शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2016 (12:33 IST)

विघ्न टाळावे वीजअपघाताचे...

विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनाचे वेध सर्वांना लागलेले आहेत. कोणत्याही सार्वजनिक उत्सवात संभाव्य अपघात किंवा विघ्न टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्राथमिक जबाबदारी आयोजकांवर असते. यातील प्रमुख जबाबदारी आहे ती वीजअपघाताचे विघ्न टाळण्याची.
 
वीज दिसत नाही, मात्र तिचे परिणाम भयावह व जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वीजपुरवठा घेतला जातो. पण हा वीजपुरवठा अधिकृतपणे तात्पुरत्या वीजजोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे आद्य कर्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकडे टाकून घेण्यात येणारा अनधिकृत वीजपुरवठा हा कोणत्याही क्षणी कोणत्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.
 
महावितरणने सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरती वीजजोडणी घेण्यासाठी घरगुती दरांपेक्षाही कमी म्हणजे प्रतियुनिट ३ रुपये ७१ पैसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर ठेवले आहेत. आयोजकांनी अशा उत्सवांसाठी अधिकृत वीजपुरवठाच घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, हा कमी दर ठेवण्यामागील हेतू आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकृत वीजपुरवठा घेण्यास सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर बाबींसाठी थोडाफार खर्च कमीअधिक करता येईल, पण वीजपुरवठ्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.
 
सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक गणपतीच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. मंडप, स्टेज व इतर साहित्य महावितरणच्या विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेतली पाहिजे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोषविरहित, धोकाविरहित असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरूपात राहणार नाहीत, याची पुरेपुर काळजी घेतली पाहिजे.
 
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. केवळ काटकसर म्हणून विजेचा भार सहन करू शकत नसणाऱ्या तकलादू वायर्स वापरल्यास शॉर्टसर्किट किंवा वायर्स जळून आग लागण्याची व अपघाताची मोठी शक्यता असते. गणेशोत्सवाचे दिवस पावसाळी असतात तसेच मंडपासाठी पत्र्यांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत वायर्स ढिल्या किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच अपघाताची मोठी शक्यता असते.
 
गणेशोत्सवाच्या काळात वीजतारा जळणे, शॉर्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे आदी घटनांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तातडीच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे तक्रार निवारण केंद्र, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवणे आवश्यक आहे अथवा २४ तास सुरू असणाऱ्या १९१२, १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक आहे. 
 
तसेच वीजपुरवठ्यासाठी तात्पुरत्या वीजमीटरची पेटी पाण्यापासून सुरक्षित राहील अशा ठिकाणी ठेवावी. या पेटीच्या देखभालीसाठी एखाद्या स्वयंसेवकाची नियुक्ती करता येईल. सार्वजनिक ठिकाणी देखावे तयार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करण्यास प्राधान्य द्यायला हवे.
 
अनेक सार्वजनिक मंडळे जनरेटर्सचा वापर करतात. परंतु, वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू करण्यात येतो. परंतु, एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा व जनरेटरचे न्यूट्रल हे स्वतंत्र असण्याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घेणे अत्यावश्यक आहे.
 
गणपतीला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली जाते. परंतु, यादरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या, फिडर पिलर, रोहित्रे आदींपासून मिरवणुकीतील वाहने, देखावे सुरक्षित अंतरावर राहतील, याची काळजी घेतली पाहिजे. जाणते-अजाणतेपणाने केलेल्या चुका या वीजअपघातांसाठी क्षम्य ठरत नाहीत. कोणत्याही चुकीसाठी वीज क्षमा करीत नाही. त्यामुळे वीजपुरवठा घेताना सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांना प्राधान्य देणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी महावितरणचे अभियंते, जनमित्र आवश्यक तेथे संबंधित गणेश मंडळांना वीजवहन व्यवस्थेसंबंधी व वीजसुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत.

ज्ञानेश्‍वर आर्दड