'पंतप्रधानांनी स्वच्छ चारित्र्यांच्या व्यक्तींना मंत्रिमंडळात द्यावे'
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाने आज (बुधवार) एक सल्ला दिला आहे. स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तींना मंत्रिमंडळात घ्यावे. विशेष म्हणजे या व्यक्तींना गुन्हेगारी पार्श्वभूमी तर नाही ना, याचीही काळजी घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
दुसरीकडे, गुन्हेगारांची पार्श्वभूमी असणार्या खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी कोर्टाकडून कोणतेही आदेश काढता येऊ शकणार नाहीत, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळातून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना काढून टाकण्यासाठी कोर्ट पंतप्रधानांच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही परंतु, पंतप्रधानांनी मंत्र्याची निवड करतानाच ते स्वच्छ चारित्र्याचे असतील याची काळजी घ्यावी, अशी पुस्ती कोर्टाने जोडली आहे.
मोदी सरकारकडून देशातील जनतेला खूप आशा असताना लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी पंतप्रधानांनी या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असल्याचे कोर्टाने यावेळी म्हटले आहे.