बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By अरुणा सबाने|

लालफितीतील महिला

जागतिक महिला दिन साजरा करणे सुरू होऊन आता अनेक वर्षे लोटलीत. दरवर्षी अनेक दिनाप्रमाणे हाही एक दिन येतो. तेवढ्या दिवसापुरते आम्ही अनेक कार्यक्रम राबवितो. महिलांचा पुळका आणतो. महिलांच्या साक्षरतेचे, अन्याय, अत्याचाराचे प्रमाण काढतो. त्यांच्या कर्तबगारीचे गुणगान गातो. नंतरच्या २ दिवसात मात्र महिला दिन हा विषय विसरुन जातो. त्यापेक्षा वर्षातून एकदा त्यांचा उदोउदो करण्यापेक्षा महिलांच्या प्रगतीची आस आम्ही नेहमीच धरली तर...

ND
महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, 'एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं.' याच एका वाक्यावर जर आपण भर दिला तर स्त्रियांची आजची दयनीय स्थिती संपायला वेळ लागणार नाही. स्त्री शिकून सुशिक्षित झाली, विद्यावती झाली की अर्थातच ती तिला आवश्यकता असेल तर अर्थार्जित होऊ शकते. नोकरी करू शकते. नोकरी असेल त्या स्त्रिया तर स्त्रियांच्या तुलनेत दुःखी कमी असतील, असा आपला समज आहे. हा समज खोटा आहे असं अजिबात नाही. पण एका अत्यंत शिकलेल्या, पगारदार असलेल्या क्लासवन स्त्रीची परिस्थिती या महाराष्ट्रात कशी असू शकते, याचं उदाहरण सांगते.

दोन दिवस काही कामानिमित्त मी मंत्रालयात होते. आताशा मंत्रालय हे मंत्रालय न राहता सचिवालय झालेलं आहे. त्याहीपेक्षा कारकुनालय म्हटलं तर जास्त योग्य होईल. तर नागपूरचीच एक मैत्रीण तिथे भेटली. वास्तपुस्त केल्यावर कळलं, अनेक वर्षापासून ती एकच फाईल घेऊन त्या प्रांगणात जात राहाते. ती स्वतः एम.एससी. इन नर्सिंग आहे. ३ विषयात एम.ए आहे. लॉ केलेले आहे. मागास समाजातली महाराष्ट्रातली सर्वात जास्त शिकलेली ही महिला. नागपूरहून तिची बदली औरंगाबादला झाली आणि त्याचवेळी तिचे पती अचानक सिरियस झाले. जबरदस्त हार्ट ऍटक आला.

त्यांची बायपास सर्जरी करायची ठरलं. बॉम्बेला त्यांना नेणं आवश्यक झालं, अर्थातच या भागदौडमध्ये दिला बदली झाल्या झाल्या औरंगाबादला बदलीवर जाणे आवश्यक होते. तिने सुट्टीचा अर्ज टाकला. तिचे पती मृत्यूसोबत लढत होते. ती त्यांच्याजवळ असणं अत्यावश्यक होते. त्यामुळे ती वारंवार सुट्टी वाढवून घेण्यासाठी अर्ज देत होती. तिची सुट्टी नामंजूर करण्यात येत होती. त्याचवेळी तिला आपल्या पतीची तब्येत जास्त महत्त्वाची होती आणि ती असणे गैर आहे, असे कुणीही म्हणणार नाही.

कोणत्यातरी व्यक्तिगत क्रोधामुळे हिच्याविरुद्घ तक्रार करण्यात आली. तिची रजा मंजूर करण्याचा तर विषयच नाही, उलट तिला बदलीवर जायचे नव्हते म्हणून तिने पतीच्या ऑपरेशनचा खोटा रिपोर्ट जोडला, असा नवीनच शोध तिच्या वरिष्ठांनी लावला. ती सूचना न देता रजेवर गेली ही सबब पुढे करून तिचे इन्क्रीमेंटसुद्घा थांबविले. पदोन्नतीचा तर विषयच नाही. गेल्या १५ वर्षापासून ती हाच लढा देत आहे. नर्सिंगमधली सर्वांत जास्त शिकलेली स्त्री. तिची कुवत असनूही तिला बढती मिळत नाही. कारण व्यक्तिगत हेवेदावे इथपर्यंत आपण समजू शकतो. हे काही नवीन नाही. काल प्रत्यक्ष माझ्या डोळ्यादेखत घडलेली घटना. 'माझी केस नीट समजून घ्या, त्यासाठी मला दोन मिनीटं द्या' अशी विनंती ती तिच्या संबंधित खात्यातील सचिवाला करीत होती. ते सचिव म्हणाले, 'माझ्याजवळ वेळ नाही', आज नसेल तर उद्या द्या. या २-३ दिवसात कधीही द्या. मी त्यासाठी इथे (बॉम्बेला) आणखी थांबेल. पण प्लीज तुम्ही माझं म्हणणं तर ऐकून घ्या.' 'नाही मुळीच नाही. माझ्याजवळ वेळ नाही. तुम्ही ताबडतोब इथून बाहेर पडा.' त्या मॅडमवर सचिवसाहेब चक्क ओरडलेच.

