शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By अभिनय कुलकर्णी|

हिंसाचाराचे 'नवनिर्माण'

NDND
अखेर सगळीकडून आलेला दबाव लक्षात घेता आतापर्यंत नाकर्तेपणाचे धनी ठरलेल्या देशमुख- पाटील यांच्या सरकारला राज ठाकरे यांना अटक करावीच लागली. गेल्या वेळी राज यांना अटक केल्यानंतरही हिंसाचार झाला होता. त्यामुळे याहीवेळी होणार हे अपेक्षित होतेच. त्यामुळे राज्य सरकारने यावेळी विशेष तयारी करून आधी राज यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यानंतर राज यांना रत्नागिरीत मध्यरात्री अटक केली. यामुळे हिंसाचाराला अटकाव बसेल असा सरकारचा अंदाज असला तरी तो किती फोल ठरला ते कालपासून सुरू असलेल्या हिंसाचारावरून स्पष्ट होतेच आहे.

हा हिंसाचार हा अपेक्षितच होता. कारण नेत्याच्या मागे उभी असलेली ताकद दाखविण्यासाठी हल्ली हिंसाचार हा एक मार्ग ठरू लागला आहे. थोडक्यात, तुमची उपद्रवक्षमता किती त्यावर तुमचे राजकीय वजन ठरते. राज यांचे वजन बरेच आहे हे यानिमित्ताने त्यांच्या विरोधकांना, सत्ताधार्‍यांनाही कळले असेल. पण हा हिंसाचार समर्थनीय नाही. पोलिसांना न जुमानता राज यांचे कार्यकर्ते तोडफोड, दगडफेक, आगी लावण्याचे उद्योग करत फिरत आहेत. हे पाहून राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न पडतो. यातून कोणते 'नवनिर्माण' साध्य होणार? राज यांचा पक्ष मराठी माणसांसाठी भांडणारा आहे हे खरे. पण याच मराठी माणसाच्या करातून पोसल्या जाणार्‍या बस व इतर सार्वजनिक यंत्रणांची मोडतोड करून, त्यांना आगी लावून काय साध्य होणार? याचा त्रास राज यांच्या मराठी माणसालाच होणार ना? आपलेच उद्योग बंद पाडून आपल्याच मराठी माणसाचा रोजगार यामुळे बुडतोय हे राज समर्थकांच्या लक्षात येत नाही का?

शिवसेनेच्या तंत्राची पुनरावृत्त
राज यांचे हे आंदोलन पाहून मागच्या पिढीला चाळीस वर्षापूर्वीच्या शिवसेनेच्या स्थापनाकाळाची आठवण झाली असेल. त्या सगळ्या घडामोडींचा 'रिपीट परफॉर्मन्स' म्हणजे आजचा हिंसाचार असेही म्हणता येईल. याच शिवसेनेच्या मुशीत राज ठाकरे वाढले. पण आता शिवसेना सोडली तरी तिची मुळची संस्कृती त्यांनी सोडलेली दिसत नाही. चाळीस वर्षापूर्वी याच तंत्राचा वापर शिवसेनेने केला होता. पण अखेरीस यातून साध्य काहीच होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनाही आता याबाबतीत काहीशी मवाळ झाली आहे. 'मनसे' शिवसेनेच्याच मार्गाने जाणार असेल तर चाळीस वर्षापूर्वीची शिवसेना असेच तिचे स्वरूप राहिल. मराठी माणसांमध्ये राज यांच्याविषयी सहानुभूतीची भावना आहे. मराठी अस्मितेचा मु्द्दा राज यांनी ज्या तडफेने उचलला आणि उत्तर भारतीय वाचाळ नेत्याविरूद्ध ते ज्या पद्धतीने बोलतात त्यामुळे त्यांच्याविषयीची लोकप्रियता आणि आदरही मराठी लोकांमध्ये वाढला आहे. पण या हिंसाचारामुळे त्यांचीही मने दुखावली गेली. अनेकांचा राज यांच्या मुद्यांना पाठिंबा आहे, पण त्यांचा मार्ग चुकीचा आहे, असे वाटते.

