गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्ह कोटेशन
Written By वेबदुनिया|

नियोजन करा, वाद टाळा!

WD
लग्नाच्या वेळी अग्नि भोवती सात फेरे घेण्याची प्रथा आपल्याकडे आहे. यामुळे सात जन्म नातं टिकतं असं मानलं जातं, पण अनेकदा सात जन्म काय, सात वर्षेही ही नाती टिकत नाहीत. लग्न असो व प्रेमप्रकरण, ही नाती टिकण्यासाठी काय करावं असा प्रश्न अनेक तरुणांना पडतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टींमुळे नाती तुटतात. अनेकांच्या घरांमध्ये हा प्रश्न असतो. नाती कशी टिकवायची असा प्रश्न असणार्‍यांनी काही गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पती-पत्नीच्या नात्यात अनेकदा इगो अर्थात अहंकार आडवा येतो. अहंकार ही अशी समस्या आहे, ज्यामुळे नाती तुटू शकतात. प्रत्येक व्यक्तींमध्ये अहंकार असतोच आणि तो कधी ना कधी उफाळून येतो. हा अहंकार अनके गोष्टींचा असतो. अहंकार उफाळून आल्यामुळे भांडणं होतात आणि त्याचं रुपांतर कधी कधी घटस्फोटातही होतं.

ही भांडणं व्हायला अनेक कारणं असतात. वेळेचं नियोजन न केल्यामुळे अनेकांच्या आयुष्यात वाद निर्माण होतात. एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल आणि दोघांपैकी एक तयार झाला असेल तर तयार न झालेल्या व्यक्तीवर दोषारोप सुरू होतात. जबाबदार्‍या एकमेकांवर टाकण्याची सवयही अनेकांना असते. लग्नाआधी एकमेकांची काळजी घेणार्‍या या व्यक्ती लग्नानंतर मात्र वेगळीच वागू लागतात. लग्नाआधी पहले आप, पहले आप अशा गोष्टी करणार्‍या व्यक्ती लग्नानंतर मात्र उलट्याच वागू लागतात. माझ्या कपड्‍यांना इस्त्री का केली नाही, मला माहेरी का जाऊ दिलं नाही, अशी वाक्ये जोडप्यांमध्ये ऐकायला मिळतात. असं न होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

थोडा वेळ काढून प्रत्येकाने आपल्या वागण्याचा विचार करायला हवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याप्रमाणेच जोडीदाराच्याही काही अडचणी आहेत हे लक्षात घ्यायला हवं. पत्नीची जबाबदारी आहे, तितकीच पतीचीही ती आहे. गृहिणी असली तरी पत्नीलाही वर्क लोड असते, डेडलाईन असते याची जाणीव विशेष करून पतीने ठेवायला हवी. असं झालं तर आपलं दांपत्य जीवन अधिक सुखकारक होईल.