गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 7 एप्रिल 2016 (13:52 IST)

भुजबळ यांचे आर्थर रोड कारागृहातुन मुख्यमंत्र्यांना स्वहस्ताक्षरात पत्र

मांजरपाडा ( जि. नाशिक) वळण योजनेचे रखडलेले काम तातडीने सुरु करण्यासाठी छगन भुजबळ यांचे आर्थर रोड कारागृहातुन मुख्यमंत्र्यांना स्वहस्ताक्षरात पत्र. 
 
मांजरपाडा (जि. नाशिक) या वळण योजनेचे रखडलेले काम तातडीने सुरु करण्यासाठी छगन भुजबळ यांनी आर्थर रोड कारागृहातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वहस्ताक्षरात पत्र लिहून हे काम तातडीने सुरु करण्यासाठी आग्रहाची विनंती केली आहे. सदर पत्राच्या प्रती विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधान सभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गतनेते जयंत पाटील यांना अग्रेषित करण्यात आल्या आहे.
 
छगन भूजबळ यांच्या प्रयत्नामुळे मांजरपाड़ा या महत्वकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील गुजरातच्या हद्दीवरील पाणलोट क्षेत्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे गुजरातकडे आणि अरबी समुद्रात वाहून जाणारे ८४५ दलघफु पाणी आडवुन हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे. यातील १०० दलघफु पाणी स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सध्यस्थितित ८.९६ की मी लांबीच्या बोगद्यापैकी ९० टक्के आणि ३.२० किमी लांबीच्या  उघड्या चराचे पूर्ण काम झाले आहे. तर धरणाचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र सिंचन विषयक चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितिकडून तपासणी करण्याच्या यादीमध्ये या प्रकल्पाचा समावेश असल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेवाचून हे काम ऑक्टो २०१४ पासून बंद पडले आहे.
 
विशेष म्हणजे सन २०१४-१५ मध्ये भूजबळांमुळे ७० कोटी निधी उपलब्ध असूनही राज्यातील सत्तांतरानंतर सुप्रमामुळे हे काम रखडले गेले. मात्र आता विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने दि १९ डिसेंबर २०१६ रोजी शासनास आपला अहवाल सादर केला आहे. सदर अहवालातील मुद्याच्या आधारे गोदावरी मराठवाड़ा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी सविस्तर तांत्रिक तपासणी सुद्धा करुन शासनास प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या सुप्रमासाठी कोणतीही तांत्रिक अडचण नाही. या प्रकल्पाचे रखडलेले काम सुरु करण्यासाठी भुजबळांनी विधिमंडळात सतत पाठपुरावा केला आहे. मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात मा. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना या योजनेचे काम तातडीने सुरु केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आश्वाशन दिले होते. भूजबळ यांनी त्यांच्या विधिमंडळ कारकिर्दीमध्ये कधी नव्हे ते या प्रकल्पासाठी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांजरपाडा प्रकल्पासाठी वेलमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रकल्पस्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी सुद्धा केली आहे. केवळ बोगदयाचे काम जरी पूर्ण झाले तरी गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असल्यामुळे या योजनेसाठी भुजबळांचा सतत पाठपुरावा सुरु आहे. याबाबत आर्थर रोड कारागृहामधुन छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र सोबत जोडलेले आहे.
पुढील पानावर बघा....