शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मराठी अस्मिता म्हणजे भारतीय अस्मितेचाच एक भाग आहे - जयेश मेस्त्री

आपण महाराष्ट्र धर्म म्हणतो, पण समर्थ रामदासांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म आपल्याला अभिप्रेत आहे. मराठी अस्मितेचा अभिमान असलाच पाहिजे. परंतु मराठी अस्मिता म्हणजे भारतीय अस्मितेचाच एक भाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी माणूस देशाचा विचार करतो, हे आपलं वेगळेपण आहे. आपण पसायदान म्हणणारे आहोत, असे मत श्री, जयेश मेस्त्री यांनी उत्कर्ष मंदिर आयोजित मराठी भाषा दिन सोहळ्यात व्यक्त केले.
 
जयेश मेस्त्री पुढे म्हणाले की "कुसुमाग्रज वारले तेव्हा नाशिककरांनी स्वेच्छेने आपली कामे व दुकाने बंद ठेवले, हे प्रेम आहे एका साहित्यिका प्रति. पण जेव्हा नेते वारतात तेव्हा मात्र पक्षाच्या गुंडांना दिकाने बंद करण्यासाठी गुंडगिरी करावी लागते. यातच कुसुमाग्रजांची महानता आली. सावरकरांनी मराठी भाषेसाठी प्रचंड योगदान दिले आहे. त्यांनी साहित्य निर्माण केलेच. पण मराठी भाषा शुद्धी चळवळ राबवली. कित्येक शब्द त्यांनी मराठी भाषेला दिले आहेत. एवढच काय आता निवडणूक झाली. आता महापौर नेमणूक होईल. हा महपौर शब्द सुद्धा सावरकरांनीच दिला आहे. यासाठी सावरकरांचे स्मरण आपण केले पाहिजे.  
 
दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ रोजी मालाड पश्चिम येथील उत्कर्ष मंदिर या शाळेत मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन भरवले होते. घरगूती वॅक्यूम क्लिनर सारख्या उत्कृष्ट कल्पना विद्यार्थ्यांनी मांडल्या. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जयेश मेस्त्री यांनी केले. तसेच छोट्या दोस्तांनी उत्तम सादरीकरणही केले. पोवाडा, गवळण, नाटुकली, गीत गायन, अफझलखान वध प्रसंग अशा विविध अंगांना स्पर्श करत आपले कलागुण दाखवले. त्यानंतर जयेश मेस्त्री यांचे मराठी भाषा या विषयावर भाषण झाले.
 
"मराठी भाषा जितकी समृद्ध आहे. तितकीच गंमतीशीर सुद्धा आहे. मराठी भाषेत तीन लिंगे आहेत. तो डोळा, ती जीभ, ते पोट. शरीरातील या अवयवांचे वर्णन करण्यासाठी आपल्या तीन वेगळ्या लिंगांचा वापर करावा लागतो, म्हणून अमराठी लोकांचा गोंधळ उडतो.", असे जयेश मेस्त्री या प्रसंगी म्हणाले. जयेश मेस्त्री हे लेखक, स्तंभलेखक, कवी व गीतकार आहेत. तसेच फिल्म सेन्सॉर बोर्ड येथे सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आपण मराठी असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, पण अभिमान बाळगत असताना इतर प्रांताला दुखवू नये. आपण सर्व पालकांनी मुलांना मराठी माध्यमातच शिकवलं पाहिजे. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी संस्कृती टिकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी उत्कर्ष मंदिरचे पदाधिकारी श्री. श्रीकांत मराठे, श्री. जोग, श्री कुलकर्णी व आदी मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन केले.