शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

पाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा

बारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या दुखण्यातून मुक्तता मिळविता येते.
 
१) पाय दुखणे- मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर  पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
 
२) कंबर दुखी- विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.
 
३) उसण भरणे- कोठेही उसण भरली अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा.
 
४) बारीकसा अस्थिभंग (हेअर क्रॅक )- बर्‍याचवेळा पडल्याने अथवा पाय मुरगळणे या सारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते. यामुळे वेदना होतातच पण बर्‍याच वेळा अवयव सुजतो. या प्रकारात कच्च्या डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते.
 
५) दात दुखणे- आजकाल अगदी बालवयापासून दातदुखी हा विकार आढळतो. त्रिफळा चुर्णाने दात घासल्याने दातदुखी थांबतेच पण दात आवळून येतात. मायफळाची पावडर हिरडयांना लावून अर्ध्या तासाने चुळा भराव्यात. हिरडयांना सूज असेल तरी त्रिफळा चूर्ण लावल्याने आराम मिळतो.
 
६) पोटदुखी- ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.
 
७) जुलाब- जुलाब होत असतील तर खसखस तुपात परतावी व दुधात शिजवावी. २ चमचे खसखस घ्यावी. हे मिश्रण प्यायल्याने जुलाब थांबतात. अगदी लहान बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून साखरेबरोबर चाटवावे.
 
८) उलटी- उलट्या होत असतील तर धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते पाणी धन्यासकट उकळावे. यात साखर व मीठ घालून थोडे थोडे पाजत राहावे.
 
९) अपचन- अपचनावर लंघन हा सर्वात्तम उपाय आहे. लिंबू ,मीठ घालून केलेले शरबत थोडेथोडे थोडया वेळाने पिण्यानेही फरक पडतो. अननसाच्या फोडी त्यावर साखर घालून खाव्यात त्यानेही पचन सुधारते.
 
१०) शौचास खडा होणे- ही सवय बर्‍याच लोकांना असते.त्यासाठी वेगवगळी औषधे ही घेतली जातात. रात्री झोपताना हळद व आवळकाठी यांचे मिश्रण घेतल्यानेही खडा मोडतो.  १ चमचा आवळकाठी अधिक १ चमचा हळद एकत्र करून त्याच्या  सारख्या आठ पुडया कराव्यात व रात्री झोपताना रोज १ पुडी या प्रमाणे आठ दिवस घ्याव्यात.