शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 16 सप्टेंबर 2015 (11:34 IST)

परिवहनमंत्र्यांची घोषणा रिक्षा परवान्यासाठी आता मराठीची सक्ती!

मराठी भाषा येत असणा-यालाच या पुढे रिक्षा चालविण्याचा परवाना देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिली. विविध कारणांमुळे रद्द झालेले, व्यपगत (लॅप्स) झालेले १ लाख ४० हजार रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येईल. तसेच विनापरमीट रिक्षा जप्त करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रावते यांनी मराठी बोलता येणा-यालाच या पुढे रिक्षा परवाने दिले जातील, अशी घोषणा केली. रिक्षा परवाना देताना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येते की नाही, याची पडताळणी करण्यात येईल. तसेच १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असण्याची अटही कायम ठेवण्यात येणार आहे; पण त्यासाठी केवळ अधिवास प्रमाणपत्र पुरावा म्हणून पुरेसे नाही, तर आधार कार्ड, विजेचे बिल आदी कागदपत्रांपासून त्याच्या वास्तव्याच्या पुराव्यांची कठोर पडताळणी करण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले. पूर्वी कागदावर ‘वजन’ ठेवून जसे परवाने मिळायचे, तसा प्रकार आता अजिबात घडणार नाही, अशी ग्वाहीही दिवाकर रावते यांनी दिली.  

विविध कारणांमुळे राज्यातील २ लाख ४० हजार ६५ रिक्षा परवाने हे रद्द किंवा व्यपगत झाले आहेत. त्यांना पुकारण्यात आलेल्या दंडाची रक्कमही फार मोठी असल्याने त्याचे नूतनीकरण करण्यास कोणी पुढे येत नाही; परंतु परवाने रद्द झालेल्या अनेक रिक्षा आजही रस्त्यावर धावत आहेत. या रिक्षाचालकांना एक संधी मिळावी म्हणून मुंबई महानगर क्षेत्र परिसरात २० हजार तर इतर क्षेत्रांसाठी १५ हजार रुपये एकरकमी शुल्क आकारून या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. १ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत हे नूतनीकरण करता येईल. या कालावधीनंतरही जे नूतनीकरण करणार नाहीत, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही रावते म्हणाले. 
 
नवीन रिक्षा परवानेही देणार 
१९९७ पासून मोठ्या शहरांत नवीन रिक्षा परवाने देण्यात आलेले नाहीत. तेथील लोकसंख्या गेल्या १८ वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तेथे नवे परवाने देण्यात येतील, अशी घोषणा रावते यांनी केली. मुंबई महानगर क्षेत्र परिसरात रिक्षाचे १ लाख नवे परवाने देण्यात येणार आहेत, तर पुणे, सोलापूर, नागपूर, नाशिक णि औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सध्याच्या ऑटो रिक्षांच्या परवान्यांच्या २५ टक्के नवे परवाने जारी करण्यात येणार आहेत. पुणे शहरात सध्या ४३ हजार ५९९ रिक्षा परवाने आहेत, तर औरंगाबाद- ११ हजार २००, नाशिक - १२ हजार ८२५, पिंपरी-चिंचवड ४ हजार ८८८ आणि सोलापूर शहरांत ६ हजार ६५ रिक्षा परवाने आहेत. यात आणखी २५ टक्के रिक्षांची भर पडणार आहे.