शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

वाईट सवयी सोडविण्यासाठी...

वेबदुनिया

WDWD
लहान मुले चंचल असतात. त्यांना पाहिजे तेच करतात. मात्र, हा चंचल स्वभाव कधी कधी त्याच्या पालकाना चारचौघात मान खाली घालायला लावतो. लहान वयात मुलाना विचित्र सवयी जडतात. उदा. अंगठा चोखणे, घरात फिरता फिरता जेवण करणे, दातानी नखे कुरतडणे, नाकातोंडात बोटे घालणे, मोठ्यांच्या तोंडावर थुंकणे या विचित्र सवयींमुळे पालकाना खजील व्हावे लागते.

या सवयी लहान मुलांच्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की दिवसभरात ते वारंवार तसे करतात. पुढे त्यांची ती ओळख बनून जाते. पालकांनी कितीही रागावूनही त्यांच्या या सवयी सुटता सुटत नाहीत. उलट त्या अधिकच वाढत जातात आणि पालकांची डोकेदुखी ठरतात.

लहान वयात मुले इतर मुलांचे चटकन अनुकरण करतात. अशा वेळी पालकांकडून त्यांना वारंवार रागावणे, मारणे किंवा शिक्षा देणेही घातक ठरू शकते. लहान मुलांना फारसे कळत नसल्याने या विरोधाने ती बिथरतात. मग घरातून पळून जाणे, स्वत:ला कोंडून घेणे अशा नवीन समस्यांना तोंड द्यावे लागते. मुलांच्या या सवयी त्यांना मारून किंवा रागावून सुटणार नाहीत, तर त्यासाठी पालकांनी या सवयी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत.
  मुलांना लहान वयात पालकांचे प्रेम, आपुलकीची गरज असते, हे मान्य. मात्र, काही मुले त्याचा गैरफायदा घेतात. जास्त लाड केल्याने मुले वाया जातात व त्यांच्या सवयी वाढतच जातात. लहान मुलांना प्रेमळपणे समाजावून सांगणे हा उपाय ठरू शकतो.       


जे बोट अधिक तोंडात जाते त्या बोटावर पट्टी बांधणे, बराच वेळ त्यांचे हातपाय बांधून ठेवणे, असे विविध 'अघोरी' उपाय पालकांकड़ून केले जातात. पण संधी मिळते तेव्हा मुले पुन्हा त्या सवयींकडे वळतातच.

चारचौघात मुले अचानक मोठ्या व्यक्तिंच्या तोंडावर थुंकतात किंवा त्यांना चावतात अशा वेळी मात्र पालकांची तळपायाची आग मस्तकात जाते. मग मुलांना बदडण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांना वाटते. पण त्यामुळे मुलांना समज येणे तर दूरच उलट ती अधिक बिथरतात. पालकांवरच हात उगारतात. मुलांना लहान वयात पालकांचे प्रेम, आपुलकीची गरज असते, हे मान्य. मात्र, काही मुले त्याचा गैरफायदा घेतात. जास्त लाड केल्याने मुले वाया जातात व त्यांच्या सवयी वाढतच जातात. लहान मुलांना प्रेमळपणे समाजावून सांगणे हा उपाय ठरू शकतो.

प्रेमाने सांगितल्यास मुले लवकर ऐकतात. त्यांना प्रेमाने समजावून घेऊन त्यांच्या सवयी सोडवू शकतात. आजची मुले अधिक भावनात्मक आहेत. त्यांना चटकन राग येतो. त्यांना चारचौघात रागावल्याने किंवा मारल्याने त्याचा ते उलट अर्थ काढून पालकांचा तिरस्कार करतात. यासाठी पालकांनी मुलाच्या सवयी समजून घेऊन त्यांना सोडवण्यासाठी मुलांना प्रेमाने समज देणेच योग्य आहे.