मंगळवार, 19 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वेबदुनिया|

मंदीत घरच्यांचे सहकार्य गरजेचे

आर्थिक मंदीचे परिणाम आता हळूहळू जाणवू लागले आहेत. पगारामध्ये कपात किंवा नोकरी जाण्याचे संकट निर्माण झाले आहे. मंदीमुळे उत्पन्न कमी होत असून पदोन्नतीही मिळत नाही. घरातील प्रमुख व्यक्ती अशा संकटात असतांना त्यांना तणावापासून लांब ठेवणे गरजेचे आहे. यासाठी कुटुंबातील सदस्य महत्वाची भूमिका बजावू शकतात. घरातील चांगले वातावरण तणाव दूर करण्यासाठी महत्वाचे ठरू शकते.

मागू नका:
सध्याच्या अनिश्चित्तेच्या काळात घरातील कर्ता व्यक्ती खूप तणावात असतो. त्याच्यावरील तणाव कमी करण्यासाठी घरातील सदस्य महत्वाची भूमिका बजावू शकतात. यासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. योगेंद्र देशपांडे म्हणतात, 'घरातील सदस्यांनी परिस्थिती पाहूनच कोणत्याही प्रकारची मागणी केली पाहिजे. तणाव कमी करण्यासाठी सर्वांनी आपल्या अपेक्षा कमी केल्या पाहिजे. यामुळे विषम परिस्थितीत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस एकटे वाटणार नाही. घरातील खर्चात कपात करून वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न सर्वच सदस्यांनी केला पाहिजे.

तणावाचे परिवर्तन आजारात होऊ नये:
कुटुंबातील सदस्यांनी खर्च कमी करून सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याबाबत डॉ.स्मिता अग्रवाल म्हणतात, 'घरातील कर्ता पुरूष घरात काही कमतरता झाल्यास आपल्यालाच जबाबदार धरतो. यामुळे परिवारातील सदस्यांनी वायफळ खर्च कमी करावा आणि अशी कोणतीही मागणी करु नये की जी पूर्ण करता येणार नाही. बायकोने आपल्या नवर्‍यास किंवा मुलांनी आपल्या वडिलांना योग, प्राणायाम सुरू करण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. यामुळे तणाव कमी होईल, तणावाचे परिवर्तन आजारात होणार नाही.' डॉ. व्ही.एस. पॉल म्हणतात की, जेव्हा तणावाचा परिणाम सामाजिक कार्यात किंवा दैनिक कार्यावर होतो तेव्ही त्यांचे रुपांतर आजारात होते. त्याला 'डिप्रेशन डिसऑर्डर' म्हटले जाते. यापासून वाचण्यासाठी घरातील व्यक्तींनी पैसे सोडून इतर बाबींवर चर्चा केली पाहिजे. तणाव वाढल्यास वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

एकाकी कुटुंबात जागरूकता हवी:
एकत्र कुटुंब पध्दतीत तणाव कमी असतो. कारण तेथे कमविणारे आणि जबाबदारी उचलणार्‍या अन्य व्यक्तीही असतात. परंतु, एकट्या कुटुंबात मोठा तणाव असतो. यामुळे अशा कुटुंबात जास्त जागरूकतेची गरज आहे. याबाबत समाजशास्त्रज्ञ डॉ. डि. के. गुप्ता म्हणतात की, कुटुंबातील सदस्यांनी संयम ठेवण्याची गरज आहे. सर्व सदस्यांनी समाधानी राहावे. विपरित परिस्थित त्यांनी सकारात्मक विचार करावा. नोकरी गेल्याने किंवा पगारात कपात झाल्याने सर्वच संपणार नाही, हे लक्षात घ्यावे.

लक्षात ठेवा:
- घरातील वातावरण हसतखेळत असावे.
- आर्थिक बाबींवर लक्ष न देता मनोरंजनावर लक्ष केंद्रीत करावे.
- खर्च कमी करा, अपेक्षा वाढवू नका.
- कामात मदत करण्याची इच्छा व्यक्त करा.
- चांगली पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त करा.
- रोज नवीन काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करा.
- सामाजिक जबाबदारीची आठवण करून द्या.
- तणावापासून मुक्त करण्यासाठी लक्ष दुसरीकडे वळवा.