गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

यशाच्या पतंगाला हवी नैतिकतेची दोरी

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रात एक थोर गुरू रहात होते. लांबून त्यांच्याकडे मुले शिकायला येत असत. गुरूजी फार चांगले शिकवायचे. उदाहरणे देऊन ती विद्यार्थ्यांना कळेपर्यंत समजावून सांगायची त्यांची पद्धत होती. शिकवण्याच्या या हातोटीमुळेच विद्यार्थी त्यांच्याकडे येत असत.

एकदा एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, मला आपल्याशी वादविवाद करायचा आहे. आपण म्हणता, यशस्वी झाल्यानंतरही माणसाने नैतिक मुल्यांचा त्याग करायला नको. पण माझ्या मते, यशस्वी झाल्यानंतर पुढच्या प्रगतीसाठी ही नैतिक बंधने त्याच्या पायतल्या बेड्या ठरू शकतात. त्यामुळे या विषयावर आपल्याशी चर्चा करायची आहे.

शिष्याचे म्हणणे ऐकून गुरूजी विचारात पडले. म्हणाले. आपण या विषयावर चर्चा अवश्य करू. पण आधी आपण पतंग उडवूया. आज मकरसंक्रांतीचा दिवस आहे. त्यामुळे पतंग उडविणे चांगले. गुरूजींच्या म्हणण्यावर शिष्य खुश झाला आणि दोघेही बाहेर येऊन पतंग उडवू लागले. त्यांच्याबरोबर दोन इतर शिष्यही होते. त्यांनी चक्री हातात पकडली होती.

पतंग उंच गेल्यानंतर गुरूजी शिष्याला म्हणाले, ही पतंग आकाशात एवढी उंच कशी गेली याविषयी तुला काय वाटते, त्यावर शिष्याने उत्तर दिले, हवेमुळे हे घडले. पण त्यावर गुरूजींनी त्याला विचारले, मग त्यात दोराची भूमिका काहीच नाही काय.

त्यावर शिष्य म्हणाला, मी कुठे तसे म्हणालो. सुरवातीला दोराची भूमिका महत्त्वाचीच होती. पण एका ठरावीक उंचीवर गेल्यानंतर दोराची काहीच गरज नाही. यापुढे उंच जाण्यासाठी त्याला दोराची आवश्यकता नाही. आता बघा. दोरच त्याला अडथळा ठरू शकतो. जोपर्यंत ढिल देणार नाही, तोपर्यंत तो पुढे सरकरणार नाही. थोडक्यात काय मी म्हणत होतो, तेच सिद्ध झाले की नाही.

गुरूजींनी त्याच्या प्रश्नाचे उत्तरच दिले नाही. मग म्हणाले आता आपण पेच खेळूया. दोघेही पेच लढवू लागले. अचानक गुरूंनी शिष्याच्या पतंगाला असा काही झटका दिला की त्याचा पतंग कटला. थोड्या वेळात शिष्याचा पतंग खाली गिरक्या घेत आला. गुरूंनी शिष्याला विचारले, का रे बाबा. तुझा पतंग तर जमिनीवर आला. तू तर म्हणत होता, की तो आणखी वर जाईल म्हणून. पण माझी पतंग तर आकाशातच आहे. दोराच्या सहाय्याने ती आणखी वर जाऊ शकते. पण तुझी तर जमिनीवर आली. आता तुझे म्हणणे काय आहे.

शिष्य काहीही बोलू शकला नाही. शांत राहून तो फक्त ऐकत होता. गुरू पुढे म्हणाले, पंतंगाने मुल्य व संस्काररूपी दोराला सोडले तसा तो खाली आला. शिष्याला सगळे काही समजले.