मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (11:26 IST)

मोदींच्या भाषणात राफेलचा 'ब्र' देखील नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील घणाघाती भाषणावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या 90 मिनिटांच्या भाषणात राफेलबाबत त्यांनी 'ब्र'देखील काढला नाही. पंतप्रधानांनी आम्ही विचारलेल्या तीन प्रश्र्नांची उत्तरेच दिली नाहीत, असे म्हणत राहुल यांनी पंतप्रधानांच्या भाषणाला निव्वळ राजकीय भाषण असल्याचे म्हटले आहे.
 
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना राहुल पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी नेहमीच काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवरच भाषणे करत असतात. संसदेत त्यांनी एक तासाहून अधिक वेळ भाषण दिले. परंतु, त्यांनी शेतकर्‍यांच्या भविष्याबाबत तसेच, युवकांच्या रोजगाराबाबत काहीही भाष्य केले नाही.
 
सोनिया गांधींचाही हल्ला
यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोणताही नवा मुद्दा मांडलेला नाही, सर्व मुद्दे जुनेच होते. आज लोकांना रोजगार हवा आहे, त्यांना आपले भविष्य घडवायचे आहे. परंतु, पंतप्रधान पुन्हा पुन्हा जुनाच राग आळवत आहेत अशा शब्दात सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर पलटवार केला.