गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (09:05 IST)

मुंबईवर आता सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर

मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल ७ वर्षांनंतर अखेर काल सोमवारी लोकांच्या सुरक्षितेसाठी मुंबईत १२५० कॅमे-यांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. सीसीटीव्ही कॅमे-यांचा लोकार्पण सोहळा हॉटेल ताजमहाल येथे पार पडला. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण हल्ल्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुंबई शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा केली होती. अखेर ७ वर्षांनंतर या गोष्टीला मुहूर्त मिळाला आहे. मुंबई शहर आता अधिक सुरक्षित झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 
 
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर शहराची सुरक्षितता अधिक भक्कम करण्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखणे किंवा वाहतुकीचे नियंत्रण करणे तसेच एखादी घटना घडल्यानंतर तपास यंत्रणेच्या मदतीसाठी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना आखून कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत दक्षिण मुंबईतील ४३४ ठिकाणावर १२५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी संपूर्ण शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे जवळपास सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र, अनेक वर्षे उलटल्यानंतरही ठोस निर्णय होत नव्हता. 
 
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळी या परिसरादरम्यानच्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १२५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमे-यांचे नियंत्रण आणि सततचे निरीक्षण तीन नियंत्रण कक्षांद्वारे होणार आहे. या कॅमे-यांमध्ये वाहनांचे नंबर प्लेट डिटेक्शन, व्हीडीओ अ‍ॅनॅलिसिस तसेच तब्बल एक हजार पोलिस वाहनांच्या जीपीएस टड्ढॅकिंगची सुविधा असणार आहे. 
 
कालच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पणानंतर आता दुस-या टप्प्याचे काम एप्रिल २०१६ मध्ये तर तिस-या आणि अंतिम टप्प्याचे काम ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्ण होईल. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या कंपनीमार्फत हे काम करण्यात येत असून या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मेसर्स प्राईस वॉटर हाऊस कुपर्स हे आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या सुरक्षेबरोबरच दहशतवादी कारवायांवर देखरेख ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण करणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्यास मदत होणार आहे.