शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By

मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांचे वक्तव्य!

मोर्चकर्‍यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा -  शरद पवार 
मुंबई - 'एक मराठा लाख मराठा', अशी गगनभेदी डरकाळी देत मुंबई दणाणून सोडणार्‍या मराठा क्रांती मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मोर्चेकर्‍यांच्या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा, असं सांगतानाच मोर्चेकर्‍यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी सरकारने योग्य पावले टाकावीत, असे आवाहनही पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी ट्विटकरून हे आवाहन केलें आहे पवार म्हणाले, 'आज मुंबईमध्ये मराठा मोर्चा हा  अत्यंत शांततेने होत आहे आणि आपली भूमिका मोर्चेकरी शासनाकडे मांडतील याचा मला विश्वास आहे. या सर्वसमावेशक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहता नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पावले टाकली जातील अशी माझी सरकारकडून अपेक्षा आहे. 
 
मराठा आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा - अजित पवार 
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून कुणीही राजकारण करू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. इत इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे अशी आमची पहिल्यापासूनच मागणी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. 
 
राधाकृष्ण विखे यांनी सत्ताधार्‍यांवर टीका 
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. विरोधी पक्षांना या मुद्यावर चर्चाच करून द्यायची नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षांची आहे. सत्ताधार्‍यांना स्वत: चर्चा करायची नाही आणि आम्हालाही चर्चा करू द्यायची नही, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली. 
 
राणेंचा सकारात्कम सूर
मराठा आरक्षणाबाबत हे सरकार सकारात्मक दिसतंय, आता त्यांच्याकडून कृतीची अपेक्षा आहे, असा सकारात्मक सूर  त्यांनी लावला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. तुम्ही तज्ज्ञांना बोलावून न्यायालयात जा व मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला. संपूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत असताना राणेंचा सूर मात्र सरकारला पाठिंबा देणारा होता. त्यामुळे 
राणेंच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कौशल्य विकासाबाबत मागील वेळीही सरकारने सांगितले होते. परंतु, त्यावर अजून काहीही झालेले नाही. पण मुख्यमंत्री पुढाकार घेतील, अशी आशा असल्याचे ते म्हणाले. 
 
मी मराठा समाजाचा सामान्य घटक - छत्रपती संभाजी राजे 
देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई मराठा मोर्चात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही हजेरी लावली. संभाजी राजे हे आझाद मैदानात जाऊन सर्वसामान्य मोर्चेकर्‍यांसोबत बसले. मी छत्रपती म्हणून नाही, मी खासदार म्हणून नाही, मी एक सामान्य मराठा समाजाचा घटक म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहे, असे संभाजीराजे म्हणाले. मोर्चे कसे असावे,हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं आहे, असे ही ते म्हणाले. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, यासाठी हा समाज रस्त्यावर आला आहे. हा सकल मराठा समाज आहे. हा समाज एकजूट झालाय हा 
प्रस्थापितांना संदेश आहे. ज्यांनी ज्यांनी मराठ्यांचा राजकारणासाठी वापर केला त्यांना हा संदेश आहे, असेही संभाजी राजेंनी नमूद केले. 
 
अ‍ॅट्रासिटीत बदल शक्य मात्र रद्द होणार नाही – आठवले
जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमधील अंतर्गत राजकारण तसेच समाजातील एका घटकामुळे अ‍ॅट्रासिटीचा गैरवापर होण्यास सुरूवात झाली आहे. दोन समाजात जर फुट पडली तर समाजाचा विकास कसा होणार? असा प्रश्न उपस्थित करत त्र्यंबक असो वा कोपर्डी प्रकरण कुठल्याच गुन्हेगाराचे समर्थन करता येत नाही. हा सर्व प्रकार निषेध असून नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले तर अ‍ॅट्रासिटीत बदल शक्य मात्र रद्द होणार नाही असे मत  समाज कल्याण मंत्री खा. रामदास आठवले यांनी व्यक्त  केले आहे. ते पत्रकाराशी बोलत होते.
 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे - ना. जानकर
अन्य जातीच्या आरक्षणाप्रमाणेच मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली स्वत:ची भूमिका आहे. मराठा समाजाच्या आणि तरुणांच्या प्रगतीसाठी मराठा तरुणांनी आपण उद्योजक कसे होऊ याचा देखील विचार केला पाहिजे असे प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. 
 
