गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By अभिनय कुलकर्णी|

`मोठ्या त्यागासाठी तयार रहायला पाहिजे`

NDND
मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर महात्मा गांधींनी आठ ऑगस्टला रात्री ब्रिटिशांना चले जाव असे सांगितले आणि देशभर आंदोलनाला सुरवात झाली. नऊ ऑगस्टला पहाटेच गांधींसह इतर स्वातंत्र्यसेनानींना अटक करण्यात आली. महात्माजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. तेथे त्यांना दहा ऑगस्टला एक पत्र मुंबईचे तत्कालिन गव्हर्नर सर रॉजर ल्युमिली यांना पाठविले. यात गांधीजींची सहकाऱ्यांविषयीची कळकळ, आस्था यांचे मनोवेधक दर्शन घडते....

प्रिय सर रॉजर ल्युमिली,
मला आणि माझ्या काही सहकारी बंदींना घेऊन जाणारी रेल्वेगाडी रविवारी चिंचवड येथे थाबंली आणि आमच्यातील काहींना उतरण्यास सांगण्यात आले. श्रीमती सरोजिनी देवी, श्रीमती मीराबाई, श्री महादेव देसाई आणि मला एका कारमध्ये बसावयास सांगण्यात आले. कारजवळच दोन लॉरी रांगेत उभ्या होत्या. आमच्यासाठी तयार ठेवण्यात आलेली कार म्हणजे अतिशय काळजीपूर्वक आखलेल्या योजनेचाच भाग होता, याबाबत माझ्या मनात काहीच संशय नाही. या योजनेची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली, होती त्यांनी आपले काम अतिशय कौशल्याने पार पाडले होते.

माझ्या बरोबर असलेल्या सहकारी बंदींना जेव्हा उभ्या असलेल्या लॉरीत बसण्यास सांगितले, तेव्हा मला वैयक्तिरकित्या अपमानास्पद वाटले. याचा अर्थ सगळ्यांनाच मोटार गाडीत बसवून नेणार नव्हते, याची जाणीव मला झाली. यापूर्वी आम्हाला एकत्रितरित्या तुरूंगाच्या गाड्यांमध्येच बसवून नेण्यात येत होते. आताही आम्हाला आमच्या सहकाऱ्यांसमवेत न्यायला हवे होते.

हा प्रसंग पाहून अशा बदललेल्या परिस्थितीत आणि बदललेल्या माझ्या मानसिकतेत सरकारकडून मी नाईलाजाने स्वीकारलेले विशेषाधिकार यापुढील काळात उपभोगू शकत नाही. आणि हे सरकारला कळविले पाहिजे अशी माझी धारणा झाली आहे. त्यामुळे सरकारकडून माझ्या सहकार्‍यांना जे विशेषाधिकार आणि ज्या सुविधा मिळत नसतील, त्यांचा मी यावेळी त्याग करतो आहे. माझ्यासाठी येणारे विशेष अन्न फक्त यातून वगळले आहे, जे स्वीकारण्यास सरकारने माझ्या शरीराची गरज म्हणून परवानगी दिली आहे.

आणखी एक बाब मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे, मी माझ्या लोकांना सांगितले आहे, की यावेळी आमचा आंदोलनाचा मार्ग केवळ अटक करणे एवढाच नाही, तर त्यापेक्षा जास्त मोठ्या त्यागासाठी आपल्याला तयार रहायला पाहिजे आणि ज्यांनी हा मार्ग स्वीकारला ते शांततापूर्वक मार्गाने अटकेला विरोध करू शकतात. अशा प्रकारे पक्षातील एका कार्यकर्त्याने विरोध केला, त्याला फरफटत कैद्यांच्या गाडीत टाकण्यात आले. हा अतिशय ओंगळवाणा प्रकार होता.

एक उतावीळ इंग्रज सार्जंट त्या कार्यकर्त्याला अतिशय उद्धटपणे हाताळत, लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे गाडीत फेकतो, हे अतिशय वेदना देणारे दृश्य होते. माझ्या मते सार्जंटने आपल्या कृतीत सुधारणा केली पाहिजे. अर्थात, असे प्रसंग टाळले तरीही संघर्ष यापुढील काळात तीव्र होणार आहे.

मला ठेवण्यात आलेला तात्पुरता तुरूंग माझ्यासह अटक केलेल्यांना सामावून घेईल इतपत मोठा आहे. त्यांच्यात एक आहेत सरदार पटेल आणि त्यांची मुलगी. ती नर्स आहेच, शिवाय त्यांचा स्वयंपाकही करते. मला सरदारांविषयी अधिक चिंता वाटते, गेल्या अटकेच्या वेळी कोलमडलेली त्यांची पचनसंस्था अजून सुधारलेली नाही. त्यांच्या सुटकेनंतर मी स्वतः त्यांच्या आहारावर लक्ष ठेवून होतो. मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही त्यांना व त्यांच्या मुलीला माझ्याजवळ ठेवा. त्याचबरोबर सरदार आणि त्यांच्या मुलीसारखीच परिस्थिती नसली तरी अन्य सहकार्‍यांच्या बाबतीही तुम्ही हाच निर्णय घ्यावा. एकाच कारणासाठी अटक केलेल्यांना, ते काही गुन्हेगार वगैरे नसल्याने, वेगळे ठेवू नये अशी विनंती मी करतो.

मला सुपरिटेंडेंटकडून सांगण्यात आले आहे, की मला वर्तमानपत्रे वगैरे काही मिळणार नाहीत. माझ्या एका सहकाऱ्याने रेल्वेगाडीत असताना इव्हिनिंग स्ट्रीटचा अंक दिला होता. परिस्थितीला हाताळण्यासाठी भारत सरकारने आखलेल्या धोरणांच्या ठरावाविषयी त्यात माहिती आहे. त्यात अनेक चुकीची विधाने असून ती दुरूस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. मला तुरूंगाबाहेर काय घडते आहे हे न कळल्यास अशा आणि अशाप्रकारच्या काही गोष्टी मी करू शकत नाही.

मी मांडलेल्या मुद्द्यांसंदर्भात मला लवकर निर्णय मिळेल अशी अपेक्षा मी ठेवू का?

तुमचा हितचिंतक
एम. के. गांधी

(अनुवादः अभिनय कुलकर्णी)