शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुशास्त्राचे वैज्ञानिक नियम

वास्तुशास्त्राच्या आधारे घर बांधल्याने जीवनात सुख, शांती व समृध्दी येते. ऋषीमुनींनी वास्तुशास्त्राचा संबंध धर्माशी जोडला आहे. याचे कारण नागरिकांनी त्याचा अवलंब करावा हे आहे. मात्र, धर्मासोबत वास्तुशास्त्र विज्ञानाशीही निगडीत आहे. वास्तुशास्त्राचे नियम ऋषींनी मोठी तपश्चर्या करून अनुभवाच्या जोरावर तयार केले आहे. आजच्या विज्ञानाच्या परिक्षेतही हे नियम खरे ठरतात.

घर बांधताना आपण आधी हे विचारात घेतले पाहिजे, की निसर्ग व मानव यांचा समन्वय साधला जाऊन मानवाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आरोग्यदायी जीवन लाभावे तसेच ‍जीवनातील सर्व दु:खांचा नाश होऊन सुख लाभावे. पृथ्वी स्वत:भोवती फिरून सुर्याच्या चहूबाजूंनी प्रदक्षिणा मारते, त्यावेळी मानव उत्तरायण व दक्षिणायणाच्या स्थितीत असतो. त्यावेळी मानवाच्या शरीर व मस्तिष्कावर उत्तर व दक्षिण ध्रुवापासून प्रवाहित होणारी चुंबकीय शक्ती व प्राणवायूचा प्रवाह त्याला नवनवीन चेतना शक्ती प्रदान करतो. 


वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे डोके करून झोपण्यास सांगितले आहे. त्याला कारण आहे. चुंबकिय क्षेत्र हे उत्तरेकडून दक्षिणेकडे असते, तर मानवी शरीरात ते डोक्यापासून पायापर्यंत असते. आपण डोके दक्षिणकडे व पाय उत्तरेकडे करून झोपलो तर पृथ्वीचा दक्षिण ध्रुव हा उत्तर ध्रुवापेक्षा आपल्याला अधिक लाभदायी असतो. व्यक्तिला झोपही चांगली लागते. 

वास्तुशास्त्रात पूर्व दिशेला अधिक महत्त्वाचे स्थान आहे. पुर्वेकडून सुर्याचा उदय होत असल्याने त्या दिशेने येणारी सुर्याची किरणे घराच्या प्रत्येक भागात प्रवेश करतात. सुर्याचे सकाळचे ऊन हे 'डी' जीवनसत्व देते. सूर्यकिरण रक्ताच्या माध्यमातून शरीरावर अनुकूल परिणाम घडवून आणतात. घर बांधताना दक्षिण-पश्चिमेकडील भाग हा उंच व पूर्व-उत्तर भाग खोलगट ठेवला जातो. तसेच उत्तर-पूर्व भागात अधिक दरवाजे व खिडक्या ठेवण्याचेही वास्तुशास्त्रात सांगितले आहे. याचे वैज्ञा‍निक कारण असे की, सूर्य पुर्वेकडून दुपारच्या वेळी पश्चिमेकडे जातो तेव्हा त्यांची किरणे अधिक प्रखर असतात व ती मानवी शरीराला अपायकारक असतात. दक्षिण व पश्चिम भाग उंच ठेवल्याने शरीरावर पडणार्‍या सूर्य किरणांचा प्रभाव कमी होतो. दक्षिण- पश्चिम भागात कमी खिडक्या व दरवाजे असल्याने उत्तर-पूर्व भागातून येणारी हवा बाहेर जाऊन वायू प्रदूषण कमी करते. 

स्वयंपाक घर हे दक्षिण-पूर्व ठेवल्याने पूर्वेकडून येणारी सूर्य किरणे स्वयंपाक घरात प्रवेश करतात व तयार झालेल्या पदार्थांना शुध्द ठेवतात. पाण्याची टाकी पूर्व -उत्तर ठेवायचे कारण म्हणजे सूर्याच्या किरणांनी पाणी नेहमी शुध्द व निर्जंतुक राहते व रात्री चंद्राच्या शीतलतेने थंड होते.

वास्तुशास्त्रानुसार घर चारही बाजूंनी मोकळे सोडले पाहिजे. कारण चारही बाजूंनी येणार्‍या हवेमुळे घरातील पर्यावरण शुध्द राहते. त्यामुळे घरातील मंडळींना ऑक्सिजनही शुध्द मिळतो. घर निर्माण करताना वास्तुशास्त्राचा आधार घेतला तर त्या घरात राहणार्‍यांना शुध्द वातावरण, उत्तम आरोग्य व जीवनात सुख लाभते.