बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 एप्रिल 2018 (15:57 IST)

शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेताच कृषिमंत्री होऊ शकतो - अजित पवार

आज हल्लाबोल आंदोलनाच्या पश्चिम महाराष्ट्र टप्प्यातील दुसर्‍या दिवशी जयसिंगपूर येथे झालेल्या सभेला अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती. हा उत्साह जनतेने निवडणुकांपर्यत टिकवून ठेवावा, असे आवाहन यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. सभेत उपस्थितांनी मोदींनी दिलेली आश्वासाने पूर्ण केली नाहीत असा एकच एल्गार केला.सरकारमधील लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहे. आपल्या सोयीनुसार बदल करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले होते का? संविधान आहे म्हणून आपला देश एकसंध आहे, असे पवार यावेळी म्हणाले. 
 
जनता शरद पवार साहेबांकडे आपल्या व्यथा मांडत आहे. मात्र त्यांच्या हातात सध्या काहीच नसल्याने त्यांना मदत करता येत नाही. साहेबांनी प्रत्येक प्रश्न तात्काळ मार्गी लावला. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेताच कृषिमंत्री होऊ शकतो, निर्णय घेण्याची धमक फक्त पवार साहेबांमध्येच आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. सरकारने निर्णय घेतले नाही तर अनेक साखर कारखाने पुढच्या वर्षी बंद पडतील. संस्था उभी करायला अक्कल लागते, उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. सरकारमध्ये एकही मंत्री असा नाही जो शेतकऱ्यांना न्याय देईल, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. रोज जवान शहीद होत आहे, का पाकिस्तानला जशासतसे उत्तर देत नाही? ५६ इंच छाती कुठे गेली? पाकिस्तानच्या पंतप्रधानाना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदी पाकिस्तानला जातात. हा काय प्रकार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
महागाई थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिला, तो त्यांनी पाळला नाही. तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला. आजही तरुण रोजगाराच्या शोधात आहे. पंतप्रधानांनी सांगितल्याने लोकांनी जनधन खाते उघडले त्यात १५ पैसे देखील जमा झालेले नाहीत, अशी टीका सभेस संबोधित करताना विरोधी पक्षनेते धनंजय मुडे  यांनी केली.सरकार कधी ट्रिपल तलाकचा मुद्दा काढतात. कधी हज सबसिडीचा मुद्दा काढतात. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे राजकारण सुरू केले आहे. काय सुरू आहे देशात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने धनगर समाजाला फसवले, मराठा, मुस्लिम समाजाला फसवले, लिंगायत समाजाला फसवले. या फसवणूकीच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायलाच हवा, असे आवाहन त्यांनी केले.केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेल्या सर्व योजना बंद केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार जर येथे निवडून आला तर या भागात पाईपलाईनसाठी नक्कीच अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी सभेत केली.