शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 16 सप्टेंबर 2015 (11:20 IST)

राज्य सहकारी बॅँक गैरव्यवहार ; ६७ दिग्गजांवर दोषारोपपत्र

राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या सुमारे १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे  यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप देशमुख, पांडुरंग फुंडकर यांच्यासह अनेक सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिनकर यांची जून २०१४मध्ये नियुक्ती केली होती. पहिनकर यांनी तब्बल १५ महिने सर्व व्यवहारांची चौकशी केली. साखर कारखाने व इतर अनेक सहकारी संस्थांना झालेले विनातारण कर्जवाटप आणि नियम डावलून घेण्यात आलेले निर्णय, चौकशीअंती समोर आले.

यावर संचालक मंडळाच्या बैठकीत आमच्यापुढे जी विषयपत्रिका आली त्यावर आम्ही निर्णय घेतले, असे स्पष्टीकरण दिले गेले; परंतु ते ग्राह्य धरण्यात आले नाही. यामुळे पहिनकर यांनी तत्कालीन संचालक आणि अधिकार्‍यांसह ७६ जणांवर १४१ पानांचे दोषारोप निश्चित केले आहेत. १० सप्टेंबरला हे दोषारोपपत्र सर्व संचालकांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, २८ सप्टेंबरपासून या दोषारोपपत्रावर सुनावणी सुरू होणार आहे.

संबंधितांचे आरोपांविषयी स्पष्टीकरण व पुरावे पाहून अंतिम जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.