शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

विनायक दामोदर सावरकर

ब्रिटिशांविरोधात क्रांतीची ज्योत पेटवून त्यात स्वतःच्या आयुष्याची आहूती देणारे वीर सावरकर म्हणजे एक धगधगते जीवन आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्म झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या शिवाजी हायस्कूलमदून झाले. येथून 1901 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. अभ्यासात त्यांना विशेष रुची होती. लहानपणी त्यांनी काही कविताही रचल्या होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काम करण्याकरता त्यांनी गुप्तपणे 'मित्र मेळा' संस्थाही चालवली होती. अभिनव भारत ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. 

पुढे शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. बंगालच्या फाळणीनंतर त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळीही केली. पुण्यात फर्गसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी दिलेली भाषणे राष्ट्रभक्तीने ओसंडून वाहणार्‍या खळाळत्या झर्‍यासारखीच होते. टिळकांच्या शिफारशीने त्यांना 1906 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली आणि ते लंडनला गेले. 'इंडियन सोशोलॉजिस्ट व तलवार या वृत्तपत्रातून त्यांनी अनेक लेख लिहिले. ते नंतर कलकत्ता येथील 'युगांतर' मध्येही प्रकाशित झाले.

रशियन क्रांतिकारकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. लंडनच्या वास्तव्यात त्यांची गाठ लाला हरदयाल यांच्याशी पडली. हरदयाल तेथे इंडिया हाउस चालवायचे. मदनलाल धिग्रास फाशी दिल्यानंतर त्यांनी 'लंडन टाइम्स' मध्येही एक लेख लिहिला होता. धिंग्रांचे म्हणणे मांडणारी पत्रके त्यांनी वाटली. त्यांचे जहाल विचार अडचणीचे ठरतील हे हेरून त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली. तेथून बोटीने भारतात आणताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ बोटीतून उडी गाठून बंदर गाठले. पण फ्रान्सच्या सैनिकांनी त्यांना परत ब्रिटिशांच्या ताब्यात दिल्याने त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.

भारतात त्यांच्यावर खटला चालवून त्यांना पन्नास वर्षांच्या दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी ब्रिटिश शासन तरी शंभर वर्षे टिकेल काय असा प्रश्न विचारला. १९११ ते १९२१ पर्यंत ते अंदमान तुरुंगात राहिले. २१ मध्ये काही अटींवर त्यांना भारतात परत आणले. त्यानंतर तीन वर्षे ते नजरकैदेत होते.

तुरूंगाच्या कालावधीत त्यांनी हिंदुत्वावर शोध ग्रंथ लिहिला. १९३७ मध्ये त्यांची हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. १९४३ नंतर त्यांचे दादर, मुंबई येथे त्यांचे वास्तव्य होते. ते अखेरपर्यंत अखंड भारताचे पुरस्कर्ते राहिले. स्वातंत्र्यप्राप्तीबद्दल गांधीजी व सावरकरांच्या विचारधारेत भिन्नता होती. सावरकरांनी १८५७ वर पुस्तक लिहून तोपर्यंत बंड म्हणून हिणवण्यात येत असलेल्या या लढ्याला स्वातंत्रसमर संबोधले. २६जानेवारी १९६६ मध्ये प्रायोपवेशन करून त्यांनी प्राण सोडले.