असुरक्षित महाराष्ट्
NDND
या आंदोलनामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली ती वेगळीच. उत्तर भारतीय नेत्यांना आधीच महाराष्ट्राबाबत आकस आहे. या हिंसाचारामुळे महाराष्ट्राविषयी त्यांची मने आणखी संकुचित होतील. आधीच जातीय दंगलीत राज्य 'नंबर वन' असल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वीच आला होता. आता राज्यात सगळ्याच बाबतीत असुरक्षितता आहे, असे चित्र गेले तर त्यातून उद्योग धंदेही राज्यात येणार नाहीत. त्याचा फायदा उठवून नरेंद्र मोदी सगळे उद्योग गुजरातला पळविण्यासाठी बसलेलेच आहेत. नॅनो हे त्याचे ताजे उदाहरण. एवढेच काय आता महाराष्ट्रातील अनेक उद्योग आता हिमाचल प्रदेशमध्येही स्थलांतरीत झाले आहेत. कारण कोणत्याही उद्योगाला शांतता हवी असते. शिवाय आर्थिक धोरणही अनुकूल असावे लागते. केवळ याच कारणामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकलेले नाही. हिंसाचाराच्या माध्यमातून महाराष्ट्रही याच रांगेत बसला असे चित्र जाऊ नये.

परप्रांतीय मराठीजनांची ससेहोलपट
त्याचवेळी हे राज्य फक्त मराठी लोकांचे इतरांना प्रवेश नाही, अशी भूमिका घेऊनही चालणारी नाही. महाराष्ट्रात उद्योग करणार्‍या अनेक उद्योजकांचे मुळ उत्तर भारतात आहे, ज्यात अनेक मराठी लोकही काम करतात. त्याचवेळी परप्रांतात अनेक मराठी लोकही काम करतात. भलेही त्यांनी स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला नसेल. पण महाराष्ट्रातल्या आंदोलनामुळे 'ओल्याबरोबर सुकेही जळते' या न्यायाने त्यांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. जमशेदपूरमध्ये 'टाटा मोटर्स'चे अधिकारी बोरवणकर यांच्या घरावर झालेला हल्ला हे त्याचे उदाहरण आहे. आज दिल्ली, इंदूर, ग्वाल्हेर, हरिद्वार, वाराणसी, जमशेदपूर, रायपूर, बिलासपूर यासह अनेक उत्तर भारतीय शहरात मराठी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांना याचा त्रास होऊ शकतो हे राज यांनी लक्षात घ्यायला हवे.

NDND
'मनसे'वर बंदीचा अविचा
सरकारनेही आता 'मनसे'च्या मुसक्या आवळण्यासाठी उपाय करायला सुरवात केली आहे. 'मनसे'वर बंदी घालण्याचा विचार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहिर केले आहे. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल 'तशी शिफारस आल्यास आम्ही बंदी नक्कीच घालू असे सांगून मोकळे झाले आहेत. असे झाल्यास आता झाला त्याहीपेक्षा जास्त हिंसाचार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तिकडे श्रीलंकेत तमिळींवर तेथील सरकारतर्फे होणारी कारवाई रोखण्यासाठी भारत सरकारने दबाव आणावा म्हणून द्रमुकच्या चौदा खासदारांनी राजीनामे दिले. 'बादारायण' संबंध जोडता येईल अशा समस्येसाठी द्रमुकने आपले खासदार पणाला लावले. मग या पक्षावर अतिरेकी प्रांतवाद म्हणून टीका होत नाही किंवा बंदीही घातली जात नाही. मग 'मनसे'वर बंदी का? इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शिखांविरोधात दंगली उसळल्या. त्या सगळ्याची कर्ताकरविता कॉंग्रेसच होती. मग त्यावेळी कॉंग्रेसवर बंदी का नाही घातली? 'मनसे'वर बंदी घातली तर 'सिमी' आणि 'मनसे' यांना एकाच तागडीत तोलायचे का? असाही प्रश्न उभा रहातो.

