शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2016 (12:13 IST)

रेल्वेचे तिकीट काढा अन् विमानाने प्रवास करा

तुम्ही रेल्वेने जर प्रवास करणार असाल आणि तुमचे तिकीट कन्फर्म होत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमची वाट एअर इंडियाचे विमान पहात आहे. जर तुमच्याकडे वातानुकूलित प्रथम दर्जाचे तिकीट असेल, तर विमान प्रवासासाठी तुम्हाला एक रुपयाही ज्यादा देण्याची गरज नाही. तुम्ही त्याच पैशातून रेल्वेच्या आधी तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता.
 
जर तुमच्याकडे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एसी टू टायर दर्जाचे तिकीट असेल तर तुम्हाला 1500 ते 2000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. मात्र यासाठी तुमच्याकडे आयआरसीटीसीचे ऑनलाइन तिकीट अनिवार्य आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी एअर इंडिया आणि आयआरसीटीसीने एक करार केला आहे. एअर इंडियाचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर अश्विनी लोहानी आणि आयआरसीटीसीचे चेअरमन डॉ. एके मनोचा यांनी सांगितले की, एअर इंडियाने ऑनलाईन तिकिटे विकणार्‍या आयआरसीटीसी बरोबर एक करार केला आहे. त्या अंतर्गत ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.
 
याबाबत माहिती देताना लोहानी यांनी सांगितले की, एखाद्या प्रवाशाला जर रेल्वेचे कर्न्फम तिकीट मिळाले नाही, तर त्याला पुढच्या 24 तासांच्या आत एअर इंडियाचे विमान बुक करण्याचा पर्याय दिला जाईल. प्रवाशांना यासाठी रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लास तिकिटाइतके भाडे द्यावे लागेल. एसी सेकंड क्लासच्या प्रवाशांना रेल्वे तिकिटाशिवाय 1500 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. ही सेवा पहिल्यांदा राजधानी रेल्वे गाडय़ांसाठी सुरू करण्यात येईल.
 
भारतीय रेल्वेच्या वेबसाईटनुसार, मुंबई राजधानी एक्स्प्रेस रेल्वे गाडीच्या एसी फर्स्ट क्लासचे तिकीट 4750 रुपये आहे. तर राजधानी एक्स्प्रेसच्या एसी सेकंड क्लासचे तिकीटभाडे 2865 रुपये आहे. त्यानंतरही जर प्रवाशाला रेल्वेचे कन्फर्म बुकिंग मिळाली नाही तर संबंधित प्रवासी तिकिटाच्या अतिरिक्त दीड हजार रुपये देऊन एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू शकतो. एअर इंडियाची फ्लाईट 24 तासांच्या आत उपलब्ध केली जाईल.