई याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. वाजपेयी हे नवी दिल्ली येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यानी स्वीकारली.

या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी १९७९ मध्ये चीन भेटीवर गेले. १९६२ च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानला सुद्धा भेट दिली. १९७१ च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. वाजपेयी यानी Conference on Disarmament (निःशस्त्रीकरण परिषद) मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणु-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७ च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. अखेर १९७९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील कारवाईमुळे त्यांनी राजीनामा दिला.

भारतीय जनता पक्ष (भाजप) ची स्थापना
जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. वाजपेयी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यातील मित्र खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपाचा पाठिंबा असला तरी इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकाकडून झालेल्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीख विरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. तरी भाजपा वरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता, त्यामुळेच रामजन्मभूमीच्या वि.हिं.प. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाला भाजपाने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वास्तु पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला.

तरी देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होत राहिला. १९९५ च्या मार्चमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५ च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६ च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.

एचडी देवेगौड़


WD
अटलजी यांची सरकार पहिल्यांदा 13 दिवस चालली आणि ती पडली. तेव्हा काही दिग्गज नेत्यांना अशा नेत्यांचा शोध होता, जो त्यांच्यानुसार सरकार चालवेल आणि ज्याला केव्हाही बाहेर काढू शकता येईल.

तेव्हा हरदनहल्ली डोड्डेगौड़ा देवेगौड़ा या परीक्षेत खरे ठरले. ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते. त्यांना मुख्यमंत्री पदावरून त्यागपात्र दिलावून देशाचे पंतप्रधान म्हणून सुशोभित करण्यात आले. ते देशाचे मात्र 10 महिन्यापर्यंत पंतप्रधान राहिले. 21 एप्रिल 1997ला त्यांना पंतप्रधानाचे पद सोडावे लागले.

याचे कारण काँग्रेस ठरले. त्याने देवेगौड़ाकडून समर्थन परत घेतले. देवेगौड़ा लोकसभेत सर्व पक्षांना हे विचारत फिरत होते की त्यांची चूक काय आहे? ज्यामुळे त्यांना एवढी मोठी शिक्षा देण्यात येत आहे. पण दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांना रात्री स्वप्न पडत होते की आता नाही तर कधीही नाही, म्हणून त्यांना लवकरात लवकर पंतप्रधान बनायचे होते.

म्हणून एक निरपराध पंतप्रधानांना बळीचा बकरा बनवण्यात आले. 19 मार्च 1997ला देवेगौड़ा यांना त्यांच्या पदाचा त्याग करावा लागला. अंतरिम व्यवस्थेत ते दोन दिवस अजून पंतप्रधान राहीले.

इंद्रकुमार गुजराल


WD
यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या झेलम या शहरात झाला. त्यांनी इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला आणि त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले होते.

राजकीय कारकीर्द सुरुवात
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दिल्ली महानगरपालिकेपासून झाली. इ.स. १९५९ ते इ.स. १९६४ या काळात त्यांनी महानगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम बघितले. इ.स. १९६४ मध्ये ते राज्यसभेवर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. इ.स. १९६७मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना संसदीय कामकाज आणि दळणवळण या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून नेमले. नंतरच्या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण, नगरविकास आणि दूरसंचार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम केले.

आणीबाणी
जून १२, इ.स. १९७५ रोजी ते माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधींची १९७१ मध्ये झालेली लोकसभेवरील निवडणूक काही तांत्रिक कारणांवरून रद्दबादल ठरवली आणि त्यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवायला बंदी घातली. त्यानंतर इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी याने दिल्लीशेजारील उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधील इंदिरा गांधी समर्थकांचे त्यांच्या समर्थनार्थ विशाल मेळावे दिल्ली शहरात आयोजित केले.असे म्हटले जाते की तेव्हा संजयने इंद्रकुमार गुजराल यांना त्या मेळाव्यांना सरकारी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसिद्धी देण्याचा आदेश दिला. परंतु संजय हा केवळ पंतप्रधानांचा मुलगा होता आणि तो कोणतेही घटनात्मक पद भूषवित नसल्याने त्यांनी त्याचा आदेश पाळायला स्पष्टपणे नकार दिला. त्या कारणामुळे त्यांचे यांचे खाते बदलून त्यांना नियोजन खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले, असेही म्हटले जाते. इ.स. १९७६ मध्ये सरकारने त्यांना भारताचे सोव्हियेट संघातील राजदूत म्हणून नेमले. ते त्या पदावर इ.स. १९८०पर्यंत होते.

पंतप्रधान
मार्च ३०, इ.स. १९९७ रोजी संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा येणाऱ्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतला. एप्रिल ११, इ.स. १९९७ रोजी देवेगौडा सरकार कोसळले. पण त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि काही विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी यांच्यादरम्यान तडजोड झाली. महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला डावलले जाणार नाही या अटीवर, काँग्रेस पक्षाने संयुक्त आघाडीने बनवलेल्या सरकारला नव्या नेत्याचा नेतृत्वाखाली पाठिंबा द्यायचे मान्य केले. संयुक्त आघाडीने श्री. इंद्रकुमार गुजराल यांना नेतेपदी नेमले आणि एप्रिल २१, इ.स. १९९७ रोजी त्यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.

गुजराल फुप्फुसांच्या विकाराने त्रस्त होते. निधनापूर्वी ते वर्षभरापासून त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. १९ नोव्हेंबर २०१२ ला तब्येत अधिक ढासळल्याने त्यांना गुडगाव येथील मेदांता इस्पितळात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.[३] नोव्हेंबर २९, इ.स. २०१२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

मनमोहनसिंग


WD
हे भारताचे १७वे पंतप्रधान (विद्यमान, मे २२, इ.स.२००४पासून) आहेत. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत सध्या आसामाचे प्रतिनिधित्व करतात. हे भारताचे पहिले शीख धर्मीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी हे इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्रीही होते. त्या काळात यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.

आरंभिक जीवन
त्यांचा जन्म सप्टेंबर २६, इ.स. १९३२ रोजी गाह, पश्चिम पंजाब (आता पाकिस्तान मध्ये) झाला. ते अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात कार्यरत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री ललित नारायण मिश्रा यांनी सिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.

जीवनक्रम
सन १९५७ ते १९६५ - चंदिगढ मधील पंजाब विश्वविद्यालय मध्ये प्राध्यापक
इ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे चे प्राध्यापक
इ.स. १९७६ - दिल्ली चे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय मध्ये मानद प्राध्यापक
इ.स. १९८२ से १९८५ भारतीय रिजर्व बँक चे गवर्नर
इ.स. १९८५ से १९८७ - भारताचा योजना आयोगाचे चे उपाध्यक्ष
इ.स. १९९० से १९९१ - भारतीय प्रधानमंत्र्यांचे चे आर्थिक सल्लागार
इ.स. १९९१ - नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार मध्ये अर्थमंत्री
इ.स. १९९१ - आसाम मधून राज्यसभा चे सदस्य
इ.स. १९९५ - दुसर्यावेळी राज्यसभा सदस्य
इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मध्ये मानद प्राध्यापक
इ.स. १९९९ - दक्षिण दिल्ली मधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले.
इ.स. २००१ - तिसर्यावेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधीपक्ष नेता
इ.स. २००४ - भारताचे प्रधानमंत्री
या शिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक च्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.