शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2016 (15:03 IST)

होलिका दहन..!!

असृक्पाभसंत्रस्ते: कृता त्वं होलि बालिशै:।
अतस्त्वां पूजषिमि भूते भूतिप्रदा भव।।
 
होळी म्हणजे काय, ती का उभारतात, तिची पूजा केल्याने खरोखर कुणाची पूजा होते, त्यासंबंधी काही कल्पना पूजापद्धतीवरून व तत्संबंधीच्या कथेवरून येण्यासारखी आहे.
 
होलिकोत्सव मोठा रहस्यपूर्ण आहे. यात होली, ढुंढा, प्रल्हाद आहेतच, त्याचबरोबर स्मरशांतीही आहे. शिवाय या दिवशी नवान्नेष्टीही करतात. ‘धर्मध्वज’ राजाच्या पदरीचे शूर, सामंत, शिष्टजन माघी पौर्णिमेला सकाळी वाजत-गाजत व लव्याजम्यानिशी नगराबाहेर वनात जात आणि शास्त्रासहित वृक्ष घेऊन येत. गंधादी उपचारांनी याची ते पूजा करीत आणि नगरा बाहेर पश्चिम दिशेला तो पुरीत. लोकांत हा पुरलेला वृक्ष ‘होळी’ ‘होलीदंड’ किंवा ‘प्रल्हाद’ या नावाने ओळखला जातो. पण याला ‘नवान्नेष्टी’चा यज्ञस्तंभ म्हटले तरी चुकणार नाही.
 
पूजा विधी - हे एक व्रत आहे. हे व्रत करणार्‍याने फाल्गुन पौर्णिमेला सकाळी स्नान करून नित्यकर्मे उरकून ‘मम बालक बालिकादिभि: सह सुख शांतिप्रीतर्थ होलिकाव्रत करिष्ये।।’ असा संकल्प करून होळीच्या जागी जलसिंचन करून ती जागा शुद्ध करावी. त्या ठिकाणी वाळलेली लाकडे, गोवर्‍या नीट पसरावत. नंतर संधकाळच्या वेळी प्रसन्न मनाने सर्व नगरवासियांसमवेत वाजत-गाजत लवाजम्यासह होळीच्या जागी जावे.
 
पौर्णिमा लागताच एखाद्या नवप्रसूता स्त्रीच्या किंवा अंत्यजाच्या घरामधून बालकाकरवी अग्नी आणून होळी पेटवावी. तिचा संकल्पही बालकांच्या किंवा सर्वांच्या शांतीसाठीच आहे. होळी पेटल्यावर गंध-पुष्पादी उपचारांनी तिची पूजा करावी. ‘असृक्पाभय संत्रस्ते:..’ असा मंत्र म्हणून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्या किंवा प्रार्थना करून अर्घ्य सोडावे. नंतर होलिदंडावर किंवा शास्त्री ‘यज्ञस्तंभा’वर थंड पाणी शिंपडून तो बाजूस राहू द्यावा. नंतर घरून आणलेले पदार्थ, नैवेद्य, नारळ वगैरे होळीत टाकून जव, गव्हाच लोंब्या, हरभर्‍याचे घाटे अग्निज्वालेत शेकून घेऊन आणि यज्ञसिद्ध नवान्न, होळीचा अग्नी व थोडे भस्म घेऊन आपापल्या घरी जावे. घरी गेल्यावर अंगण शेणाने सारवावे व तेथे अन्नधान्य पसरावे. तवेळी मुलांनी काष्ठखड्गांना स्पर्श करून आनंदाने उद्घोष करावा. रात्रीच्यावेळी त्यांचे संरक्षण करून त्यांना गुळाची पोळी वाढावी. असे केल्याने ढुंढाचा दोष निवारण होतो आणि या होलिकोत्सवाने अपार सुखशांती लाभते, अशी पूर्वापार लोकांची श्रद्धा आहे. याच सुमारास जव, गहू आणि हरभरा यांची शेते पिकून तयार झालेली असतात व धान्य कापून ती घरी नेणोयोग्य व वापरण्यायोग्य झालेली असतात. पण धार्मिक वृत्तीचे हिंदुलोक यज्ञेश्वराला धान्य अर्पण केल्याखेरीज ते नवीन धान्य सेवन करीत नाहीत म्हणून शेणी वगैरे एकत्र करून, त्यावर विधिपूर्वक अग्नीची स्थापना, प्रतिष्ठा, प्रज्वलन पूजन करून यवगोधूमादी (साळी, गहू) धान्याची आहुती म्हणून लोंब्याची   आहुती लोक ‘होळी’मध्ये देतात व शेष धान्य घरी आणतात.
 
शास्त्राने कोठेही ओले वृक्ष म्हणजेच हिरवी वनरी होळीसाठी नष्ट करण्यास सांगितले नाही. ‘वाळलेली लाकडे’ असाच संकेत आहे. त्यामुळे लोकांनी शास्त्रशुद्ध ‘होलिका पूजन’ केल्यास आपल सर्वश्रेष्ठ संस्कृतीचे व तिच्या लोकोद्धारार्थ मूल्यांचे यथोचित संगोपन घडेल यात काहीच शंका नाही..! 
 
होळीच्या उष्णतेमुळे वातावरणात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते, असेही सांगितले जाते.