मराठा समाजाच्या तरुणांनी देखील आरक्षणाची मागणी करण्याबरोबरच आत्मचिंतन करून आपण उद्योजक कसे होऊ तसेच स्पर्धा परीक्षांमधून आयएएस, आयपीएस होण्याचाही विचार करून प्रगती साधली पाहिजे असेही जानकर म्हणाले. कोपर्डी प्रकरण निश्चितच अन्यायकारक आहे. खरेतर गुन्हेगाराला कोणतीही जात नसते, त्यांना जातीशी जोडने योग्य नाही. असे ते पुढे म्हणाले. 
 
मराठ्याच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष - धनंजय मुंडे
आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने आज 58 वा मोर्चा काढण्यात आला. लाखो महिला, मुली, तरुण यात सहभागी झाले, मात्र सरकारने त्यांना आरक्षण किती दिवसात दिले जाईल, त्याबद्दलचा कालबद्ध कार्यक्रम दिला नाही, यामुळे मुख्यमंत्र्यानी दिलेल्या निवेदनावर आपले समाधान झाले नाही, असे सांगत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपण या विरोधात बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांनी विधानपरिषदेत कामकाजावर बहिष्कार टाकला. मुंडे म्हणाले, की मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा 
आरक्षणावर केलेल्या निवेदनावर आपले आणि मोर्चेकऱ्यांचे कोणतेच समाधान झाले नाही. इतक्‍या मोठ्या प्रमाणात मोर्चा आल्यानंतरही सरकार मात्र त्यावर गंभीर नाही हे यावरून दिसून येते. कोपर्डीच्या घटनेला एक वर्षे पूर्ण झाले तरीही आरोपींना शिक्षा मिळाली नाही. त्यातच सरकारकडून आरक्षणासाठी कोणताही कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला गेला नाही. यामुळे आमचे समाधान झाले नसून आम्ही बहिष्कार टाकत आहे.  
 
मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईल: दानवे
भाजप आणि सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर पाठिंबाच आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणे आम्ही मताचे राजकारण करणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतली. येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मुंबईतील आजचा मराठा मोर्चा खूप मोठा आहे. मराठा समाजाला आरक्षणा मिळण्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. सरकार सकारात्मक आहे. भाजपचे सर्व आमदार, खासदारांचा आरक्षणाला पाठिंबा आहे. त्यामध्ये दुमत असण्याचे कारणही नाही. समाजाच्या आरक्षणाचा विषय कोर्टात आहे. त्यामुळे सरकारला स्वातंत्र्य नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे काळाशर्ट घालून आज मोर्चात सहभागी झाले आहेत याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले, की यापूर्वीच्या सरकारने घाईघाईत निर्णय घेतल्याने आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. आम्ही मात्र मताचे राजकारण कदापी करणार नाही. मराठा मोर्चा हा जातीचा नाही किंवा कोणत्याही जातीविरोधात नाही.
 
मराठा समाजातील बहुतांश वर्ग हा शेतकरी आहे, एकीकडे शेती उद्योगातून येणारी दुर्बलता आणि दुसरीकडे प्रचंड पटीने महाग झालेले शिक्षण व त्यानंतरही बेरोजगारी...ही अस्वस्थतेची मुख्य कारणे आहेत.  राहिला मुद्दा 
कोपर्डीचा, कोणत्याही जातीतील मुलीवरचा/बाईवरचा अत्याचार खपवून घेतला जाऊच शकत नाही...
त्यामुळे या मोर्चाला पाठिंबा...शांततेच्या मार्गाने इतक्या मोठ्या प्रमाणात काढलेल्या मोर्चाचे कौतुक...  -सोनाली