शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. गुरूमंत्र
Written By वेबदुनिया|

विश्वासघात म्हणजे आत्मघात

पं अशोक पवार 'मयंक'

गुरू हरगोविंदसिंहजी यांच्या अत्यंत निकटवर्तियांपैकी एक म्हणजे पाइंदे खाँ. गुरुंना त्याच्यावर स्वतः:पेक्षा जास्त विश्वास होता. त्याचे कर्तृत्व, त्याचे शौर्य या साऱ्यांवर गुरुजींचा अत्यंत विश्वास होता. परंतु पाइंदे खाँने याचा वेगळा अर्थ काढला आणि तो शिष्यांमध्ये गुरुजींचीच बदनामी करू लागला.

शिष्यांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो कोणाचेच ऐकत नव्हता. शिष्यांनी गुरुजींनाही त्याच्या या गोष्टी सांगितल्या होत्या. गुरुजी मात्र शांत असल्याने शिष्यांना याचेही आश्चर्य वाटत होते. त्यांना कळतच नव्हते, की गुरुजींना अचानक काय झाले, पाइंदे खाँ गुरुजींच्या इतक्या जवळचा आणि तोच त्यांची बदनामी करतोय?

शेवटी गुरुजींच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी घोषणा केली, की पाइंदे खाँला दरबारातून काढून टाकावे. यानंतर पाइंदे खाँने बंडखोरी केली आणि तो मोगलांना जाऊन मिळाला. त्याने गुरुजींना जाताना धमकीही दिली 'तुम्ही मोगलांपुढे टिकूच शकणार नाहीत' गुरुजी शांत होते त्यांनी त्याची हकालपट्टी केली.

यानंतर पाइंदे खाँ थेट शहाजानला जाऊन भेटला आणि त्याने हरगोविंदसिंहजी विरोधात त्याचे कान भरले. शहाजहानने मग काले खाँच्या नेतृत्वाखाली एक फौज गुरुंवर हल्ला करण्यासाठी पाठवली. जालंधरमध्ये मोगल आणि शीख सैन्याचे युद्ध झाले.

या युद्धात पाइंदे खाँ ने गुरुंवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. गुरुंनी त्याचे वार चुकवत त्याला माफी मागायला सांगितली आणि असे केले तर, मी तुला माफ करेन असे आश्वासनही त्याला दिले. परंतु तो ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता, त्याला झालेल्या गर्वाने त्याच्या मेंदूवर ताबा मिळवला होता. त्याने पुन्हा गुरुजींवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या फारसा परिणाम झाला नाही.

गुरुजींनी त्याचा हाही वार चुकवला. त्याला पुन्हा शरण येण्याचे आवाहन केले. परंतु तो ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी गुरुजींना त्याचा वध करावाच लागला. इकडे मोगल सैन्याचेही बारा वाजले. त्यांचाही पराभव झाला. आणि काले खाँ आल्या पावली पळत सुटला.