गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
Written By वेबदुनिया|

आयपीएल सामने राज्याबाहेर घ्या - तावडे

WD
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आयपीएल क्रिकेट सामने राज्याबाहेर घ्यावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.

इंडियन प्रिमियर लिगचे मुख्य आयुक्त राजीव शुक्ला यांना पत्र पाठवून आयपीएल बाबत फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पत्रकारांशी बोलताना श्री. तावडे यांनी सांगितले की, 9 एप्रिल ते 15 मे या कालावधीत मुंबईतील वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईती डी. वाय. पाटील स्टेडियम व पुणे येथील सुबत्रो रॉय सहारा स्टेडियम येथे आयपीएल सामने होणार आहेत. प्रत्येक सामन्यापूर्वी मैदान तयार करण्यासाठी दररोजन साठ हजार लीटर पाणीवापरले जाते. एकूण 36 दिवस सामने सुरू राहतील. याचा अर्थ एका मैदानासाठी 21.6 लाख लीटर पाणी वापरले जाईल. तीन मैदानांसाठी या कालावधीत 64.8 लीटर पाण्याची नासाडी होणार आहे.

ते म्हणाले, की आयपीएल सामन्यांमुळे राज्याच्या तिजोरीत काही महसूल जमा होतो. मात्र सध्या राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे आयपीएल सामन्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय टाळता येईल. क्रिकेट सामन्यांनी केवळ लोकांचे मनोरंजन होईल. त्यासाठी एवढी मोठी किंमत मोजणे चुकीचे आहे.

राजीव शुक्ला यांना पाठविलेल्या पत्रात श्री. तावडे यांनी म्हटले आहे, की आपण महाराष्ट्रातून निवडून आला आहात. आपल्याला महाराष्ट्रातील दुष्काळाची चांगली माहिती आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या भावना विचारात घेऊन राज्यात आयपीएल सामने खेळविण्याबाबत फेरविचार करावा.