शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (16:28 IST)

सणात गोड खाताना करा थोडा विचार

गोड पदार्थाच्या आवडीमुळे आपण गरजेपेक्षा अनेकपट अधिक प्रमाणात आणि अनावश्यक साखरेचे सेवन करत असतो. आपल्याला आवश्यक असलेली नैसर्गिक शर्करा फळे, भाज्या, दूधजन्य पदार्थांमधून प्राप्त होत असते. याउलट चॉकलेट्स, केक, शीतपेयांमधून मिळणारी साखर शरीरासाठी हानिकारक असते. गरजेपेक्षा अधिक प्रमाणात खाल्लेली साखर किंवा गोड पदार्थ शारीरिक दोष, आजार यांना आमंत्रण देतात. कारण यामध्ये कोणतेही खनिजगुण वा पोषक तत्त्वे नसतात. यापासून आपल्या शरीराला केवळ ऊर्जा मिळते. 


 
काही वेळा अधिक प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्याने त्याची सवय लागते. ही सवय आरोग्य तसेच सौंदर्यांच्या दृष्टीने घातक ठरते. काही वेळा गोड खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम साखर घातलेली असते. त्यांचे अतिरेकी सेवन शरीरासाठी हानिकारक ठरते. म्हणून प्रत्येकाने आपण किती प्रमाणात गोड पदार्थ खायचे हे ठरवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रतिदिन 1600 कॅलरीज घेणार्‍या व्यक्तीने केवळ सहा टी स्पून साखर खावी. याशिवाय लागणारी शर्करा ही फळे, डाळी, भाज्या इत्यादीतून मिळत असते. तसेच हे गोड पदार्थ खूप तळकट, तूपकट आणि कार्बोहायड्रेटयुक्त असू नयेत.