शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

ज्ञानेश्वरानंतर भिंत पुन्हा एकासाठी चालली

- मनमोहन नातू

अंदमानात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्य स्फुरू लागले. जवळ कागद नव्हते. त्यांनी उष:कालच्या आभाळाला विचारले, 'माझा कागद होतोस काय?' आभाळ उत्तरले -

मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।

जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।

आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।
(ती पहाट लालम् लाल - अनपेक्षित झाली काळी)

दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली।
'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली।