शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

७३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

राज्यातील विविध २७ जिल्ह्यांमधील ७३४ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार आहे. तर २७ डिसेंबरला मतमोजणी होईल, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. 
 
जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. 
 
नामनिर्देशनपत्रांची छाननी १२ डिसेंबर २०१७ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर २०१७ असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. २६ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल; परंतु गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मतदानाची वेळ केवळ दुपारी ३ पर्यंत असेल. २७ डिसेंबर २०१७ रोजी मतमोजणी होईल.
 
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी : ठाणे- 31, पालघर- 39, रायगड- 11, रत्नागिरी- 10, सिंधुदुर्ग- 16, नाशिक- 2, जळगाव- 100, नंदुरबार- 13, अहमदनगर- 67, पुणे- 99, सोलापूर- 64, सातारा- 19, सांगली- 5, कोल्हापूर- 12, औरंगाबाद- 2, बीड- 162, नांदेड- 4, परभणी- 2, उस्मानाबाद- 1, लातूर- 5, अमरावती- 13, अकोला- 3, वाशीम- 2, बुलडाणा- 43, वर्धा- 3, गोंदिया- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 734.