शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By वेबदुनिया|

मनगटावर फुलते रेशमी कमळ!

श्रावण महिना नवचैतन्य निर्माण करणारा समजला जातो. रिमझिम पडणारा पाऊस वसुंधरेला ओलेचिंब करतो. तर बहिणीला आपल्या पाठराख्या भावाची आठवण येते. वेड्या बहिणीची वेडी माया असते ती. पावसालाही चिंब करणार्‍या तरल भावना बहिणीच्या मनात जागृत होतात. सासरी असलेली ‍बहिणीचे मन भावाची वाट पाहात असताना सैरभैर होते. बहिणीच्या या चंचल मनाची अवस्था क‍वयित्री बहिणाबाई चौधरींनी वर्णन केलेल्या मनासारखी होऊन जाते. 'मन वढाय वढाय... उभ्या पिकातलं ढोरं... किती हाकला हाकला... फिरी यतं पिकावर..! तसं तिचं मन माहेरी उडून जातं. तिथं तिच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणींवर ते उडत असतं. बहिणीला वाटतं, चिमणीसाऱखी असती तर क्षणात फूर्रर्रकन उडून आपल्या माहेरी गेली असती. आपल्या मायेच्या माणसांना, आई-वडिलांना, भावाला भेटली असती.

म्हणूनच श्रावणात या बहिणीला भावाच्या भेटीची ओढ लागते. रक्षाबंधनाचे वेध लागतात. बाजारात आलेल्या 'माझा प्रिय भाऊ' असे लिहिलेल्या राख्या तिला बालपणाची आठवण करून देतात. भावाच्या हातावर रेशमी राखी बांधून त्याच्याकडून हक्काने भेटवस्तू घेणे. त्याने नेहमीप्रमाणे आपली चेष्टा करणे, हे चित्र तिच्या डोळ्यासमोर उभे राहते.

रक्षाबंधनाला माहेरी निघण्याची तयारी बरीच आधीपासून सुरू असते. पूर्वी पत्र लिहून बहिण आपल्या भावाला रक्षाबंधनला ती येत असल्याचे कळवत होती. मात्र, आता मोबाईलचा जमाना आल्याने एका क्षणात संवाद साधला जातो. भाऊरायादेखील बहिण येणार असल्याच्या आनंदाने खूष होऊन तिला घेण्यासाठी स्टेशनवर गाडी येण्याच्या किमान तासभर आधीच पोहचतो. गाडीला उशीर झाल्याने कासाविस होतो. वारंवार फोन करण्यातूनही त्याची तळमळ जाणवते.

रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर बहिण भावाला ओवाळते व त्याच्या मनगटावर रेशमी फुललेले कमळ हसतमुखाने बांधते. त्यानंतर भाऊ तिला चिडवत तिच्यासाठी आणलेली भेटवस्तू तिला हळूच देतो. आणि रक्षाबंधन साजरं होतं.