गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, औरंगाबाद१९६०साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणा-या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय.

या चारही संस्थांनी मिळून स्थापन केलेल्या या संस्थेचे पहिले अध्यक्ष प्रा. दत्तो वामान पोतदार हे होते. १९६२मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात वापरल्या जाणार्याळ मराठी भाषेच्या लेखनात एकसूत्रीपणा आणण्यासाठी भाषा लेखनाचे काही नियम तयार केले तेच मराठी शुध्दलेखनाचे नियम होत. हे नियम १९६२ मध्ये तेंव्हाचे मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी सरकारच्यावतीने स्वीकारले. हे महामंडळानी केलेले भाषाविषयक पहिले काम होय.

महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती ती पुण्याच्या म.सा.प.च्यावतीने भरवली जात होती. या संमेलनांना 'महाराष्ट्र साहित्य संमेलन` असेच तोपर्यंत म्हटले जात होते. साहित्य महामंडळाने काम सुरू केल्यानंतर शक्यतो दरवर्षी एक साहित्य संमलेन भरवावे असा निर्णय १९६४मध्ये मडगांवमध्ये झालेल्या ४५व्या साहित्य संमेलनात घेतला आणि १९६५ मध्ये हैदराबाद येथे जे ४६ वे साहित्य संमेलन झाले ते महामंडळाचे पहिल साहित्य संमेलन होय.

प्रत्यक्षात ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन असतांनाही महाराष्ट्र साहित्य संमलेलनाचेच ते नवे रूप असल्यामुळे क्रम मात्र जुनाच चालू ठेवण्यात आला आणि पुढील संमेलनांना महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले. तेच आजवर चालू आहे.

महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेर असलेल्या महाराष्ट्रालगतच्या ज्या साहित्य संस्था आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये काम करीत होत्या त्या साहित्य संस्थांनी महामंडळामध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली. त्या संस्थांच्या इच्छेचा मूळ चार घटक संस्थांनी गंभीरपणाने विचार करून त्यांना साहित्य महामंडळात समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या. या तिन्ही संस्था समाविष्ट झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे रुपांतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात झाले.

साहित्य महामंडळाची स्थापना झाल्यानंतर बरीच वर्षे दत्तो वामन पोतदार हेच महामंडळाचे अध्यक्ष होते. काही वर्षांनंतर महामंडळाचे पदाधिकारी निवडणुकीने ठरू लागले. आणखी काही वर्षे गेल्यांनतर महामंडळाचे कार्यालये एकाच ठिकाणी ठेवण्याऐवजी ते चारही घटक संस्थांकडे म्हणजे मूळ संस्थांकडे फिरते असावे असा निर्णय महामंडळाने घेतला आणि त्यांनतर प्रत्येक तीन वर्षांनी संस्थांच्या जेष्ठतेनुसार पुणे, नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या क्रमाने हे कार्यालय दर तीन वर्षांनी स्थलांतरीत होणे सुरू झाले.

आतापर्यंत दत्तो वामन पोतदार, (एक महिन्याकरिता वि.भि.कोलते) कवि अनिल, गंगाधर गाडगीळ श्री.पु.भागवत, राजेंद्र बनहट्टी, सुरेश द्वादशीवार, डॉ. सुधीर रसाळ, वसुंधरा पेंडसे-नाईक, गं.ना.जोगळेकर, मनोहर म्हैसाळकर हे अध्यक्ष झालेले आहेत. २००७ पासून श्री. कौतिकराव ठाले पाटील हे अध्यक्ष आहेत.

महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ३६ साहित्य संमेलने घेतली असून महाबळेश्वर येथे होत असलेले साहित्य संमेलन हे ३७ वे साहित्य संमेलन होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके,विजया राजाध्यक्ष या तीन लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच शंकरराव खरात आणि केशव मिश्राम हे दोन दलित लेखक आणि यु.म. पठाण हे मुस्लिम लेखक अध्यक्ष झालेले आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, ज्या महत्वाच्या लेखकांची किंवा विद्वानांची अध्यक्ष होण्याची इच्छा नाही अशा लेखकांचा सन्मान करावा म्हणून, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून, आपल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महनीय वक्ता म्हणून त्याला/तिला सन्मानपूर्वक निमंत्रित करून सत्कार करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी एखाद्या वाङमय प्रकाराचा किंवा त्या त्या कालखंडाचा गंभीरपणे विचार करण्यात येतो.

महाराष्ट्रात वेळावेळी भाषाविषयक किंवा संस्कृतीविषयक जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचा समाजाकडे किंवा शासनाकडे पाठपुरावा करून ते प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत असते.

सध्या प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या बरोबर हैद्राबादच्या डॉ. विद्या देवधर महामंडळाच्या उपाध्यक्षा असून मराठवाडयातील डॉ. अरुण प्रभुणे हे कोषाध्यक्ष तर श्री. कुंडलिक अतकरे हे कार्यवाह आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डॉ. वि.भा. देशपांडे, डॉ. माधवी वैद्य, श्री. मधु नेने, मुंबईच्या साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रा. सुहासिनी किर्तीकर, श्रीमती कुंदा पडळकर, नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचे श्री. मनोहर म्हैसाळकर, प्रा. श्रीपाद भालचंद्र जोशी, श्रीमती शोभा उबगडे हे प्रत्येकी तीन सभासद आहेत. गुलबर्ग्याच्या कर्नाटक मराठी साहित्य परिषदेचे जे.एन.कदम, भोपाळच्या मध्यप्रदेश साहित्य संघाचे अनिल निगुडकर, पणजीच्या गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे सुरेश नाईक, विलासपूरच्या छत्तीसगड साहित्य संघाचे श्री. कपूर वासनिक आणि बडोद्याच्या मराठी वाङमय परिषदेच्या डॉ. वनिता ठाकूर हे प्रत्येकी एक एक सभासद आहेत. शिवाय साहित्य संमलेनाचा अध्यक्ष हा पदसिध्द सभासद असतो सध्या प्रा. म. द. हातकणंगलेकर हे पध्दसिध्द सदस्य आहेत. प्रत्येक वर्षात महामंडळाच्या किमान चार सभा होत असतात. आणि या सभांमधून सर्व निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेण्यात येतात.

या वर्षी पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, दिनांक १४, १५, १६ फेब्रुवारी रोजी सॅन होजे अमेरिका येथे हे संमेलन होत आहे. तसेच ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि २० ते २२ मार्च २००९ या काळात महाबळेश्वर, जि. सातारा येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध ग्रामीण लेखक डॉ. आनंद यादव हे विराजमान होणार आहेत.