बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (16:40 IST)

आघाडीतील तीन पक्षातून तुमच्या पक्षात गेलेले आमदार आता येणार : अजित पवार

महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यांत पडेल, सहा महिन्यांत पडेल अशा वल्गना भाजप नेते करत होते. पण आता वर्षानंतरही सरकार भक्कमपणे चालले आहे. आता आघाडीतील तीन पक्षातून तुमच्या पक्षात गेलेले आमदार आता येणार आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा. पुढील चार महिन्यांत तुम्हाला ते दिसेलच. मी जे बोलतो ते खरे बोलतो आणि सांगून करतो. परत म्हणू नका तुम्ही आधी का सांगितले नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांना दिले.
 
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले की, विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याने भाजप नेते नैराश्यात आहेत. शिक्षक व पदवीधर मतदार हा सुशिक्षित व चालू घडामोडीवर लक्ष ठेवणारा मतदार असतो. भाजपची हक्काची नागपूर, पुणे पदवीधरची जागा गेल्याने वाट्टेल ते आरोप करत आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत कोणताही संभ्रम नसताना सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत  पण तुम्हाला त्यात यश मिळू देणार नाही.
 
ओबीसी आरक्षणाबाबत विरोधक दिशाभूल करत आहेत. ओबीसींमध्ये इतरांना सामील करण्याची आवई उठवली जात आहे. मराठा समाजाची भीती दाखवली जात आहे. मराठा समाजालाही त्यांचे हक्क दिले जातील. मात्र, ओबीसींमध्ये त्यांचा समावेश केला जाणार नाही, याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, तीन पक्ष एकत्र आल्याने विरोधक नैराश्यात गेले आहेत, असेही अजित पवार म्हणाले.