शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. निवडणूक बातम्या
Written By WD|
Last Updated :नवी दिल्ली , गुरूवार, 6 मार्च 2014 (10:52 IST)

देशात आचारसंहिता लागू; 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान

16 लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान होणार होणार आहे. 16 मे रोजी निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुक्त पी. व्ही संपथ बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच देशभर आचारसंहिता लागू करण्‍यात आली आहे.
 
यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत नऊ टप्प्यात मतदान होणार आहे. 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान हे मतदान होईल. 16 मे रोजी देशातील सर्व 545 मतदारसंघात मतमोजणी होईल. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघासाठी 10, 17 आणि 24 एप्रिलला तीन टप्प्यात मतदान होईल. याचवेळी निवडणूक आयोगाने तेलंगणा, सीमाध्रं, ओडिशा, सिक्कीम या राज्यांतील विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या. देशातील हवामान व पावसाचा अंदाज घेऊनच वेळापत्रक तयार केल्याचे आयुक्त पी. व्ही संपथ यांनी सांगितले.
 
एक जून रोजी लोकसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे 31 मेपूर्व देशात निवडणुका होऊन नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी राष्ट्रपतींकडे देणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल. तर 12 मेला 9 व्या टप्प्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखांवरून 70 लाख रुपये करण्यात आली आहे. 
 
10 एप्रिलला तिस-या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, रामटेक, नागपूर, भंडारा-गोदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली,  यवतमाळ आदी 10 मतदारसंघात मतदान होईल.
 
17 एप्रिलला पाचव्या टप्प्यात हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 19 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल.
 
24 एप्रिल सहाव्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड इत्यादी 19 मतदारसंघात मतदान होईल.
 
यंदा प्रथमच सर्वाधिक 81 कोटी 40 लाख मतदार मतदान करणार आहेत. यंदा 10 कोटी मतदार वाढले आहेत. याचबरोबर यंदा 18 ते 35 वयोगटातील सर्वाधिक मतदार आहेत. 
 
नऊ टप्प्यांत होणा-या मतदानांसाठी एकूण 8 लाख मतदान केंद्रे असतील तर, 12 लाख मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या यादीत आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’ (नोटा) या बटणाचा पर्यायही मिळणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह त्याचे कागदोपत्री रेकॉर्डही ठेवले जाणार असल्याची माहिती संपथ यांनी दिली.
 
लोकसभा निवडणुकीची टप्पे: 
पहिला टप्पा: 7 एप्रिल, 2 राज्ये, 6 मतदारसंघ
दुसरा टप्पा: 9 एप्रिल, 5 राज्ये, 7 मतदारसंघ
तिसरा टप्पा: 10 एप्रिल, 14 राज्ये, 92 मतदारसंघ
चौथा टप्पा: 12 एप्रिल, 3 राज्ये, 5 मतदारसंघ
पाचवा टप्पा: 17 एप्रिल, 13 राज्ये, 122 मतदारसंघ
सहावा टप्पा: 24 एप्रिल, 12 राज्ये, 117 मतदारसंघ 
सातवा टप्पा: 30 एप्रिल, 9 राज्ये, 89 मतदारसंघ
आठवा टप्पा: 7 मे, 12 राज्ये, 64 मतदारसंघ
नववा टप्पा: 12 मे, 3 राज्ये, 41 मतदारसंघ 
मतमोजणी: 16 मे ला (देशभरातील सर्व 545 मतदारसंघाची)