शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , शनिवार, 19 जानेवारी 2019 (13:23 IST)

भारताची ऐतिहासिक कामगिरी : ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; पहिल्यांदाच 2-1 ने मालिका जिंकली

भारताने मेलबर्न एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिका विजयाला गवसणी घातली आहे. निर्णायकक्षणी महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवने केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 असा मालिका विजय मिळवत ऑस्ट्रेलियात नवा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध मिळवलेला भारताचा हा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर एक दिवसीय मालिकेतही कांगारूंना धूळ चारत भारताने खडतर अशा दौर्‍याची यशस्वी सांगता केली आहे.  
 
थम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 48.4 षटकांत सर्वबाद 230 धावांची मजल मारता आल्याने 231 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने हे आव्हान 49.2 षटकांत 3 बाद 234 धावा करत पूर्ण करत सात गडी राखून सामना आपल्या नावे केला.
 
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 231 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरूवात संथ झाली. पहिल्या 4 षटकांमध्ये भारताला केवळ 4 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर पिटर सिडलने रोहित शर्माला 9 धावांवर बाद करत भारतीय संघाला पहिला धक्का दिला. यानंतर शिखर आणि विराट कोहलीने सावध फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. 14 व्या षटकांत दोघांनी भारताला अर्धशतक पार करुन दिले. मात्र, यानंतर धवन स्टॉयनिसच्या पहिल्याच षटकात 23 धावांवर असताना त्याच्याच हाती झेल देत बाद झाला. त्यामुळे भारताची 2 बाद 59 अशी धावसंख्या झाली.
 
यानंतर विराटने धोनीच्या साथीत संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. यावेळी धोनीला शून्यावर जीवनदान मिळाले. स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर मॅक्‍सवेलने त्याचा झेल सोडला. यानंतर विराट आणि धोनीने तिसऱ्या गड्यासाठी 54 धावांची भागिदारी रचली. यावेळी हि जोडी जमली आहे असे वाटत असताना रिचर्डसनने कोहलीला 46 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्‍का दिला. यावेळी भारताने 30 षटकांत 3 बाद 113 धावांची मजल मारली होती.
 
विराट बाद झाल्यानंतर आलेल्या केदार जाधव आणि धोनीने सावध खेळ करत भागिदारी करण्यावर जास्त लक्ष देत अनावश्‍यक फतके मारणे टाळले. त्यामुळे मधल्याकही कालात भारतीय संघाचा धावांचा वेग मंदावला. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या धोनीने याही सामन्यात अर्धशतकी खेळी केली. यानंतर केदारनेही फतकेबाजी करत आपले अर्धशतक झळकावले. यादोघांनी अखेरची चार षटके राहिली असताना फतकेबाजी करत भारतीय संघाच्या विजयावर शिक्‍का मोर्तब केला.
 
धोनी केदारने मिळून चौथ्या विकेटसाठी 118 धावांची नाबाद भागिदारी करत सामना आणि मालिका विजयात मोलाचे योगदान दिले. यावेळी धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 तर केदारने 57 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याच बरोबर धोनीने 34वी धाव घेत ऑस्ट्रेलियात एकदिवसीय सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तौ चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्याने कोहलीला मागे टाकले.
 
तत्पूर्वी, ढगाळ वातावरण पाहून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत भुवनेश्वर कुमारने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने आस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात मागारी धाडत सुरूवातीलाच त्यांच्यावर दडपण आणले. दोन्ही सलामीवीर माघारी परतले तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या केवळ 27 धावा झाल्या होत्या.
 
दोन्ही सलामीवीर परतल्यानंतर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा यांनी सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. या दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला शतक पार करुन दिले. हे दोघे संघाला मोठी धावसंख्या उभाकरुन देणार असे वाटत असताना लेगस्पिनर युझुवेंद्र चहलने ही जोडी फोडली त्याने 39 धावा करणाऱ्या शॉन मार्शला बाद केले. तर, त्या पाठोपाठ उस्मान ख्वाजालाही बाद करत एकाच षटकात त्याने ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्‍के दिले.
 
ख्वाजानंतर काही वेळातच स्टॉयनिसला बाद करत त्याने आपला तिसरा बळी मिळवला. याचबरोबर ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 100 वरुन पाच बाद 123 झाली होती. यानंतर पिटर हॅंडस्कब आणि ग्लेन मॅक्‍सवेल यांनी ऑस्ट्रेलियाची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनीही आकर्षक फटके मारत धावगती वाढवली. मात्र, वेगाने धावा करणाऱ्या मॅक्‍सवेलला बाद करत शमीने ऑस्ट्रेलियाला सहावा धक्‍का दिला.
 
मॅक्‍सवेल बाद झाल्यानंतर हॅंडस्कबने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत ऑस्ट्रेलियाला 200 च्या पार पोहचवले त्याच बरोबर त्याने आपले अर्धशतकही झळकावले. मात्र, यावेळी मोठे फतके मारण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या हॅंडस्कबला बाद करत चहलने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्‍का दिला. तर, आपल्या अखेरच्या षटकात ऍडम झम्पाला बाद करत त्याने सहावी विकेट मिलवत ऑस्ट्रेलियन डावाल खिंडार पाडले. यावेळी चहलने 42 धावांत 6, भुवनेश्वरने 28 धावांत 2 तर, शमीने 47 धावांत दोन गडीबाद करत ऑस्ट्रेलियाला 230 धावांत रोखले.
 
संक्षिप्त धावफलक –
 
ऑस्ट्रेलिया 48.4 षटकांत सर्वबाद 230 (पिटर हॅंडस्कब 58, शॉन मार्श 39, उस्मान ख्वाजा 34, युझुवेंद्र चहल 42-6, भुवनेश्‍वर कुमार 28-2, मोहम्मद शमी 47-2) पराभुत विरुद्ध भारत 49.2 षटकांत 3 बाद 234 (महेंद्रसिंग धोनी नाबाद 87, केदार जाधव नाबाद 61, विराट कोहली 46, ज्येह रिचर्डसन 27-1).