गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

एकांतात जाण्यापूर्वी....

प्रेमाच्या गावाला गेल्यानंतर काही गोष्टींची फार काळजी घ्यावी लागते. प्रेमी युगलांनी एकांतवास कुठे शोधावा हे नीट ठरविणे गरजेचे आहे. मध्यंतरी पुण्यात सांगवी या गावाजवळ लष्करी वसाहतीच्या आसपास प्रेमी युगलापैकी असलेल्या मुलीवर लष्करी जवानांनीच बलात्कार केला. अशा घटना पहाता प्रेमी जोडप्यांनी भेटण्याच्या बाबतीत काही काळजी घेणे गरजेचे आहे. एकांत जरूर अनुभवा, पण तो सुरक्षित असणे गरजेचे आहे. अन्यथा, दोघांची सुरक्षितता धोक्यात घालून एकांत उपभोगणे जन्माचे अद्दल घडविणारे ठरू शकते. 

तुम्ही तुमच्या प्रेयसीला कुठे भेटायला बोलावले असेल तर तिथे आधी तुम्ही उपस्थित असणे गरजेचे आहे. अन्यथा ती येऊनही तुम्ही गायब असलात तर तिचा राग 'सातवे आसमान पर' गेला तर आश्चर्य वाटू देऊ नका. ती अगदी सहाजिक प्रतिक्रिया आहे. लक्षात घ्या, बोलावणारे तुम्ही असाल तर वेळेच्या आधी पोहोचणे ही तुमची जबाबदारी आहे. अन्यथा तुम्हाला वेळेचे महत्त्व नाही, अशी तुमच्या जोडीदाराची भावना होऊ शकते. पण त्याचवेळी ती तुमच्यात सुरक्षितता शोधते आहे, असा त्याचा अर्थ होतो हे लक्षात घ्या. तुमच्यासंदर्भात भलते सलते निरोप पोहोचवून इतर मंडळी तुमच्या प्रेयसीचा गैरफायदाही उचलू शकतात हे लक्षात ठेवा. किंवा तिथे उपस्थित असणारी मंडळी एकट्या मुलीला पाहून कोणत्याही थराला जाऊ शकतात, याची जाण ठेवा.

विशेषतः निर्जन, एकाकी जागी भेटायला बोलायचे टाळा. भेटायची जागा मोजक्याच पण माणसांची उपस्थिती असलेली असावी. एकांत इतकाही नको की तो त्रासदायक ठरावा. लष्करी परिसर असलेल्या भागात शक्यतो जाणे टाळावे. तुम्ही भलेही हद्दीबाहेर भेटत असलात तरी समोरच्याच्या मनातील इरादे 'नेक' असतीलच याची काही खात्री नसते. शिवाय त्यांना तुमचे बळ पुरे पडू शकेल असेही नाही. अशा वेळी या जागा टाळणे हेच उत्तम.

तलाव, सरोवर, धरणे अशा जागा ठीक आहेत. परंतु, अंधार पडेपर्यंत तिथे थांबणे धोकादायक ठरू शकते. इतरही 'कपल्स' असतील तर ठीक. पण अंधार होत असल्यास तिथून काढता पाय घेणे योग्य. तिथे असलेले रखवालदार आणि इतर लोक तुमच्या उपस्थितीचा गैरफायदाही घेऊ शकतात. तुम्हाला ब्लॅकमेल करण्यापासून अनेक बाबींपर्यंत त्यांची मजल जाऊ शकते.

जंगल, वने अशी ठिकाणेही टाळावीत. कारण मानवी अस्तित्वापासून दूर असलेल्या या ठिकाणी एकांत मिळत असला तरी ती सुरक्षित नाहीत. अचानक गरज पडल्यास हाक दिल्यानंतर कुणी येण्याची शक्यताही अशा ठिकाणी नसते.

शक्यतो शहराबाहेरची ठिकाणे टाळलेलीच बरी. त्यापेक्षा शहरातच असलेली परंतु, तुलनेने कमी गर्दी असलेली ठिकाणे पहावीत. हल्ली तर अनेक हॉटल्सनी एकांतवासाची खास सोय केलेली असते. तिथे वेटरही तुम्हाला त्रास द्यायला येत नाही. सेल्फ सर्व्हिस असते. अशी ठिकाणे त्यातल्या त्यात बरी. बाकी बागा, मंदिरे ही ठिकाणेही उत्तम आहेत. पण तिथली गर्दी अगदी टिपीकल असते. त्यामुळे एकांत हा मुद्दा तिथे उरत नाही.