बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यात सर्वत्र पाऊस, शेतकरी सुखावला

मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या सर्वच भागात पावसाचे दमदार पुरागमन झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी मराठवाडा आणि विदर्भातील पिकांनी माना टाकल्या होत्या. पावसाच्या पुनरागमनामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे. राज्यातील धरणातील पाण्याच्या साठ्यातही चांगली वाढ झाली आहे. बैलपोळ्याच्या मुहूर्तावर पिकांवर आलेले विघ्न काहीसे टळल्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे. पुढच्या 48 तासांतही कोकणासह राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 
सुरुवातीला पडलेल्या चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या. मात्र पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके संकटात सापडली होती. शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी दुबार पेरणीही केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिपाचे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली होती. पावसाअभावी राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने राज्य सरकारचीही चिंता वाढली होती.