गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2016 (09:41 IST)

दाऊदवर एवढी वाईट वेळ आलीय का?: राज ठाकरे

मुंबई- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी फोनाफोनी आणि जमीन घोटाळ्यांच्या आरोपावरून मंत्रिपद गमावलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. दाऊद इब्राहिम एकनाथ खडसेंना कॉल करतो एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का, असा टोला राज यांनी लगावला आहे.
 
यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी खडसे प्रकरणावर भाष्य केले. 
 
दाऊद पाकिस्तानातून स्वत:ची यंत्रणा सांभाळतो. तो तिथून खडसेंना कशाला फोन करेल? एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का, असे राज म्हणाले. आपल्याकडे काहीही झाले की लगेच तर्कवितर्क लावले जातात. सगळी मज्जा मज्जा चालली आहे, असे राज म्हणाले.
 
महाराष्ट्र नेहमी देशाचा विचार करतो. इतर राज्ये मात्र स्वत:चा विचार आधी करतात. त्यामुळे यूपीएससी व एमपीएससी परीक्षेतल्या यशवंतांनी महाराष्ट्राचा विचार सगळ्यात आधी करावा, असे आवाहनही राज यांनी यावेळी केले.