पण तीही ऐकायल तयार नह्वती. तिनेही ठरवूच टाकले होते की मी तर माझी कर्मकहाणी आज ह्यांना ऐकवूनच जाईल. तिने परत त्यांना विनंती केली. त्यावर चक्क त्यांनी फोन लावला आणि पोलिसांना बोलवलं. पाच मिनिटात तिथे एक लेडी कॉंस्टेबलल १ शिपाई आणि पी.एस.आय. आले. ते म्हणाले काय झालं? 'ही बाई मला त्रास देत आहे. मला हरॅस करीत आहे. तिला अटक करा.' 'साहेब, मी यांना काहीही त्रास दिलेला नाही. मी क्लास वन अधिकारी आहे. माझ्या हाताखाली १२०० कर्मचारी काम करतात. मी साहेबांना माझा प्रॉब्लम सांगायला आले. आताही विनंती करते. प्लीज सर, मला तुमचे फक्त पाच मिनीट द्या'. 'पाच मिनीट द्या', असं बाईंनी म्हणता, सचिव इतक्या जोरात ओरडले की पोलीस इन्स्पेक्टरही बघतच राहिला आणि त्यालाच दमदाटी करून आपल्या सहकार्‍यांना घेऊन केबीनच्या बाहेर पडला.


ND
नोकरी करणारी एक स्त्री उच्च पदाधिकारी, उच्चशिक्षित महिला, अशा स्त्रीसोबत आज एकविसाव्या युगात एका शाखेचा सचिव अशा पद्घतीने वर्तणूक करत असेल, तर याला काय म्हणावे? आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद आपण आपल्या वरिष्टांना मागायची नाही तर कुणाला? गेल्या पंधरा वर्षापासूत ती महिला एकाच विषयासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवते आहे, पण तिला आजतागायत ना मंत्र्याकडून न्याय मिळाला, ना तिच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांकडून.

जागतिक महिला दिनी केवळ महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव करणे, त्यांच्यासाठी काय केले.... काय करणार आहे, याचा गाजावाजा करणे आणि घड्याळाचा काटा १२ वर जाताच महिलांना विसरणे हाच उपक्रम जर आपलं शासन राबवित असेल तर आम्हाला असला महिला दिनच नको आहे.

आम्हाला या एक दिवसाची भीक नकोच आहे. जागतिक महिला दिन साजरा करण्यामागची भूमिका आज पूर्णपणे बदलली आहे. ज्या स्त्रियांनी आपापल्या देशात आपल्या हक्कांसाठी संघर्ष केला, स्त्री-मुक्तीचा लढा लढवय्येपणानं लढल्या, त्या दिवसाची आठवण म्हणून आम्ही जागतीत महिला दिन साजरा करतोय. पण या गोष्ठीचा विसर आम्हाला एक दिवसातच पडत असेल आणि उरलेल्या ३६४ दिवस इथे आमच्यावर अन्यायच होत असेल तर या महिला दिनाला अर्थ आहे काय?

ND
'आम्हाला न्याय द्या' म्हणून टाहो फोडणे आता आम्ही बंद करून आमच्यातली शक्ती आम्ही आत ओळखली पाहिजे. स्त्री जन्माला येत नसते, ती घडवली जाते. स्वातंत्र्य, निर्णयक्षमता, तर्कनिष्टता आणि आत्मविश्वास हे चारही गुण प्रत्येक स्त्रीमध्ये असतात, फक्त त्याची जाणीव दिला अद्यापही झालेली नाही. स्त्री म्हणून बांडगुळाचं जीवन न जगता एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून, माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे.आम्ही शिकवलं पाहिजे. स्त्री अबला नसते, तिला बनवलं जाते. स्त्री व पुरुषातील नैसर्गिक फरकांना अवास्तव प्रमाणात भडक करून त्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमतांमध्ये व पर्यायाने त्यांच्या सामाजिक स्तरांमध्ये जी खोल दरी निर्माण केली आहे ती निसर्गसुलभ नसून मानवनिर्मित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.