बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. महाराष्ट्र दिन
Written By वेबदुनिया|
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2010 (15:04 IST)

सुवर्णमहोत्सवी वर्षातील पंचरत्ने

- केदार पाटणकर

PR
PR
दादासाहेब फाळके हे मराठी गृहस्थ होते आणि म्हणूनच त्यांचे; पर्यायाने मराठी चित्रपटांचे स्मरण महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात करण्यात शहाणपण आहे. 'श्वास'ने इतिहास घडविला, त्यालाही आता सात वर्षे होऊन गेली. नंतर मराठी प्रेक्षकांनी कधीही पाहिले नसतील असे मराठी चित्रपट येऊन गेले.

सुवर्णमहोत्सवी वर्षात काही महत्त्वाचे चित्रपट आले, काही येऊ घातले आहेत. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा चित्रपट या वर्षात आला, हा सोनेरी योगायोग आहे. नशिबाने परेश मोकाशीने याच वर्षात चित्रपट पूर्ण करून प्रदर्शित केला. त्याचे सर्वच पातळ्यांवर कौतुक होत आहे. हा विषय मांडायला अवघड होता.नेहमीप्रमाणे टीकाकारांसाठी सोडलेल्या अवकाशात काही मुद्दे आहेतच. शिवाय, फाळक्यांच्या एका नातेवाईकानेही चित्रपटावर नुकतीच एका संदर्भात टीका केली आहे. या टीका मान्य करुनही परेशने खूपच चांगली कामगिरी बजावली आहे, हे नोंदवले जातेच. मराठी माणूस, महाराष्ट्र काय आहेत हे समजण्यासाठी या चित्रपटाचे डबिंग होऊन तो इतर राज्यात पोचणे गरजेचे आहे.

IFM
IFM
'विहीर' ही उमेश कुलकर्णीने चित्रपटसृष्टीलाच दिलेली भेट आहे. असे चित्रपट भारतात बनत नाहीत. पूर्वी दिल्ली दूरदर्शनवर रात्री असे चित्रपट दाखवले जायचे आणि प्रेक्षक 'कंटाळवाणा' म्हणून बंद करायचे. पौगंडावस्थेतील मुलाचे चित्रण हा तर मराठी चित्रपटसृष्टीत नाकं मुरडण्यासाठी आयता सापडलेला विषय आहे. विशेषतः जे लोक सतत चित्रनगरी, कोल्हापूरचा बंगला इथेच चित्रीकरण करतात त्यांच्यासाठी.

'जोगवा' हे आणखी एक धाडस. जोगत्या आणि जोगतिणीचं जगणं तसं आधी चित्रपट व कादंब-यांतून थोडं झालेलं आहे. हा चित्रपट पूर्ण याच विषयावरचा आहे. उपेंद्र लिमयेने केलेली तायप्पाची भूमिका हा चित्रपटाचा महत्वाचा भाग आहे. भोवताली इंटरनेट, शहरीकरण यांचा प्रभाव पडत असतातना शहरी प्रेक्षकांसाठी असे चित्रपट घेऊन येणं, यालाच धाडस म्हणतात. पुरुषाने रंगवलेला हिजडा, ही आंबटशौकिनी रसिकता घेऊन चित्रपट पाहायला कोणाला जायचे असेल तर ती व्यक्ती वेडी आहे. .

'गंध' तीन गोष्टींचा चित्रपट आहे. सहसा असे चित्रपट हमखास फसतात. अनेक कथांचा शेवट कोणत्यातरी एका ठिकाणी करण्याच्या नादात तिरपागडं काहीतरी होऊन बसतं. सचिन कुंडलकर प्रयत्नपूर्वक फसलेला नाही. 'बाजूला बसलेली बाई', 'औषधे घेणारा माणूस', 'लग्नाच्या वयाची मुलगी' या तीन गोष्टींचा गंध शेवटी एकच आहे आणि तो कसा, हे चित्रपटात आहे.

'गाभ्रीचा पाऊस' हा शेतकरी जीवनावरचा चित्रपट अजिबात न रडवता आणि वेळप्रसंगी हसवून विनोदाचा आधार घेऊन परिणामकारकरित्या मांडलेला आहे. शेतकरी आणि आत्महत्या हा तसा चोथा विषय. तरीही, हा चित्रपट वेगळाच ठरतो. सतीश मनवरने केलेला विषयाचा अभ्यास निराळा आहे. नेहमीप्रमाणे निर्मात्यांच्या नकारातून याही चित्रपटाला जावे लागले आणि शेवटी जे होते तेच झाले. एक निर्माते कथेवर व दिग्दर्शकावर विश्वास ठेवणारे मिळाले आणि आज हा चित्रपट सर्वत्र गाजला.

सुवर्णमहोत्सवी वर्षात बनलेल्या अनेक चित्रपटांपैकी या ख-या कलाकृती. पन्नासाव्या वाढदिवसाला शोभतील अशा.