शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑक्टोबर 2018 (15:31 IST)

भावना गवळी यांची वाघग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची मागणी

यवतमाळ राळेगाव, कळंब तालुक्यात नरभक्षी वाघीनीची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा नागरीकांचे बळी घेणा-या या वाघीनीमुळे शेतक-यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर वरील उभे पिक करपले असून या शेतक-यांची जबाबदारी सरकारने घेऊन त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी वनमंत्र्याकडे केली आहे. वाघग्रस्त भागातील शेतक-यांचे प्रश्न तातडीने न सोडविल्यास तसेच या शेतक-यांना मदत न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार भावनाताई गवळी यांनी दिला आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी प्रथम सरकारी यंत्रनेला सुचना देऊन वाघग्रस्त भागातील शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याच्या सुचना दिल्या. यासंदर्भात तातडीने पाऊले उचलत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी खासदार भावनाताई गवळी यांना वेळ पडल्यास रस्त्यावर उतरा पण वाघग्रस्त भागातील शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले आहे. थेट मातोश्री वरुन आदेश आल्यामुळे शिवसैनिक आता आरपारची लढाई करण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या दोन दिवसात खासदार भावनाताई गवळी वाघग्रस्त भागातील नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या तसेच मागण्या एैकून घेणार आहे. याव्यतिरीक्त नरभक्षी वाघीनीला जेरबंद करण्याच्या मोहिमेचा आढावा घेणार आहे. वन क्षेत्राला लागुन असलेल्या शेतांना तार कुंपण लावण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे तसेच काही भागात जंगलातील जनावरे शेतीकडे येऊ नये यासाठी जंगलाला तारकुंपणाचा वेढा घालण्याची मागणी सुध्दा करण्यात आली आहे. वाघग्रस्त भागात आजही अनेक नागरीक शौचास बाहेर जातात. या दरम्यान त्यांच्या जीवास धोका संभवतो. त्यामुळे सरकारने एपीएल अथवा बीपीएल ची अट न ठेवता सरसकट सर्व नागरीकांसाठी विशेष बाब म्हणून शौचालयांचे बांधकाम करुन देण्याची मागणी सुध्दा खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे.
 
हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या
 
राळेगाव, कळंब तालुक्यात जवळपास वीस गावांमध्ये नरभक्षी वाघीनीची दहशत पसरली आहे. शेतक-यांनी कापूस, सोयाबिन तसेच इतर पिकांची पेरणी केली होती. मात्र वाघीनीच्या दहशतीमुळे शेतीची काळजी ते घेऊ शकले नाही. त्यामुळे शेकडो हेक्टर वरील उभे पिक करपले आहे. अनेक भागात तर वन विभागाच्या अधिका-यांनी शेतक-यांना शेतात न जाण्याचा सल्ला जारी केला आहे. अशा असस्थेत आता या शेतक-यांना सरकारी मदतीशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे वाघग्रस्त भागातील शेतक-यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची रोख मदत देण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे.
 
नवाब गो बॅक
 
शार्प शुटर नवाब याचेवर सरकारचा मोठया प्रमाणात खर्च होत असतांनाही वाघाच्या बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे. पॅरा ग्लायडर, विदेशी कुत्रे यावर सुध्दा झालेला खर्च वाया गेलेला आहे. वन विभागात चांगले शुटर असल्यामुळे नवाब ला परत पाठवून त्याऐवजी वन विभागातील शुटर्सचा या मोहिमेसाठी वापर करावा अशी मागणी सुध्दा भावनाताई गवळी यांनी केली आहे.