कायद्याच्या कचाट्यात रा
राज यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्नही केले जात आहेत. राज यांच्यावर भाषणबंदी घातलीच आहे. शिवाय राज्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यातून राज यांच्यावर केसेस टाकण्यात आल्या आहेत. तेथील हिंसाचाराबद्दल राज यांना जबाबदार धरून या केसेस टाकल्या आहेत. त्यातच मुंबईत रेल्वेच्या परीक्षेत आलेल्या मुलाचा 'मनसे' कार्यकर्त्यांच्या कथित मारहाणीत मृत्यू झाल्याचे सांगून बिहारमध्ये राज यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय इतर अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. ही कारवाईही सूडबुद्धीने केली जात आहे. या कारवाईने राज यांच्याबद्दलची सहानुभूती आणखी वाढेल आणि मराठी अस्मिता तीव्र स्वरूप धारण करून व्यक्त होईल हे सरकारनेही लक्षात घ्यायला हवे.

प्रसारमाध्यमे आणि रा
हिंदी प्रसारमाध्यमातून तर राज यांची प्रतिमा 'गुंड', 'राक्षस', 'दहशतवादी' अशी करण्यात आली आहे. सर्व हिंदी भाषक वाहिन्यांनी राज व त्यांच्या कार्यकर्त्यांना गुंड ठरवून टाकले आहे. एका हिंदी भाषक दैनिकाने घेतलेल्या सर्वेक्षणात राज यांच्या कारवाया दहशतवादी आहेत आणि त्यांच्यावर दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली पाहिजे असा निष्कर्ष 'हिंदी भाषक' वाचकांच्या प्रतिक्रियांमधून काढला आहे. हिंदी भाषकांनी हा प्रश्नच समजून घेतलेला नाही. त्यांनी केवळ त्यातला हिंसाचारच तेवढा 'हायलाईट' केला. राज यांच्या आंदोलनाचे हेही अपयशच आहे. मुळ मुद्दा जर दिल्लीश्वर आणि एकूणच देशापर्यंत पोहोचला नाही तर राज यांची प्रतिमा अशीच रंगवली जाणार. राज यांच्या पक्षात अनेक सुशिक्षित, चांगल्या घरातले कार्यकर्ते आहेत. हे त्यांच्या आंदोलनातून ठळकपणे व्यक्त व्हायला हवे. पण हिंसाचारामुळे तेच तेवढे होत नाही. वाहिन्यांना मग राज आणि मराठी माणसांबद्लल विष ओकायला मुद्दा तेवढा मिळतो.

राज यांनी मार्ग बदलाव
NDND
राज यांच्या आंदोलनातील मुद्दे नक्कीच महत्त्वाचे आहेत. उत्तर भारतीयांचे महाराष्ट्रावर होणारे अनियंत्रित आक्रमण हा धोका खराच आहे. पण हा मुद्दा मांडण्याची पद्धत चुकीची आहे. मराठी आणि मराठी माणसाची त्याच्याच राज्यात होणारी गळचेपी थांबविण्यासाठी कायद्याच्या कक्षेत राहूनच मार्ग अवलंबले पाहिजे. हिंसाचाराला थारा नसणार्‍या परंतु, तरीही परिणामकारक अशा आंदोलनांच्या मार्गातून हे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधार्‍यांवर दबाव आणला पाहिजे. हिंसाचार न करता नेमकेपणाने प्रश्न मांडणारे आंदोलन केल्यास सरकारही काही करू शकणार नाही आणि प्रश्नही योग्य त्या पद्धतीने मांडला जाऊ शकेल. शेवटी राज यांच्यावर बंधने घातल्यास त्यांचे नेतृत्व त्यातून कोमेजून जाईल आणि मराठी माणसांवरचा अन्याय यापुढेही सुरूच राहिल. मनसेकडे आज राज यांच्याशिवाय दुसरा नेता नाही. त्यामुळे त्यांनी तुरूंगात रहाणे किंवा बंदीखाली रहाणे परवडणारे नाही. म्हणूनच या सगळ्या प्रकरणातून धडा घेऊन राज यांनी मुळ मुद्दा कायम ठेवून आंदोलनाचा मार्ग तेवढा बदलावा असा सल्ला तेवढा द्यावासा वाटतो.